विदर्भ विकासात सहकारी बँकांची मोठी भूमिका
By Admin | Updated: April 18, 2016 05:41 IST2016-04-18T05:41:59+5:302016-04-18T05:41:59+5:30
सहकारी बँकांमुळे लाखो शेतकरी, गरिबांना आधार मिळालेला आहे. सहकारात प्रचंड शक्ती असून या माध्यमातून

विदर्भ विकासात सहकारी बँकांची मोठी भूमिका
नागपूर : सहकारी बँकांमुळे लाखो शेतकरी, गरिबांना आधार मिळालेला आहे. सहकारात प्रचंड शक्ती असून या माध्यमातून सामाजिक व आर्थिक प्रगती शक्य होते. विदर्भात या बँकांनी उल्लेखनीय काम केले असून, क्षेत्राच्या आर्थिक विकासात या बँकांची मोठी भूमिका राहणार आहे, असे मत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केले. गांधीबाग सहकारी बँकेच्या इमारतीचे रविवारी सायंकाळी लोकार्पण करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते.
लोकार्पणानंतर शिक्षक सहकारी बँकेच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ वृत्तपत्रसमूहाच्या ‘एडिटोरियल बोर्ड’चे चेअरमन व राज्यसभा खासदार विजय दर्डा हे होते. याशिवाय राज्याचे ऊर्जामंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, आ. कृष्णा खोपडे, आ. विकास कुंभारे, आ. गिरीश व्यास, विदर्भ अर्बन को-आॅपरेटिव्ह बँक असोसिएशनचे अध्यक्ष कैलाशचंद्र अग्रवाल, मनपाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष बंडू राऊत, अण्णाजी मेंडजोगे, गांधीबाग सहकारी बँकेचे अध्यक्ष रतनलाल लाहोटी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अतुल कोटेचा, कार्यकारी समिती सदस्य बाबूराव तिडके हे प्रामुख्याने उपस्थित होते. बदलते आर्थिक चित्र लक्षात घेता व्याजदर कमी व्हावा, ही जनतेची अपेक्षा आहे. सहकारी बँकांचे ‘नेटवर्क’ चांगले आहे व त्यांच्याच प्रयत्नांमुळे सावकारांच्या मनमानीवर नियंत्रण आले आहे.
सहकारी बँकांनी नक्कीच नफा कमविला पाहिजे. परंतु समाजाला वैचारिक भूमिका देण्यासाठीदेखील पुढाकार घेतला पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी केवळ कर्जवाटपापुरते मर्यादित न राहता समाजात उद्योजकतेचा विकास कसा होईल यावर भर दिला पाहिजे, असा सल्ला नितीन गडकरी यांनी दिला. येणारा काळ हा सहकारी संस्थांसाठी कठीण आहे. परंतु हे आव्हान स्वीकारून या संधीचे सोनेदेखील करता येऊ शकते. सहकारी संस्थांनी गरिबांना मदतीचा हात दिला तर जनतेचा विश्वास संपादन होऊ शकेल; शिवाय प्रगती करणाऱ्या संस्थांनी बुडणाऱ्या संस्थांना आधार दिला तर विदर्भात सहकार आणखी वाढेल. बँकांना वर आणण्यासाठी संबंधित कायद्यातदेखील काही बदल आवश्यक आहेत, असेदेखील गडकरी म्हणाले. (प्रतिनिधी)
सहकारी बँकांनी ग्रामीण भागावर भर द्यावा
४सहकारी बँकांचे जाळे सर्वात पहिले जर्मनीत विणले गेले. भारतात सहकाराची सुरुवात बडोदा येथून झाली व त्याचे श्रेय महाराष्ट्रातील लोकांनाच जाते. राज्यातील सहकार क्षेत्राने चांगला व वाईट दोन्ही काळ पाहिले आहेत. काही लोकांमुळे सहकारी क्षेत्राचे नाव खराबदेखील झाले. परंतु सहकारी बँकांनी आता मानसिकता बदलून हरहुन्नरी लोकांना कर्ज दिले पाहिजे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात जास्तीत जास्त प्रमाणात पोहोचण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. गांधीबाग सहकारी बँकेने केलेली प्रगती ही इतरांसाठी आदर्श आहे, असे प्रतिपादन विजय दर्डा यांनी केले.
ई-रिक्षांमुळे घटली दिल्लीतील गुन्हेगारी
४दिल्लीमध्ये ई-रिक्षा सुरू झाल्यापासून तेथील गुन्हेगारीचा दर घटला आहे. पोट भरण्यासाठी जे लोक गुन्हे करायचे, ते आता ई-रिक्षा चालवून सन्मानाने जगत आहेत. खुद्द दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनीच ही बाब सांगितल्याचे नितीन गडकरी यांनी सांगितले. लोकांना प्रामाणिकपणे जगण्याची संधी देण्याची आवश्यकता आहे. ई-रिक्षांप्रमाणेच इतर व्यवसाय सुरू करण्यासाठी सहकारी बँकांनी गरीब व प्रामाणिक तरुणांना मदतीचा हात द्यायला हवा, असे आवाहन त्यांनी केले.