लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशोत्सव आणि आगामी सणांमध्ये कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होऊ नये या दृष्टीने शहर पोलिसांनी परिमंडळ २ मधील सहा पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या ५० कुख्यात गुन्हेगारांना तडीपार केले आहे. गणेशोत्सव होईपर्यंत १३ दिवस त्यांना नागपूर शहर व ग्रामीणच्या हद्दीतून तडीपार करून आहे. नातेवाईकांकडे सोडण्यात आले
शहर पोलिसांनी परिमंडळ २ अंतर्गत येणाऱ्या धंतोली, सीताबर्डी, अंबाझरी, सदर, गिट्टीखदान व मानकापूर अशा एकूण ६ पोलिस ठाण्याच्या हद्दीत गंभीर स्वरूपाचे गुन्हे, शरीराविरुद्ध व मालमत्तेविरुद्ध गुन्हे दाखल असलेले, वारंवार कायदेशीर कारवाई करूनही प्रवृत्तीत सुधारणा न झालेले, अवैध दारू विक्री करणाऱ्या एकूण ५० गुन्हेगारांविरुद्ध परिमंडळ २ च्या उपायुक्तांकडे हद्दपार करण्याचा प्रस्ताव सादर केला होता.
परिमंडळ २ च्या उपायुक्तांनी त्यांना विशेष कार्यकारी दंडाधिकारी पदाच्या कलम १६३ (२) नुसार असलेल्या अधिकाराचा वापर केला. त्यानुसार ७ ऑगस्ट २०२५ रोजी धंतोली पोलिस ठाण्यांतर्गत ७, सीताबर्डी पोलिस ठाण्यांतर्गत ६, अंबाझरी पोलिस ठाण्यांतर्गत ११, सदर पोलिस ठाण्यांतर्गत १७, गिट्टीखदान पोलिस ठाण्यांतर्गत ४ व मानकापूर पोलिस ठाण्यांतर्गत ५ अशा एकूण ५० गुन्हेगारांना नागपूर शहर व ग्रामीण हद्दीतून १३ दिवसांसाठी तडीपार करण्याचा आदेश पारित केला. या गुन्हेगारांना बुधवारी २७ ऑगस्ट २०२५ रोजी त्यांच्या नातेवाईकांकडे सोडण्यात आले आहे.