खेळताना शाळकरी मुलाचा करुण अंत

By Admin | Updated: August 24, 2015 02:20 IST2015-08-24T02:20:25+5:302015-08-24T02:20:25+5:30

प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हर्ष दिलीप ललके (वय १३) या शाळकरी मुलाचा करंट लागून करुण अंत झाला.

Child's Caring End of Playing | खेळताना शाळकरी मुलाचा करुण अंत

खेळताना शाळकरी मुलाचा करुण अंत

प्रशासनाचा हलगर्जीपणा करंट लागल्याने मृत्यू रामदासपेठेतील घटना
नागपूर : प्रशासनाच्या हलगर्जीपणामुळे हर्ष दिलीप ललके (वय १३) या शाळकरी मुलाचा करंट लागून करुण अंत झाला. रविवारी सकाळी १०.३० च्या सुमारास रामदासपेठेतील महापालिका शाळेच्या परिसरात ही घटना घडली. यामुळे परिसरात तीव्र शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले होते.
रामदासपेठेतील लेंड्रा पार्कजवळ महापालिकेची कन्या शाळा आहे. शाळेच्या प्रांगणात सुटीच्या दिवशी सकाळपासूनच परिसरातील मुले मोठ्या संख्येत खेळायला जमतात. नेहमीप्रमाणे रविवारी सकाळी ९.३० वाजता हर्ष त्याच्या मित्रांसोबत शाळेच्या मैदानात खेळायला आला. ते तेथे पकाडापकडी आणि कबड्डी खेळू लागले. बराच वेळ खेळल्यामुळे हर्ष दमल्यासारखा झाला. त्यामुळे शाळेच्या चॅनल गेटजवळच्या कठड्यावर जाऊन बसला. १०.३० च्या सुमारास अन्य काही मित्र त्याला बोलवायला आली. यावेळी त्याच्या हातात अर्थिंगची वायर होती अन् हर्षचे शरीर पुरते अकडल्यासारखे (ताठ) झालेले पाहून काहींनी त्याला आवाज दिला. तो प्रतिसाद देत नसल्यामुळे हर्ष गंमत करीत असावा, असे वाटले. मात्र, एका मित्राने त्याच्या हातातील वायर बघून त्याला करंट लागला असावा, अशी शंका व्यक्त केली. त्यामुळे दुसऱ्या एका मित्राने बाजूची काठी उचलून त्याला लावली. त्याचवेळी हर्ष बाजूला पडला. त्याला करंट लागल्याचे लक्षात आल्यामुळे त्याच्या मित्रांनी आरडाओरड करून बाजूच्यांना गोळा केले. त्याच्या घरीही माहिती देण्यात आली. त्यामुळे घरची मंडळी धावतच तेथे आली. हर्षला बाजूच्याच खासगी रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तेथे डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.(प्रतिनिधी)
परिसरात तणाव
या घटनेमुळे परिसरात तीव्र शोकसंतप्त वातावरण निर्माण झाले. आजूबाजूची मंडळी मोठ्या संख्येत घटनास्थळी जमली. माहिती कळताच सीताबर्डीचे पीएसआय पुरी घटनास्थळी धावले. तोपर्यंत लोकभावना तीव्र झाल्या होत्या. या घटनेला महापालिका-शाळा प्रशासनाचा हलगर्जीपणाच कारणीभूत असल्याचा आरोप संतप्त जमाव करीत होता. घटनास्थळी तणाव निर्माण झाल्याचे पाहून सीताबर्डीचा पोलीस ताफा पोहचला. सोबतच या भागातील विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते आणि महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संतप्त जमावाची कशीबशी समजूत काढली.
कुटुंबीयांना जबर मानसिक धक्का
सरस्वती विद्यालय शंकरनगरमध्ये ७ वीत शिकणारा हर्ष अभ्यासात हुशार होता. खेळात त्याला विशेष आवड होती. त्याचे वडील दिलीप ललके आॅटोचालक, तर आई वैशाली गृहिणी आहे. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा होता. हर्षच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबीयांना, खास करून आईला जबर मानसिक धक्का बसला आहे. ती वारंवार बेशुद्ध पडत आहे. त्याच्या मृत्यूला कारणीभूत असलेल्यांवर कारवाई करावी, अशी, त्याच्या शोकसंतप्त कुटुंबीयांची मागणी आहे.
पालकांनो दक्षता घ्या
शाळकरी मुले खेळाच्या नावाखाली बाहेर गेल्यानंतर वेगवेगळ्या अपघाताने ठार होण्याच्या घटना वाढल्या आहेत. सक्करदऱ्यात पाण्याच्या टाक्यात पोहायला गेलेल्या मुलाचा मृत्यू झाल्याची घटना ताजीच आहे. तत्पूर्वी अशाच प्रकारे अजनी रेल्वे वसाहतीत एका जीर्ण इमारतीजवळ पोहायला गेलेली काही मुले मलब्यात दबली होती. त्यातील एकाचा मृत्यू झाला होता. आणखीही अनेक घटना उपराजधानीतील विविध भागात घडल्या आहेत. त्यामुळे पालकांनी आपला मुलगा कुठे खेळायला जातो, ते ठिकाण धोकादायक तर नाही ना, त्याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे.
जबाबदार कोण ?
हर्षच्या मृत्यृला नेमके कोण जबाबदार आहेत, त्याची सीताबर्डी पोलीस चौकशी करीत आहेत. घटनास्थळावरच्या चर्चेनुसार, शाळा आणि मैदानाची देखभाल करणारी मंडळी रोज रात्री विजेची वायर काढून ठेवतात. काहींच्या मते अर्थिंगची वायर अनेक दिवसांपासून लोंबकळत पडली होती. त्याची प्रशासनाला कल्पनाही देण्यात आली होती. मात्र, त्याची दखल घेतली गेली नाही. त्यामुळे निष्पाप हर्षचा बळी गेला. पोलीस वीज मंडळाच्या अधिकाऱ्यांकडून अहवाल घेणार असून, शाळा प्रशासनातील संबंधितांची चौकशी केल्यानंतर या प्रकरणात दोषी कोण, तो निष्कर्ष काढला जाणार आहे. तूर्त पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पीएसआय पुरी चौकशी करीत आहेत.

Web Title: Child's Caring End of Playing

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.