कामठीतील अवैध कत्तलखाना हटवा!
By Admin | Updated: September 4, 2014 00:55 IST2014-09-04T00:55:10+5:302014-09-04T00:55:10+5:30
कामठी येथील अवैध कत्तलखाना हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन करून येथील कत्तलखाना त्वरित हटवावा, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाारी

कामठीतील अवैध कत्तलखाना हटवा!
जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन : दुर्गंधीचा नागरिकांना त्रास
नागपूर : कामठी येथील अवैध कत्तलखाना हटविण्यासंदर्भात उच्च न्यायालयाने निर्देश दिले आहेत. या निर्देशाचे पालन करून येथील कत्तलखाना त्वरित हटवावा, अशी मागणी आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी जिल्हाधिकाारी अभिषेक कृष्णा यांना दिलेल्या निवेदनात केली आहे.
या संदर्भात आ. बावनकुळे यांनी सोमवारी अभिषेक कृष्णा यांच्याशी विस्तृत चर्चा केली. कामठी शहरातील अवैध कत्तलखान्यात जनावरांची विशेषत: गार्इंची क्रूरपणे कत्तल केली जाते. कत्तल केल्यानंतर या जनावरांच्या टाकाऊ अवशेषांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. हे अवशेष कामठी शहरातील बागडोर नाल्यात खुलेआम फेकले जातात. या अवशेषाची दुर्गंधी सुटल्याने त्याचा कामठी छावणीतील जवान व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
या कत्तलखान्यातील मांसाची शहरातील प्रमुख मार्गाने वाहतूकही केली जाते. या वाहनातील रक्तमिश्रित पाणी रोडवर सांडते. त्यामुळे नागरिकांच्या धार्मिक भावनाही दुखावल्या जात आहे. या गंभीर प्रकाराची दखल घेऊन डॉ. संदीप कश्यप व विवेक मंगतानी यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात जनहित याचिका दाखल केली होती. या याचिकेवर निवाडा देताना उच्च न्यायालयाने शहरातील अवैध कत्तलखाने शहराबाहेर हटविण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले होते. दरम्यान, या निर्देशांची अंमलबजावणी करण्याची मागणी बावनकुळे यांनी केली.
या प्रकरणी तातडीने योग्य ती कार्यवाही केली जाणार असल्याचे आश्वासन अभिषेक कृष्णा यांनी बावनकुळे यांच्यासह शिष्टमंडळाला दिले. शिष्टमंडळात मनोज चवरे, प्रमोद मानवटकर, बंडू बावनकुळे, श्रीकांत शेंद्रे, विवेक मंगतानी, डॉ. संदीप कश्यप, लालू यादव, गोपाल सिरिया, प्रमेंद्र यादव, रचना बिल्लरवान,, नलिनी रडके, ममता ठाकूर, रंजना कश्यप, सुषमा सिलाम, प्रवीण कोसरे यांच्यासह अन्य कार्यकर्त्यांचा समावेश होता. (प्रतिनिधी)