व्होट बँकेचे दिवस गेले
By Admin | Updated: May 20, 2014 01:04 IST2014-05-20T01:04:18+5:302014-05-20T01:04:18+5:30
विदर्भाच्या लोकांनी यावेळी ठरवून टाकले होते, या काँग्रेसवाल्यांना अद्दल घडवायचीच. यांची गुर्मी उतरवायची. असा विचार करणार्यांमध्ये परंपरागत काँग्रेसला मतदान करीत आलेले

व्होट बँकेचे दिवस गेले
गडकरीपर्व सुरू : मार्केटिंगमध्ये काँग्रेसने मार खाल्ला
मोरेश्वर बडगे - नागपूर
विदर्भाच्या लोकांनी यावेळी ठरवून टाकले होते, या काँग्रेसवाल्यांना अद्दल घडवायचीच. यांची गुर्मी उतरवायची. असा विचार करणार्यांमध्ये परंपरागत काँग्रेसला मतदान करीत आलेले लोकही होते. निवडणुकीची सारी गणितं मोडित काढणारी ही निवडणूक होती. तुम्ही मतदानाचा तपशील पाहा. मुस्लीम, दलितांचीही मते युतीला गेली. हे प्रथमच घडले आणि एकेकाळी काँग्रेसचा गड मानल्या जाणार्या विदर्भात दोन्ही काँग्रेसचा सुपडा साफ झाला. वºहाडी भाषेत बोलायचे झाले तर काँग्रेसचे भोंगाडे वाजले. या निवडणुकीने दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत. विदर्भात नितीन गडकरींचे राज्य सुरू झाले आहे आणि दोन्ही काँग्रेस अनाथ आहेत. कुणी वालीच नाही. विधानसभा निवडणुका पाच महिन्यावर आल्या आहेत. काही अपवाद सोडले तर बहुतेक विधानसभा मतदारसंघात युतीला मोठा लीड आहे. लोकसभा निवडणुकीचे वातावरण असेच राहिले तर, विधानसभा निवडणुकाही युतीच्या खिशात जातील. चार-सहा महिन्यांत वातावरण बदलत नाही असा अलीकडेच राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि दिल्ली या चार राज्यांमध्ये झालेल्या निवडणुकांचा अनुभव आहे. एका अर्थाने दोन्ही काँग्रेससाठी धोक्याची घंटा वाजली आहे. गाडून उचलून पायी चालायची प्रॅक्टिस केली तरच काँग्रेसवाल्यांची धडगत आहे. लोकांमधील या खदखदत्या आक्रोशाला नरेंद्र मोदींनी वाट करून दिली आणि कधी ऐकले नाही, अशा मताधिक्क्याने युतीचे दहाच्या दहा उमेदवार निवडून आले. यवतमाळहून शिवसेनेच्या भावना गवळी सोडल्या तर युतीचे बाकी नऊच्या नऊही उमेदवार लाख-दीड लाखापेक्षा अधिक मताधिक्क्याने विजयी झाले आहे. भाजपचे माजी राष्टÑीय अध्यक्ष नितीन गडकरी तर २ लाख ८४ हजाराच्या लीडने जिंकले. नागपुरातल्या सार्या उमेदवारांची बेरीज केली तरी ती गडकरीपर्यंत पोहोचत नाही. गडकरींनी ५४ टक्के मते घेतली. नागपूरच्या इतिहासात पहिल्यांदाच कुणी एवढी मते घेतली. गडकरींचा सामना कुण्या लिंबटिंबूशी नव्हता. नागपुरातून गेल्या चार निवडणुका ओळीने जिंकत आलेल्या विलास मुत्तेमवारांना गडकरींनी आपल्या पहिल्याच लोकसभा निवडणुकीत लोळवले. गडकरी नेहमी मागच्या दाराने जातात, अशी टीका त्यांचे विरोधक करीत असत. या टीकाकारांना गडकरींनी चोख उत्तर दिले. बापूजी