आचारसंहिता सोपी, पण महापौरांसाठी कठीण
By Admin | Updated: May 27, 2014 01:43 IST2014-05-27T01:43:07+5:302014-05-27T01:43:07+5:30
विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी आयोगाने आचारसंहिता लागू केली असली तरी ती लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे कठोर नाही. मात्र भाजपचे उमेदवार अनिल सोले हे

आचारसंहिता सोपी, पण महापौरांसाठी कठीण
काही शंका : आयोगाकडून स्पष्टीकरण मागविणार
नागपूर : विधान परिषदेच्या पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी आयोगाने आचारसंहिता लागू केली असली तरी ती लोकसभेच्या निवडणुकीप्रमाणे कठोर नाही. मात्र भाजपचे उमेदवार अनिल सोले हे खुद्द महापौर असल्याने त्यांच्यासाठी ती कठीण ठरण्याची शक्यता आहे. २० मे रोजी आयोगाने निवडणूक आचारसंहिता लागू केली. मात्र त्यात स्पष्टता नसल्याने विभागीय आयुक्त व निवडणूक निर्णय अधिकारी अनुपकुमार यांनी आयोगाकडून काही बाबींचा खुलासा करून घेतला. त्यानुसार पदवीधर मतदारांवर प्रभाव पडू शकेल असे कुठलेही निर्णय राज्य शासन किवा विविध प्राधिकरणाला घेता येणार नाही. जिल्हा नियोजन समिती किंवा तत्सम बैठका घेण्यास मनाई नाही. फक्त त्यात निवडणुकीशी संबंधित अधिकार्यांना सहभागी होता येणार नाही, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पदाधिकार्यांना त्यांची वाहनेही परत करण्याची गरज नाही असे अनुपकुमार यांनी स्पष्ट केले. मात्र नागपूरमध्ये वेगळी परिस्थिती आहे. येथे खुद्द महापौरच भाजपचे उमेदवार असल्याने त्यांना महापालिकेच्या बैठका व इतर निर्णय घेता येणार नाही. उमेदवार असल्याने त्यांना महापालिकेच्या वाहनाचाही वापर करता येणार नाही, असे अनुपकुमार यांनी स्पष्ट केले. आचारसंहितेच्या बाबतीत अद्यापही काही शंका आहेत, त्याबाबत वेळोवेळी आयोगाकडून स्पष्टीकरण मागविले जाईल, असे त्यांनी सांगितले. या निवडणुकीत खाजगी किंवा शासकीय इमारतीचे विद्रुपीकरण करता येणार नाही, याकडे त्यांनी लक्ष वेधले. मतदारांची यादी विभागीय आयुक्तांच्या संकेतस्थळावर टाकण्यात आली आहे. येत्या काही दिवसातच मतदान केंद्राची यादीही त्यावर टाकण्यात येईल. त्यामुळे मतदारांना कोणत्या भागातील मतदान केंद्रावर जायचे आहे हे लक्षात येईल, असे यावेळी सांगण्यात आले. (प्रतिनिधी)