रस्त्यांवर कायम राहणार अंधार
By Admin | Updated: July 18, 2014 01:27 IST2014-07-18T01:05:43+5:302014-07-18T01:27:13+5:30
रस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी जिल्ह्यात २९ हजार पथदिवे लावण्यात येणार आहेत. परंतु केवळ २७०० पथदिव्यांसाठीच पैसे देण्यात आले आहेत. परिणामी रस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी अजून अनेक

रस्त्यांवर कायम राहणार अंधार
लागणार होते २९ हजार पथदिवे : पैसे मिळाले २७०० पथदिव्यांचे
कमल शर्मा - नागपूर
रस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी जिल्ह्यात २९ हजार पथदिवे लावण्यात येणार आहेत. परंतु केवळ २७०० पथदिव्यांसाठीच पैसे देण्यात आले आहेत. परिणामी रस्त्यांवरील अंधार दूर करण्यासाठी अजून अनेक वर्षे वाट पाहावी लागणार आहे. ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी मात्र जिल्ह्यातील पथदिव्यांसाठी अधिकाधिक निधी देण्यासाठी प्रयत्न करण्याचा दावा केला आहे.
महापालिका क्षेत्र सोडून पूर्ण जिल्ह्यात वीज वितरण कंपनी महावितरण मार्फत पथदिवे लावले जातात. जिल्हा नियोजन समितीकडून (डीपीसी) मिळालेल्या निधीमधून हे काम केले जाते. परंतु मागील काही वर्षांपासून यासाठी निधीची मोठी अडचण निर्माण झाली आहे. यंदाच्या वित्तीय वर्षात जिल्ह्यातील नगरपालिका आणि ग्रामपंचायतींकडून मिळालेल्या प्रस्तावांनुसार महावितरणने २९ हजार पथदिव्यांना मंजुरी प्रदान केली होती. यापैकी १८,८१९ पथदिवे लावण्यात आले आहेत. १०,१८१ पथदिव्यांचे काम अजूनही सुरु झालेले नाही. यासाठी ११ कोटी रुपयांची गरज आहे. परंतु जिल्हा नियोजन समितीकडून केवळ ३ कोटी रुपये उपलब्ध झाले आहे. या रुपयांमधून केवळ २७०० पथदिवे लावले जाऊ शकतात. अशा परिस्थितीत निधीअभावी जिल्ह्यातील पथदिव्यांचे काम जवळपास ठप्प पडले आहे. महावितरणचे अधीक्षक अभियंता अरविंद भादीकर यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, त्यांना निधी न मिळाल्यास ते काम पूर्ण करू शकणार नाही. दुसरीकडे उर्वरित पथदिव्यांसाठी राज्य सरकारकडून ८ कोटी रुपयांचा निधी तातडीने उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री राजेंद्र मुळक यांनी स्पष्ट केले आहे. (प्रतिनिधी)