अणे, जांबुवंतराव धोटे, बनवारीलाल पुरोहित हे तीन अपवाद सोडले तर नागपूरची निवडणूक काँग्रेसवालेच जिंकत आले. ‘नागपुरात काँग्रेसचा सूर्य मावळत नाही’, असे कालपर्यंत बोलले जात होते. दलित आणि मुसलमानांचा व्होटिंग पॅटर्न बदलला आहे. व्होट बँकेचे दिवस आता राहिले नाहीत, हा नवा सिद्धांत हा निकाल सांगून जातो. मोदी लाट असती तर विरोधक एवढे गाफिल राहिले नसते. स्वत:ला पोलपंडित म्हणवणार्या समीक्षकांना बदललेल्या हवेचा अंदाज कसा आला नाही? हे आश्चर्य आहे. विकास, वाढत्या शेतकरी आत्महत्या किंवा भ्रष्टाचार किंवा इतर कुठल्या एका मुद्यावर ही निवडणूक झाली नाही. यावेळी दोन्ही बाजूच्या उमेदवारांनी दाबून पैसा खर्च केला. कुठून पैसा येत होता कुुणाला ठाऊक. पण शक्तिप्रदर्शनात दोन्ही छावण्या लबालब होत्या. धनशक्तीचे आयपीएल सर्वत्र खेळले गेले. कार्यकर्त्यांची मजा झाली. पण पैसा चालला नाही; जात, पोटजात धावली नाही. सारी खदखद साचून मोदींच्या माध्यमातून बाहेर आली. लोक कंटाळले होते. लोकांना बदल पाहिजे होता. काँग्रेस सोडून कुणीही त्यांना चालत होते. हेच प्रफुल्ल पटेल भाजपच्या तिकिटावर उभे असते तर आरामात जिंकले असते. प्रफुल्लभार्इंनी विकास खेचून आणला नाही, असे म्हणण्याचे धाडस त्यांचे विरोधकही करणार नाहीत. त्यांनी प्रकल्प आणले. तरीही आपटले. जनतेने तिसरा डोळा उघडला होता. काँग्रेसने किंवा पृथ्वीराजबाबांच्या सरकारने विकासाची काहीच कामे केली नाहीत, असे नाही. झुडपी जंगलाचा ५० वर्षे जुना प्रश्न सरकारने मार्गी लावला. गोसेखुर्द धरणग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी पैसा ठेवला. आपल्या कामांचे मार्केटिंग सरकारला आणि दोन्ही काँग्रेसला करता आले नाही. मोदींनी नेमकी ही नाजूक नस पकडली होती. एक चंद्रपूर सोडले तर, पक्षविरोधी कारवाया केल्या म्हणून आम्ही पडलो, असे या निवडणुकीत कुणी म्हणणार नाही. नागपूर, अकोला, बुलडाणा, रामटेक, अमरावती, चंद्रपूर, यवतमाळ, गडचिरोली या जागा काँग्रेस आघाडीने पहिल्याच दिवशी गमावल्या होत्या. पण वर्धा आणि गोंदिया काँग्रेससाठी शुअरशॉट असल्याचे विरोधकही खासगीत बोलून दाखवत. तडस निवडून येतील, असा दावा भाजपवालेही करीत नव्हते. रामदास तडस यांचे पहिले दहा दिवस तर ‘आपण डमी उमेदवार नाही’, हे सांगण्यातच गेले. मोदींची सभा झाली आणि तडस यांच्यातला ‘पहेलवान’ तावात आला आणि दोन लाखाच्या लीडने धोबीपछाड केले. आपल्या मुलाच्या जागी दत्ता मेघे उभे झाले असते तरी निकाल वेगळा लागला नसता. लहरीपणासाठी प्रसिद्ध वर्धा लोकसभा मतदारसंघात मार्क्सवाद औषधालाही सापडत नाही. पण १९९१ च्या निवडणुकीत मार्क्सवादी पक्षाचे घंगारे काका काँग्रेसचे दिग्गज बापूसाहेब साठे यांना हरवून विजयी झाले.