राज्यघटना असुरक्षित करणारी परिस्थिती
By Admin | Updated: February 13, 2016 03:02 IST2016-02-13T03:02:13+5:302016-02-13T03:02:13+5:30
महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्याचा लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाविषयी अनेक स्वप्न रंगविले होते.

राज्यघटना असुरक्षित करणारी परिस्थिती
लीलाताई चितळे : मृणाल गोरे परस्पर विनिमय केंद्रातर्फे चर्चासत्र
नागपूर : महात्मा गांधी यांच्या नेतृत्वात अहिंसेच्या मार्गानी स्वातंत्र्याचा लढा दिला. स्वातंत्र्यपूर्व काळात आपल्या देशाविषयी अनेक स्वप्न रंगविले होते. तळागाळातील माणसाच्या सर्वसमावेशक विकासाचा विचार केला होता. मात्र आजची परिस्थिती श्वास कोंडणारी आहे. एकतर्फी राज्यकारभार चालवून लोकभावनेला दाबण्याचा प्रयत्न चाललेला आहे. असहिष्णुता वाढून पुन्हा जातीव्यवस्था बळकट होताना दिसते. अशा घुसमट होणाऱ्या परिस्थितीत राज्यघटना सुरक्षित राहील काय, हा प्रश्न निर्माण झाला असल्याची भावना ज्येष्ठ समाजसेविका लीलाताई चितळे यांनी व्यक्त केल्या.
मृणाल गोरे परस्पर विनिमय केंद्राच्यावतीने ‘अस्वस्थ वातावरण : हिंसा आणि तिची अनेक रूपे’ या विषयाअंतर्गत द्विदिवसीय चर्चासत्राचे आयोजन अमरावती रोडवरील विनोबा विचार केंद्र, सर्वादय आश्रम येथे करण्यात आले आहे. चर्चासत्राच्या उद््घाटन सत्रात अध्यक्ष म्हणून उपस्थित लीलाताई चितळे यांनी दलित, आदिवासी, कामगार यांचे होणारे शोषण आणि देशातील एकूणच परिस्थितीबाबत चिंता व्यक्त करीत सरकारच्या भूमिकेवर जोरदार टीका केली. याप्रसंगी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले व सुरेखा दळवी प्रमुख वक्ते म्हणून उपस्थित होते.
श्रीनिवास खांदेवाले यांनी, भारतीय संस्कृती ही प्रकृतीसोबत चालणारी आहे. मात्र दुसऱ्या जातीधर्माच्या गोष्टी स्वीकारायच्या नाही, असे मानने ही विकृती आहे असे मत व्यक्त केले. समाजात मतभिन्नता असतात, मात्र इतरांचं मत ऐकायचे नाही हे योग्य नाही. दुर्दैवाने सध्या हाच प्रकार सुरू असून ही विकृती संपविल्याशिवाय देश संपन्न होणार नाही, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. सुरेखा दळवी यांनी सामाजिक कुरीती आणि त्याचा उच्छाद मांडणाऱ्यांवर जोरदार टीका केली. परंपरेच्या नावावर अजूनही स्त्रियांचं शोषण सुरू आहे. शनि शिंगणापूर आणि शबरीमाला येथील प्रकार स्त्रीस्वातंत्र्यावरचा मोठा आघात आहे. यातूनच स्त्री-पुरुष अशा लिंगभेदाच्या विखारी विचारांना बळ मिळत असून ही संकुचित मनोवृत्ती आजच्या काळात समानतेला आव्हान देणारी असल्याचे टीका दळवी यांनी केली. उद््घाटन सत्राचे प्रास्ताविक आणि संचालन विलास भोंगाडे यांनी केले.(प्रतिनिधी)