नोटाबंदीवरून काँग्रेसने केली घेराबंदी

By Admin | Updated: January 7, 2017 02:38 IST2017-01-07T02:38:19+5:302017-01-07T02:38:19+5:30

नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाची घेराबंदी केली.

Congress sacked by Naxals | नोटाबंदीवरून काँग्रेसने केली घेराबंदी

नोटाबंदीवरून काँग्रेसने केली घेराबंदी

जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक : पंतप्रधान मोदींच्या पुतळ्याचे दहन
नागपूर : नोटाबंदीच्या विरोधात काँग्रेसने आक्रमक भूमिका घेत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयाची घेराबंदी केली. शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. जिल्हाधिकारी कार्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार पोलिसांनी बंद केल्यामुळे कार्यकर्त्यांनी सभोवताल कार्यालयाला घेरले. नोटाबंदी विरोधात नारेबाजी करीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. आंदोलनादरम्यान पोलीस व कार्यकर्त्यांत बाचाबाची झाली. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी पोलिसांना काहीअंशी बळाचा वापर करावा लागला.
सकाळी ११.३० च्या सुमारास नोटाबंदी विरोधात घोषणा लिहिलेले फलक घेऊन काँग्रेस कार्यकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जमण्यास सुरुवात झाली. कार्यकर्त्यांची वाढती संख्या पाहून पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाणारे बाहेरील सर्व प्रवेशद्वार बंद केले. शहर अध्यक्ष विकास ठाकरे, माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, अ.भा. काँग्रेस समितीचे निरीक्षक डॉ. हिमांशू पटेल आदींनी या द्वारबंदीला विरोध केला. मात्र, पोलीस गेट उघडण्यास तयार नसल्यामुळे कार्यकर्त्यांची पोलिसांसोबत बाचाबाची झाली. यावेळी गेट तोडण्याचा प्रयत्न करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी पांगविण्याचा प्रयत्न केला. शेवटी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी १५ पदाधिकाऱ्यांना आत सोडण्यात आले.
नोटाबंदी नंतर बँकेच्या व एटीएम समोरील रांगेत नागरिकांचा मृत्यू झाला. यासाठी जबाबदार कोण, सद्यस्थितीत जिल्ह्यातील एटीएम समोरील रांगा संपल्या आहेत का, एटीएममधून पैसे मिळत आहेत का, नसतील तर यासाठी जबाबदार कोण आहे, नोटाबंदीनंतर नागरिकांनी जिल्ह्यातील विविध बँकांमध्ये ५०० व १००० रुपयांच्या किती नोटा जमा केल्या, शहर व जिल्ह्यात कोणत्या बँकेचे किती एटीएम आहेत, यापैकी किती एटीएम २४ तास सुरू आहेत. जिल्ह्यात किती काळा पैसा उघडकीस आला, त्यांची नावे जाहीर करावी, आदी मागण्या निवेदनात करण्यात आल्या. आंदोलनात विशाल मुत्तेमवार, अभिजित वंजारी, उमाकांत अग्निहोत्री, नगरसेवक प्रशांत धवड, संजय महाकाळकर, यशवंत मेश्राम, गजराज हटेवार, राजू व्यास, राजू महाजन, संदेश सिंगलकर, विजय बाभरे, जयंत लुटे, नगरसेविका नयना झाडे, रेखा बाराहाते, विद्या लोणारे, उज्ज्वला बनकर, सरस्वती सलामे, प्रज्ञा बडवाईक, संध्या ठाकरे, आशा कुर्वे, माया घोरपडे, भाऊराव कोकणे, आकाश तायवाडे, प्रकाश फुके, सुधाकर बोरकर यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.(प्रतिनिधी)

टोलमाफीच्या धर्तीवर शेतकऱ्यांना मोबदला द्या
नोटबंदीच्या काळात टोल नाक्यांवर वाहनांना सवलत देण्यात आली.त्या बदल्यात कोट्यवधी रुपये टोलनाका संचालकांना देण्यात येणार आहेत. नोटबंदीमुळे शेतकऱ्यांचेही मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. टोल नाक्यांच्या धर्तीवर शेतकऱ्यांनाही मोबदला द्यावा, अशी मागणी विकास ठाकरे यांनी केली.
कार्यकर्ते पोहचले जिल्हधिकाऱ्यांच्या कक्षासमोर
काँग्रेस कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. मात्र, काँग्रेस कार्यकर्ते आंदोलनाच्या वेळेच्या तासभरापूर्वीच कुठलाही गाजावाजा न करता जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात दाखल झाले. दोन तासाच्या आंदोलनानंतर शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांच्या नेतृत्वात निवडक पदाधिकाऱ्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यासाठी आत सोडण्यात आले. शिष्टमंडळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कक्षात पोहचताच कक्षाबाहेरील वऱ्हाड्यांत काँग्रेसचे सुमारे ४०० वर कार्यकर्ते एकाएकी गोळा झाले. यामुळे पोलिसांची तारांबळ उडाली.

 

Web Title: Congress sacked by Naxals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.