शहर काँग्रेसने आखला 'अँक्शन प्लान'

By Admin | Updated: May 9, 2014 02:32 IST2014-05-09T02:32:38+5:302014-05-09T02:32:38+5:30

लोकसभा निवडणुकीनंतर सुस्तावलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी शहर काँग्रेसने 'अँक्शन प्लान'आखला आहे. या प्लाननुसार येत्या काळात नागरिकांचे प्रश्न घेऊन महापालिका,

Congress plans to launch 'Action plan' | शहर काँग्रेसने आखला 'अँक्शन प्लान'

शहर काँग्रेसने आखला 'अँक्शन प्लान'

नागपूर : लोकसभा निवडणुकीनंतर सुस्तावलेले पदाधिकारी व कार्यकर्त्यांना सक्रिय करण्यासाठी शहर काँग्रेसने 'अँक्शन प्लान'आखला आहे. या प्लाननुसार येत्या काळात नागरिकांचे प्रश्न घेऊन महापालिका, नागपूर सुधार प्रन्यास व पोलीस ठाण्यांवर धडक दिली जाणार आहे. सोबतच शासकीय कार्यालयांमध्ये नागरिकांची रखडलेली कामे करवून घेण्यासाठी फोर्स तयार केला जाणार आहे. एकूणच येत्या दिवसात शहर काँग्रेस नागरिकांच्या प्रश्नासाठी आक्रमक पवित्रा घेण्याच्या मूडमध्ये आहे.
काँग्रेसचे शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी गुरुवारी देवडिया काँग्रेस भवनात शहर कार्यकारिणीची बैठक घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीत झालेल्या मतदानाचा आढावा घेत, मतमोजणीच्या तयारीचे नियोजन करण्यात आले. या बैठकीत शहर काँग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी येत्या काळात पार पाडावयाची जबाबदारी निश्‍चित करण्यात आली. विकास ठाकरे म्हणाले, लोकसभेची निवडणूक संपली म्हणजे काम संपले नाही. आता विधानसभा निवडणुकीपर्यंत शांत बसायचे नाही. संघटनेच्या माध्यमातून जनतेचे प्रश्न उचलले जातील तेव्हा नागरिकांमध्ये संघटनेच्या नेत्यांविषयी आपुलकी निर्माण होईल. लोक काँग्रेसशी जुळतील. येथे देवडियात येऊन फक्त जयंती, पुण्यतिथीच साजरी करायची नाही; तर यासोबतच जनतेत जाऊन त्यांचे प्रश्न हाताळायचे असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी'अँक्शन प्लान' आखण्यात आला. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी मिळणे कठीण झाले आहे, पथदिवे बंद आहेत. झोननिहाय अवैध बांधकामे वाढली आहेत. अतिक्रमण विरोधी कारवाई केल्याचे दाखवून अधिकारी पैसे कमवीत आहेत, आदी प्रश्नांची झोननिहाय यादी तयार केली जाईल. त्यानंतर काँग्रेसचे पदाधिकारी, ब्लॉक अध्यक्ष नागरिकांना सोबत घेऊन झोनवर धडक देतील व या समस्या सोडविण्याची मागणी करतील. नासुप्रमध्ये डिमांड नोट, भूखंड नियमितीकरणाचे प्रश्न आहेत. त्यासाठी नासुप्रमध्ये आंदोलन केले जाईल. नगर रचना विभागातही असाच उपक्रम राबविला जाईल. शहरातील प्रत्येक पोलीस ठाण्यात मोहल्ला शांतता कमिट्या आहेत; मात्र त्यानंतरही नागरिकांच्या तक्रारींची दखल घेतली जात नाही. सामान्य नागरिकाला न्याय मिळत नाही. त्यामुळे येत्या काळात पालकमंत्री, पोलीस आयुक्त व पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकारी यांची संयुक्त बैठक लावून नागरिकांच्या तक्रारी ऐकून घ्याव्या, अशी विनंती पालकमंत्र्यांना केली जाईल, असे बैठकीत ठरले. या वेळी कमलेश सर्मथ, गजराज हटेवार, उमाकांत अग्निहोत्री, विजय बाभरे, बंडोपंत टेंभूर्णे, राजा द्रोणकर, तानाजी वनवे, मीनाक्षी ठाकरे, संदेश सिंगलकर यांच्यासह ब्लॉक अध्यक्ष, पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)
 

Web Title: Congress plans to launch 'Action plan'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.