कोरोनाने पती गेले; धुणी-भांडी करून संसार सावरला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:08 IST2021-03-08T04:08:12+5:302021-03-08T04:08:12+5:30
कोरोनाने पती गेले; धुणी-भांडी करून संसार सावरला! शासनाकडून कुठलीही मदत नाही: योजनेच्या लाभापासूनही वंचित लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : ...

कोरोनाने पती गेले; धुणी-भांडी करून संसार सावरला!
कोरोनाने पती गेले; धुणी-भांडी करून संसार सावरला! शासनाकडून कुठलीही मदत नाही: योजनेच्या लाभापासूनही वंचित
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कर्तव्य बजावताना कोरोनाने मृत्यू झाल्यास शासकीय कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेंतर्गत आर्थिक मदत केली जाते, परंतु कंत्राटी वा मजुरी करणाऱ्या व्यक्तीचा कोरोनामुळे मृत्यू झाला, तर कुठल्याही स्वरूपाची मदत मिळत नाही. गेल्या वर्षभरात अशा अनेकांचा मृत्यू झाला. कुटुंबातील कर्ता पुरुष गेल्याने हजारो कुटुंबांचा आधार गेला. मिळतीचे साधन नसलेल्या कुटुंबाची वाताहत झाली आहे. जगायचं कसं, असा गंभीर प्रश्न त्यांच्यापुढे उभा ठाकला आहे. कधी घराबाहेर न पडणाऱ्या महिलांवर कोरोनामुळे संसाराचा गाडा चालविण्याची वेळ आली आहे. अशीच वेळ नागपुरातील नंदनवन स्लम भागात वास्तव्यास असलेल्या ललिता एकनाथ आडे हिच्यावर आली आहे. पती एकनाथ आडे भाड्याचा मेटॅडोर चालवायचे. आठ महिन्यांपूर्वी कोरोनाने त्यांचा मृत्यू झाला. त्यांच्या पत्नी ललिता यांच्यासह वर्षा, अंजली व पार्थ या तीन भावंडांचा आधार गेला. मिळकतीचे दुसरे साधन नाही. शासनाकडून कुठलीही मदत नाही. अशा परिस्थितीत कुटुंबाचा उदरनिर्वाह तीन मुलांचा सांभाळ व त्यांच्या शिक्षणाची जबाबदारी ललिता आडे यांच्यावर आली. वर्षा दहाव्या वर्गात असून, अंजली आठव्या तर पार्थ चौथीत आहे. आलेल्या संकटाचा सामना करण्याची जिद्द आहे. मुलांनी चांगले शिक्षण घ्यावे, ते स्वत:च्या पायावर उभे राहावे, यासाठी मिळेल ती नोकरी व काम करण्याची ललिताची तयारी आहे. स्वयंरोजगारासाठी धडपड सुरू आहे, पण पैसा नाही. त्यात कोरोनामुळे नोकरी मिळेल, याची शाश्वती नाही.
अशा परिस्थिती धुणी-भांडी करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. कोरोनामुळे घरातील कर्ती व्यक्ती गेली असेल, तर अशा निराधार महिलांना स्वयंरोजगारासाठी मदत करण्याची गरज आहे.