विद्यार्थ्याचा सदोष मनुष्यवध शेतकऱ्यास चार वर्षे कारावास

By Admin | Updated: June 11, 2015 02:41 IST2015-06-11T02:41:06+5:302015-06-11T02:41:06+5:30

शेताच्या कुंपणातून वीजप्रवाह सोडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका सधन शेतकऱ्यास बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश ...

The defect of the student to four years imprisonment for the homeless farmer | विद्यार्थ्याचा सदोष मनुष्यवध शेतकऱ्यास चार वर्षे कारावास

विद्यार्थ्याचा सदोष मनुष्यवध शेतकऱ्यास चार वर्षे कारावास

नागपूर : शेताच्या कुंपणातून वीजप्रवाह सोडून एका विद्यार्थ्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या एका सधन शेतकऱ्यास बुधवारी अतिरिक्त सत्र न्यायाधीश अशोक धामेचा यांच्या न्यायालयाने चार वर्षे सश्रम कारावास आणि दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
उपासराव विठ्ठलराव बरबटे (५१) असे आरोपी शेतकऱ्याचे नाव असून, तो अरोली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लोहारा येथील रहिवासी आहे.
दुर्गेश श्रावण बरबटे (१७), असे मृताचे नाव होते. तो लोहारा येथीलच रहिवासी होता. अकराव्या वर्गात शिकत होता. तो श्रावण बरबटे यांच्या वंशाचा एकमात्र दिवा होता.
खटल्याची पार्श्वभूमी अशी, घटनेच्या वेळी दुर्गेशचे वडील श्रावण यांची शेती आरोपी उपासराव यांच्या शेताला लागून होती. श्रावण यांची शेती केवळ दोन एकर तर उपासरावची शेती बारा एकर होती. त्याने आपल्या शेतात धानाचे पीक लावले होते. पिकाची नासाडी होऊ नये म्हणून त्याने अवैधरीत्या घातक उपाययोजना केली होती. त्याने आपल्या शेताच्या कुंपणातून विद्युत प्रवाह सोडला होता. त्याने थेट विजेच्या खांबावरून वीजपुरवठा घेतला होता. त्यामुळे त्याने दिवस-रात्र वीजपुरवठा सुरूच ठेवला होता.
२३ आॅक्टोबर २०१३ रोजी सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुर्गेश हा शाळेतून घरी परतल्यानंतर शेतावर काम करीत असलेल्या आपल्या आई-वडिलांना भेटण्यास गेला होता.
शिकवणी वर्गाला जात असल्याचे सांगून तो घराकडे जाण्यास निघाला होता. उपासरावच्या शेतातून जात असताना त्याला कुंपणाचा स्पर्श होऊन जबरदस्त विजेचा धक्का लागला होता. क्षणात घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला होता.
दुर्गेशचे आई-वडील सायंकाळी शेतातून घरी परत गेले असता त्यांना दुर्गेशची सायकल दिसली होती. त्यांनी शिकवणी वर्गात जाऊन चौकशी केली होती. दुर्गेश वर्गात आलाच नसल्याचे त्यांना सांगण्यात आले होते. रात्रभर शोध घेऊनही दुर्गेश कुठेही गवसला नव्हता. दुसऱ्या दिवशी सकाळी तो उपासरावच्या शेतात मृतावस्थेत आढळून आला होता. मृतदेह कुंपणाला अडकलेल्या स्थितीत होता.
दुर्गेशच्या वडिलांच्या तक्रारीवरून अरोली पोलिसांनी भादंविच्या ३०४ कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. उपासरावला अटक केली होती.
न्यायालयात एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले. गुन्हा सिद्ध होऊन आरोपीला शिक्षा सुनावण्यात आली. न्यायालयात सरकार पक्षाच्या वतीने अतिरिक्त सरकारी वकील प्रशांत भांडेकर, संदीप डोंगरे, अ‍ॅड. सतीश रोडे यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: The defect of the student to four years imprisonment for the homeless farmer

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.