भाजपा-शिवसेनेला ताकद देणे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भोवले
By Admin | Updated: May 21, 2014 01:01 IST2014-05-21T01:01:43+5:302014-05-21T01:01:43+5:30
राज्यात लोकसभेच्या दोन डझनावर जागी विजयाचे स्वप्न पाहणार्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना धड आपला यवतमाळ हा गृहजिल्हाही सांभाळता आला नाही.

भाजपा-शिवसेनेला ताकद देणे काँग्रेस प्रदेशाध्यक्षांना भोवले
यवतमाळ : राज्यात लोकसभेच्या दोन डझनावर जागी विजयाचे स्वप्न पाहणार्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांना धड आपला यवतमाळ हा गृहजिल्हाही सांभाळता आला नाही. त्यांच्या या जिल्ह्यात राज्यातील दोन कॅबिनेट मंत्री पराभूत झाले. पुत्रप्रेमापोटी भाजपा-शिवसेनेला ताकद देण्याची खेळी काँग्रेसवरच उलटली. यवतमाळ जिल्ह्यात सात पैकी पाच आमदार काँग्रेसचे आहे. खुद्द प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे या जिल्ह्याचे आहेत. मात्र त्यानंतरही त्यांना येथे काँग्रेस उमेदवारांना मतांची आघाडी मिळवून देता आलेली नाही. यवतमाळ-वाशिममधून काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघे तर चंद्रपुरातून सांस्कृतिक मंत्री संजय देवतळे अनुक्रमे ९३ हजार व २ लाख ३६ हजार मतांनी पराभूत झाले. प्रदेशाध्यक्ष माणिकरावांनी यवतमाळ जिल्ह्यात स्थानिक व सोईच्या राजकारणापोटी विरोधी पक्षाला ताकद देण्याचा प्रयत्न केला. आपला परंपरागत विधानसभा मतदारसंघ आपल्यासाठी रिकामा व्हावा म्हणून शिवसेनेतच लोकसभेचा दुसरा उमेदवार पुढे करण्याची खेळीही पडद्यामागून माणिकरावांनीच खेळली होती. मात्र ‘मातोश्री’वरून प्रतिसाद न मिळाल्याने ही खेळी फसली. जिल्हा परिषदेमध्ये शिवसेनेच्या दोन बंडखोर सभापतींना तर यवतमाळ नगरपरिषदेमध्ये भाजपाच्या बंडखोर नगराध्यक्षाला ताकद देण्याची खेळी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष वामनराव कासावार यांनी खेळली. मात्र या खेळीचे मास्टर मार्इंड माणिकराव ठाकरेच होते. नेमकी हीच खेळी काँग्रेसच्या अंगलट आली. लोकसभा निवडणुकीत यवतमाळ शहराची सूत्रे बंडखोर नगराध्यक्षांच्या हाती दिल्याने आणि जिल्हा परिषदेत काँग्रेस पदाधिकार्याऐवजी सेनेच्या बंडखोर सभापतींना जवळ केले जात असल्याने निष्ठावंत काँग्रेस कार्यकर्ते दुखावले. मंत्र्यांची भेट न मिळणे, कामे न होणे, पद-सन्मान न मिळणे, कंत्राटदार-दलालांचा सतत गराडा, पीएंकडून मिळणारी उद्धट वागणूक आदी कारणांनी काँग्रेस कार्यकर्ते दुखावले. त्याचाच फटका लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला बसला. माणिकरावांच्या नेतृत्वात राज्यात सर्वत्रच काँग्रेस माघारली. मी पाच वर्षे काँग्रेस जीवंत ठेवली असे सांगणार्या माणिकरावांनी लोकसभा निवडणुकीत मात्र काँग्रेस अक्षरश: मातीत घातली. माणिकराव आणि त्यांच्या मर्जीतील प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश यांनी राज्यात काँग्रेसचे जणू वाटोळे केले. जेथे गृहजिल्ह्यातच माणिकराव काँग्रेसला तारु शकले नाही तेथे अन्य जिल्ह्यात दुरवस्था झाली तर त्यात गैर काय, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात माणिकराव मुलाच्या उमेदवारीसाठी इच्छुक होते. मात्र तिकीट न मिळाल्याने संपूर्ण गट नाराज झाला. माणिकरावचे कार्यकर्ते काँग्रेसच्या व्यासपीठावर केवळ शरीराने दिसत होते. त्यांची ही नाराजी मोघेंना महागात पडली. माणिकरावांनी सुरुवातीपासूनच सरकार अर्थात मुख्यमंत्र्यांच्या विरोधात छुप्या हालचाली केल्या. लोकसभा निकालानंतरसुद्धा नारायण राणेंच्या भेटीआडून आणखी एक पत्ते फेकून पाहिले. मात्र त्यात त्यांना यश आले नाही. सहा वर्षे प्रदेशाध्यक्षपद सांभाळूनही माणिकरावांना आपल्या गृहजिल्ह्यासह राज्यात पक्षाची ताकद वाढविता आलेली नाही. यवतमाळ जिल्ह्यातील दिग्रस या आपल्या परंपरागत म्हणविणार्या विधानसभा मतदारसंघात शिवसेनेला तब्बल २७ हजार मतांची आघाडी मिळाली. त्यामुळे माणिकराव ठाकरे आणि प्रदेश प्रभारी मोहन प्रकाश पदावर आणखी कायम राहिल्यास आगामी विधानसभा निवडणुकीतही काँग्रेसचे पानिपत निश्चित मानले जात आहे. माणिकरावांना हटवा आणि विधानसभा वाचवा, असा सूर काँग्रेसच्या गोटातून ऐकायला मिळत आहे. (जिल्हा प्रतिनिधी)