जातीला आहुती, विकासाला पावती नागपूर ठरले खरे सेक्युलर
By Admin | Updated: May 18, 2014 00:48 IST2014-05-18T00:48:36+5:302014-05-18T00:48:36+5:30
गेली २० वर्षे नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा बोलबाला राहिला. दलित, मुस्लिम, ओबीसी बहुल मतदार असलेल्या नागपूरने नेहमी काँग्रेसला साथ दिली.

जातीला आहुती, विकासाला पावती नागपूर ठरले खरे सेक्युलर
सारे फॅक्टर झाले फॅ्रक्चर
कमलेश वानखेडे - नागपूर
गेली २० वर्षे नागपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचा बोलबाला राहिला. दलित, मुस्लिम, ओबीसी बहुल मतदार असलेल्या नागपूरने नेहमी काँग्रेसला साथ दिली. काँग्रेस विरोधी लाटेत ज्यावेळी इंदिरा गांधी निवडणूक हरल्या होत्या, त्या वेळी नागपुरात मात्र काँग्रेसचे गेव्ह आवारी यांना विजयी केले. मात्र, या वेळी नागपूरकर मतदारांनी खर्या अर्थाने सेक्युलर विचार केला. जात, धर्म, भाषा, पंथ असा कुठलाही विचार न करता केवळ विकासाला पावती दिली. जातीय समीकरणे फेल पडली. विकास पुरुष अशी प्रतिमा असलेल्या भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन गडकरी यांनी काँग्रेसचा हा बालेकिल्ला विक्रमी मतांनी भेदला. दलित, मुस्लिम व बहुजन मतांच्या बेरजेवर काँग्रेसचे गणित अवलंबून होते. मात्र, या मतदारांनी भाजपला साथ देत काँग्रेसचे गणित बिघडविले. गडकरी हे ब्राम्हण समाजाचे व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अत्यंत जवळचे होते. मात्र, त्यांना मिळालेली ५ लाख ८७ हजार ७६७ मते पाहता दलित, मुस्लिमांसह बहुजन समाजानेही त्यांना भरभरून मते दिल्याचे स्पष्ट होते. विशेष म्हणजे दलित व मुस्लिम बहुल मतदार असलेल्या अनुक्रमे उत्तर व मध्य नागपुरातही गडकरींनी आघाडी घेतली. हे तर काँग्रेस नेत्यांना बुचकळ्यात पाडणार आहे. गडकरींनी सुरुवातीपासूनच समाजाचे राजकारण करण्यापेक्षा राजकारणाचा उपयोग समाजकारणासाठी करण्याची भूमिका घेतली. माणूस कोणत्या जाती, धर्माचा आहे हे न पाहता गरजूंना मदत केली. अनेकांच्या वैद्यकीय उपचारासाठी मदतीचा हात दिला. सामाजिक कार्यात सदैव पुढाकार घेतला. जेथे समाजाचे भले होणार असेल तेथे राजकीय अस्पृश्यताही त्यांनी पाळली नाही. विकास पुरूष, एका उंचीचा राजनेता अशी त्यांची तयार झालेली इमेज मतदारांना आवडली. त्यांच्या या इमेजपुढे इतर सर्व फॅक्टर फ्रॅक्चर झाले. कार्यक्रमांनी केला ‘कार्यक्रम’ भाजपने संघटनात्मक शक्ती वाढविण्यावर भर दिला. पक्षाच्या कार्यकर्त्यांनी प्रत्यक्ष जनतेच्या दारात जाण्यासाठी पक्षाने विविध कार्यक्रम दिले. हे कार्यक्रम कार्यकर्त्यांनी इमानेइतबारे राबवित सामान्य लोकांपर्यंत कमळ पोहचविले आणि यातूनच नागपुरात काँग्रेसचा ‘कार्यक्रम’ झाला. शहर भाजपने सदस्य नोंदणी अभियान राबवित ३ लाख सदस्यांची नोंदणी केली. यानंतर ‘घर घर चलो अभियान, ‘एक नोट एक वोट’ अभियान राबविले. भाजपवाले दुसर्यांच्या घरी चकरा मारताहेत, गडकरी डबा घेऊन फिरत नोट जमा करीत आहेत, अशी टीका त्यावेळी झाली. मात्र, डब्यात घामाची नोट टाकताना लोक व्होटही टाकत आहेत, हे काँग्रेस नेत्यांना दिसले नाही. आमदार ठरले गडकरींचे सरदार भाजपच्या चारही आमदारांनी गडकरींसाठी सरदाराची भूमिका पार पाडली. या प्रत्येक सरदाराने आपापला किल्ला (मतदारसंघ) शाबूत राखला. प्रदेशाध्यक्ष आ. देवेंद्र फडणवीस यांनी राज्यभर प्रचारासाठी फिरूनही दक्षिण- पश्चिममध्ये शिग उतरू दिली नाही. शहर अध्यक्ष आ. कृष्णा खोपडे यांनी पूर्व नागपुरात गोवर्धन पेलून धरला. काँग्रेसी विचारसरणीचे बहुसंख्य मतदार असलेल्या पश्चिम नागपुरात आ. सुधाकरराव देशमुख यांनी घेतलेल्या परिश्रमाला फळ आले. मध्य नागपुरात आ. विकास कुंभारे यांनीही जोर लावला. दुसरीकडे काँग्रेस नेते नितीन राऊत उशिरा मैदानात उतरले. अनिस अहमद मंचावर दिसले पण मतदारांत सक्रिय दिसले नाहीत. चतुर्वेदींनी एकाकी झुंज दिली. नितीन गडकरी यांच्या ऐतिहासिक विजयानंतर नागपुरात जल्लोषात मिरवणूक काढण्यात आली.