कोळशासह ध्वनी प्रदूषणाने नागरिक त्रस्त

By Admin | Updated: September 7, 2014 00:48 IST2014-09-07T00:48:25+5:302014-09-07T00:48:25+5:30

वणी तालुक्यासह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात कोळसा प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणाने कहर केला आहे. या प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी मात्र शासन आणि प्रशासन स्तरावरून कोणत्याही उपाययोजना होताना

Citizens suffer from noise pollution with coal | कोळशासह ध्वनी प्रदूषणाने नागरिक त्रस्त

कोळशासह ध्वनी प्रदूषणाने नागरिक त्रस्त

देशात दुसरा क्रमांक : प्रदूषणाकडे सर्वांचेच दुर्लक्ष
रवींद्र चांदेकर - वणी
वणी तालुक्यासह मारेगाव आणि झरीजामणी तालुक्यात कोळसा प्रदूषणासह ध्वनी प्रदूषणाने कहर केला आहे. या प्रदूषणातून मुक्ती मिळविण्यासाठी मात्र शासन आणि प्रशासन स्तरावरून कोणत्याही उपाययोजना होताना दिसत नाही. परिणामी सध्या वणी हे राज्यातीलच नव्हे, तर देशातील दुसऱ्या क्रमांकाचे प्रदूषित शहर म्हणून नावारूपास आले आहे.
वणी परिसरात नायगाव, उकणी, बेलोरा, निलजई खाण क्रमांक एक व दोन, घोन्सा, कुंभारखणी, मुंगोली, जुनाड, कोलारपिंपरी, पिंपळगाव, भांदेवाडा अशा जवळपास १५ भूमिगत आणि खुल्या कोळसा खाणी आहेत. या खाणींमधून रोज हजारो टन कोळसा बाहेर काढला जातो. याच खाणींनी प्रदूषणात भर टाकल्याने वणी परिसर प्रदूषणात देशात दुसऱ्या क्रमांकावर आला आहे. कोळसा खाणींसह कोलवॉशरी व कोळशावर आधारित इतर लघु उद्योगही येथे आहेत. कोळसा वाहतुकीमुळे परिसरात वाहतूकही वाढली आहे. कोळसा खाण ते कोल डेपोपर्यंत विविध वाहनांतून कोळसा वाहून नेला जातो. कोळसा वाहून नेताना संबंधित वाहनांवर ‘टारपोलिन’ झाकण्याचे बंधन आहे. मात्र ते झुगारून कोळसा वाहतूक केली जाते. कोळसा वाहून नेताना त्याचे ‘ढेले’ रस्त्याच्या आजूबाजूला पडतात. त्यावरून इतर वाहने गेल्याने त्याची भुकटी होते. ती हवेत मिसळते. त्याचे अगदी बारीक कण होतात. ते डोळ्यांनाही दिसत नाही. ही धूळ रस्त्यालगतच्या शेतातील पिकांवर जाऊन बसते. त्यामुळे या पिकांवर अक्षरश: धुळीचे थर दिसून येतात. परिणामी उत्पन्नात घट होऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. कोळशाची ही धूळ शहरात पसरते. नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण करते. करते. या ‘कोल डस्ट’मुळे त्वचा रोग, दमा, श्वसनाचे रोग, अ‍ॅलर्जी आदी रोग या परिसरात वाढले आहेत.
दोन वर्षांपूर्वी देशातील प्रदूषित शहरांमध्ये लगतच्या चंद्रपूरचा चौथा क्रमांक होता. आता तो दुसरा झाला. चंद्रपूरवरून वणीचे अंतर केवळ ५५ किलोमीटर आहे. म्हणूनच वणी परिसर आता देशात दुसऱ्या क्रमांकाचा प्रदूषित परिसर झाला आहे. या प्रदूषणामुळे नवजात चिमुरड्यांना जन्मताच आजारांची देणगी मिळत आहे. या विषारी धुळीने जनतेला कर्करोग, दमा, किडणी, हृदयरोग आदी आजारांची लागण होत आहे.
ज्याप्रमाणे वायू व जल प्रदूषण मानवी आरोग्यास धोकादायक आहे, त्याचप्रमाणे ध्वनी प्रदूषणही मानवाचा रक्तदाब, हृदयाचे ठोके वाढविण्यास कारणीभूत ठरते. कानाचे पडदे काही मर्यादेपर्यंतच आवाज सहन करू शकतात़ त्यामुळे मानवी आरोग्याचे हीत लक्षात घेऊन शासनाने ध्वनी प्रदूषण (नियम नियंत्रण) अधिनियम-२००० तयार केला़ या अधिनियमाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी पोलीस प्रशासनावर अधिक आहे़ मात्र अंमलबजावणी करण्यास सर्वच हतबल ठरत आहे़ विविध धार्मिक कार्यक्रम, लग्न, मिरवणुका, विजयोत्सव यामध्ये नियमांचे उल्लंघन होत आहे़ ध्वनी प्रदूषण कायदा मोडण्याची जणू स्पर्धाच लागली आहे़ भर चौकात, शहरातील रस्त्यांवर निघणाऱ्या मिरवणुका, विजयोत्सव, जयंती, सण-उत्सव यावेळी कानाच्या ठिकळ्या उडविणारे आवाज सुरू असतात़ जवळपासच्या परिसरात एकमेकांना संवाद साधणे कठीण होऊन जाते़

Web Title: Citizens suffer from noise pollution with coal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.