लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात ९ मार्चला पहिल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ तीन होती. ३१ मार्चपर्यंत बाधितांची संख्या दर दिवसाला १ ते २७ च्या दरम्यान होती. मात्र एप्रिल महिन्याच्या १ ते २ तारखेच्या दरम्यान रोजच्या रुग्णांत वाढ होऊन ती १०० वर गेली. १० एप्रिलनंतर रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या २०० वर होती; आता तर रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे.आरोग्य विभागाने दर दिवसाला नोंद होणाऱ्या ‘कोविड-१९’ रुग्णांची आकडेवारी उपलब्ध करून दिली असता, वैद्यकीय शिक्षण व औषध विभागाने ९ मार्च ते १४ एप्रिलदरम्यान नोंद झालेल्या रुग्णांचे विश्लेषण केले. यात रोजच्या रुग्णात होत असलेल्या धक्कादायक वाढीचे वास्तव समोर आले आहे. राज्यात पहिल्या तीन कोरोनाबाधितांची नोंद ९ मार्च रोजी झाली. त्यानंतर ११ मार्च रोजी ११ रुग्ण आढळून आले. १३ मार्च रोजीही एवढ्याच रुग्णांची नोंद होती. १५ मार्च रोजी रुग्णसंख्या कमी होऊन ती पाचवर आली. १७ मार्च रोजी आणखी रुग्णसंख्या घसरून दोनवर आली. १९ मार्चपर्यंत रोज दोन ते तीन रुग्ण आढळून येत होते. २१ मार्च रोजी यात वाढ झाली. त्या दिवशी ११ रुग्ण पॉझिटिव्ह आले. २३ मार्च रोजी रुग्णसंख्या दुपटीने वाढत २३ वर पोहचली. २५ मार्च रोजी रुग्णसंख्या बऱ्यापैकी कमी होऊन दोनवर आली. २७ मार्च रोजी रुग्णात पुन्हा वाढ झाली. २९ मार्च रोजी २२ रुग्ण तर मार्च महिन्याच्या शेवटच्या दिवशी १७ रुग्णांची नोंद झाली. कोरोनाचा प्रभाव एप्रिल महिन्याच्या पहिल्या दिवसापासूनच दिसून येऊ लागला. महिन्याच्या पहिल्याच दिवशी १०० रुग्ण पॉझिटिव्ह आले. ४ एप्रिलपर्यंत कोरोनाबाधितांची रोजची संख्या शंभराच्या आत होती. ५ एप्रिल रोजी रुग्णाची संख्या वाढून ती १४८ वर पोहचली. ९ एप्रिलपर्यंत रोज पॉझिटिव्ह येणाऱ्या रुग्णांची संख्या १५० होती. ११ एप्रिल रोजी मात्र यात वाढ झाली. या दिवशी २२९ रुग्ण आढळून आले.१२ एप्रिल रोजी रोजच्या रुग्णात किंचित घट होऊन ही संख्या १८७ वर पोहचली. परंतु १३ एप्रिल रोजी रोजच्या संख्येत दुपटीने वाढ होऊन एकाच दिवशी ३४४ रुग्ण आढळून आले. विशेष म्हणजे, मार्च महिन्यात रुग्णाची संख्या २२० होती, तर एप्रिल महिन्यात १३ तारखेपर्यंत रुग्णांची संख्या २,१०५ झाली आहे. वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, रुग्णांची वाढती संख्या धोक्याची घंटा आहे. यावर प्रतिबंध घालायचा असेल तर शासनाच्या सूचनांचे पालन करणे हा एकच उपाय आहे. विशेष म्हणजे, घरीच थांबणे, बाधित रुग्णाच्या संपर्कात आल्यास स्वत:हून रुग्णालयात जाणे, आजार न लपविणे, हे महत्त्वाचे ठरेल.
CoronaVirus in Maharashtra : राज्यभरात रोज वाढताहेत २०० वर 'कोरोना' रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2020 19:50 IST
राज्यात ९ मार्चला पहिल्या कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या केवळ तीन होती. १० एप्रिलनंतर रोज नोंद होणाऱ्या रुग्णांची संख्या २०० वर होती; आता तर रुग्णांची संख्या ३०० वर पोहचली आहे.
CoronaVirus in Maharashtra : राज्यभरात रोज वाढताहेत २०० वर 'कोरोना' रुग्ण
ठळक मुद्देमार्चमध्ये २२२ : एप्रिलमध्ये आढळले २००५ रुग्ण