कमी उत्पादनातही कापूस बाजारात मंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2021 04:10 IST2021-01-03T04:10:18+5:302021-01-03T04:10:18+5:30
सुनील चरपे लाेकमत न्यूज नेटवर्क नागपूर : राज्यात चालू खरीप हंगामामध्ये मागील व त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत कापसाच्या उत्पादनात ...

कमी उत्पादनातही कापूस बाजारात मंदी
सुनील चरपे
लाेकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात चालू खरीप हंगामामध्ये मागील व त्या आधीच्या वर्षांच्या तुलनेत कापसाच्या उत्पादनात ३० ते ३८ टक्के घट आली आहे. मात्र, बाजारात कापसाच्या दरात तेजीऐवजी मंदीचे सावट निर्माण झाले आहे. व्यापारी किमान आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने कापसाची खरेदी करीत असल्याने बहुतांश शेतकरी कापूस विक्रीसाठी ‘सीसीआय’ (काॅटन काॅर्पाेरेशन ऑफ इंडिया) आणि महाराष्ट्र कापूस पणन महासंघाच्या खरेदी केंद्राला प्राधान्य देत आहेत.
महाराष्ट्रात (काेकण विभाग वगळता) सन २०२०-२१च्या खरीप हंगामात एकूण ४२ लाख ३४ हजार ६५ हेक्टरमध्ये कपाशीची लागवड करण्यात आली. राज्यातील कापसाची एकूण उत्पादकता एक काेटी गाठींची असली तरी यावर्षी ४२५ लाख क्विंटल कापसाचे उत्पादन हाेणार असल्याचा अंदाज व्यक्त केला जात हाेता. वास्तवात, गुलाबी बाेंडअळीचा प्रादुर्भाव व प्रतिकूल हवामानामुळे यावर्षी कापसाचे उत्पादन ३१५ लाख क्विंटलपेक्षा अधिक हाेणार नसल्याचे तज्ज्ञांनी सांगितले. मागील वर्षी राज्यात ८५ लाख गाठी कापसाचे उत्पादन झाले हाेते. यावर्षी ते ६७ लाख गाठींवर आले आहे.
‘लाॅकडाऊन’ काळात निर्माण झालेला कापूस खरेदीचा पेच लक्षात घेता यावर्षी ‘सीसीआय’ व कापूस पणन महासंघाने खरेदी केंद्र सुरू करताना विशेष काळजी घेतली. ‘सीसीआय’ने राजकीय दबाव निर्माण हाेत असलेल्या ठिकाणी खरेदी केंद्र सुरू करणे टाळले. सध्या राज्यात ‘सीसीआय’ ९०, तर कापूस पणन महासंघ ५५ केंद्रांच्या माध्यमातून शेतकऱ्यांकडील कापसाची खरेदी करीत आहेत. ३१ डिसेंबर २०२०पर्यंत ‘सीसीआय’ने राज्यात ६५ लाख १६ हजार क्विंटल, तर कापूस पणन महासंघाने २३ लाख क्विंटल कापसाची खरेदी केली आहे. या दाेन्ही संस्थांनी राज्यात मागील वर्षीच्या तुलनेत ३१ डिसेंबर २०२० पर्यंत साडेतीन पट अधिक कापसाची खरेदी केली आहे. या खरेदी केंद्रांवर कापूस विकताना फारसा त्रास हाेत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
.....
शासनाची खरेदी आधारभूत किमतीपेक्षा कमी दरात
केंद्र शासनाने मध्यम धाग्याच्या कापसाची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५,५१५ रुपये, तर लांब धाग्याच्या कापसाची किंमत प्रतिक्विंटल ५,८२५ रुपये जाहीर केली आहे. व्यापारी प्रतिक्विंटल ५,३०० रुपये ते ५,६०० रुपये दराने कापसाची खरेदी करीत आहेत. ‘सीसीआय’ व कापूस पणन महासंघाने ३१ डिसेंबर २०२० पर्यंत प्रतिक्विंटल ५,७२५ ते ५,७७५ रुपये दराने कापसाची खरेदी केली. हा दर किमान आधारभूत किमतीपेक्षा ५० ते १०० रुपये प्रतिक्विंटल कमी आहे. शासनाच्या दाेन्ही संस्था सध्या प्रतिक्विंटल ५,७२५ रुपये, ५,६६२ रुपये, ५,६०२ रुपये व ५,५४४ रुपये दराने कापसाची खरेदी करीत आहेत. हाही दर किमान आधारभूत किमतीच्या प्रतिक्विंटल १०० ते २८१ रुपयांनी कमी आहे.
.....
निकषाच्या आधारे खरेदी
‘सीसीआय’ व कापूस पणन महासंघ १३ निकष लावून कापसाची खरेदी करतात. कापसाचा दर्जा, धाग्याची लांबी (स्टेपल), ओलावा यासह अन्य बाबी विचारात घेतल्या जातात. या सर्व निकषांमध्ये यंदाचा कापूस तंताेतत बसत नसल्याने या शासकीय संस्थांनी कापसाचा दर कमी केला आहे. या संस्था सध्या चार वेगवेगळ्या ‘ग्रेड’ने कापूस खरेदी करीत असल्याने यावर्षी खरेदी केंद्रावर कापूस नाकारण्याचे प्रमाण कमी झाले आहे.
...
‘सीसीआय’ व कापूस पणन महासंघामुळे कापसाचे दर सध्या स्थिर व टिकून आहेत. याचा अधिकाधिक शेतकऱ्यांना फायदा मिळवून देण्यासाठी दाेन्ही संस्थांनी त्यांची खरेदी केंद्रे वाढविणे गरजेचे आहे. त्यांच्याकडे कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने खरेदी केंद्रे वाढविण्यावर बंधने आली आहेत.
- गाेविंद वैराळे, माजी सरव्यवस्थापक,
महाराष्ट्र कापूस पणन महासंघ.
.....
शासनाने कापसाची किमान आधारभूत किंमत प्रतिक्विंटल ५,८२५ रुपये जाहीर केली आहे. ‘सीसीआय’ व कापूस पणन महासंघ यापेक्षा कमी दरात खरेदी करीत आहे. या ‘ग्रेड’चा व आधारभूत किमतीचा काही संबंध नाही. यात शेतकऱ्यांचे नुकसान हाेत असल्याने या शासकीय संस्थांनी कापसाची किमान आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी करायला पाहिजे.
- मधुसूदन हरणे,
शेतकरी तथा संचालक, कृऊबास, हिंगणघाट, जिल्हा वर्धा
...