सायकलिंग आरोग्यासाठी लाभदायक
By Admin | Updated: September 23, 2014 01:07 IST2014-09-23T01:07:21+5:302014-09-23T01:07:21+5:30
सायकलमुळे इंधनाची बचत होते, प्रदूषणही होत नाही शिवाय आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे, हा संदेश इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) , जनआक्रोशन, इसाफ, हॉक रायडर्स, सॅडलअप गाईज

सायकलिंग आरोग्यासाठी लाभदायक
नागपूर : सायकलमुळे इंधनाची बचत होते, प्रदूषणही होत नाही शिवाय आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे, हा संदेश इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) , जनआक्रोशन, इसाफ, हॉक रायडर्स, सॅडलअप गाईज व आॅरेंजर्सच्या वतीने देण्यात आला. जागतिक ‘कार फ्री डे’च्या निमित्ताने सोमवारी पहाटे शहरात सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅलीचा शुभारंभ उत्तर अंबाझरी मार्गावरील आयएमए येथून झाला. यावेळी हिरवी झेंडी आयएमए मुख्यालयाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष डॉ. मिलिंद नाईक, माजी राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. अशोक अढाव, आयएमए नागपूर शाखेचे अध्यक्ष डॉ. संजय देशपांडे, सचिव डॉ. कुश झुनझुनवाला, जनआक्रोशचे ज्येष्ठ सदस्य अशोक करंदीकर, अध्यक्ष डॉ. अनिल लद्धड व सचिव रवींद्र कासखेडीकर यांच्या उपस्थितीत दाखविण्यात आली. रॅली आयएमए येथून निघून अलंकार टॉकीज चौक, व्हीआयपी मार्ग, बोले पेट्रोल पंप चौक, जीपीओ चौक, आकाशवाणी चौक, संविधान चौक, व्हेरायटी चौक, झासी राणी चौक, विद्यापीठ ग्रंथालय चौक ते आयएमए येथे पोहोचली. विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसोबतच स्वयंस्फूर्तीने शेकडो नागरिक यात सहभागी झाले होते.
दरम्यान रॅलीच्या प्रारंभप्रसंगी डॉ. अढाव यांनी मार्गदर्शन केले. ते म्हणाले, सायकलिंग हा अतिशय चांगला आणि उपयोगी व्यायामप्रकार आहे. सायकलीला पेट्रोल लागत नाही, देखभालीसाठी फार खर्चही लागत नाही आणि प्रदूषण एकदम शून्य! पण या सर्व कारणांशिवायही उत्तम कारण म्हणजे सायकलिंग आरोग्यासाठी अतिशय लाभदायक आहे. याला जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचविण्यासाठी डॉक्टरांनी आपल्या वसाहतीत सायकल चालवावी. यामुळे त्याचा प्रभाव दिसून येईल. डॉ. लद्धड म्हणाले, सायकलमुळे इंधनाची बचत होतेच, शिवाय प्रदूषणही होत नसले तरी आता सायकली फारशा दिसत नाही.
तंदुरु स्त राहण्यासाठी प्रत्येकाने सायकल चालवायला हवी. यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही सुधारेल. डॉ. देशपांडे म्हणाले, सायकल चालविण्याने वजन कमी होण्यास मदत होते. पाठीच्या मणक्याशेजारील स्नायूची शक्ती वाढून सुधारते. हृदयाची कार्यक्षमता फुप्फुसाची श्वास घेण्याची क्षमता वाढीला लागते. मनातील ताणतणाव, चिडचिड आणि नैराश्य दूर होते. शरीरातील सर्व स्नायू कार्यरत होऊन शक्तिवान होतात. प्रास्ताविक कासखेडीकर यांनी केले. (प्रतिनिधी)