ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे
By Admin | Updated: December 26, 2014 00:48 IST2014-12-26T00:48:38+5:302014-12-26T00:48:38+5:30
ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी ग्राहक संघटनांनी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी केले.

ग्राहकांचे प्रबोधन होणे गरजेचे
राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे प्रतिपादन
नागपूर : ग्राहकांचे हित लक्षात घेऊन त्यांच्यात जागृती निर्माण करण्यासाठी ग्राहक संघटनांनी त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन अतिरिक्त जिल्हाधिकारी पंजाबराव वानखेडे यांनी केले.
राष्ट्रीय ग्राहक दिनानिमित्त ग्राहक हितासंदर्भातील विषयावर सरपंच भवन येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हा ग्राहक तक्रार निवारण न्याय मंचाचे अध्यक्ष मनोहर चिलबुले, प्रमुख अतिथी म्हणून पुरवठा विभागाचे उपायुक्त रमेश मावस्कर, जिल्हा पुरवठा अधिकारी रमेश वंजारी, अन्नधान्य वितरण अधिकारी रमेश बेंडे आणि लीलाधर वार्डेधर व्यासपीठावर उपस्थित होते.
ग्राहकांचे हित सांभाळताना त्यांना कसा न्याय देता येईल, याचा विचार आवश्यक आहे. ग्राहक चळवळ पुढे नेण्यासाठी त्यावर विचारमंथन झाले तरच ग्राहक दिन साजरा करण्याचे औचित्य साध्य होईल. आता काळानुरूप ग्राहकांमध्ये प्रचंड बदल झाला आहे. आता ग्राहकांच्या फसवणुकीच्या प्रकारामध्येही बदल झाला असून, आॅनलाईन फसवणुकीचे प्रकार वाढत असल्याचे आपल्या निदर्शनास येत आहे. त्यासाठी ग्राहक दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात विविध ध्येधोरणे, सूचना, अभिप्राय, उपाययोजना येणे अपेक्षत असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी उमरेड येथील लोकमान्य क्रिएशन्सकडून ग्राहकांच्या हितावर आधारित पथनाट्याचे सादरीकरण करण्यात आले. दीपप्रज्वलनाने कार्यक्रमाचा सुरूवात झाली. संचालन जी.डी. निशनकर यांनी तर आभार रमेश बेंडे यांनी मानले. यावेळी विभागाचे अधिकारी, विविध ग्राहक संरक्षण संघटनेचे पदाधिकारी तसेच नागरिक उपस्थित होते.(प्रतिनिधी)