नरेश डोंगरे लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : सतर्कता, संवेदनशिलता आणि निष्ठा या त्रिसूत्रीला लक्षात ठेवून कर्तव्य बजावल्यास प्रवाशांच्या जानमालाची सुरक्षा करता येते आणि अडचणीत सापडलेल्यांना मदतही करता येते. याचा प्रत्यय दक्षिण पूर्व मध्य (दपूम) रेल्चेच्या 'टीसींनी' बजावलेल्या कामगिरीतून आला आहे. कर्तव्य बजावतानाच त्यांनी दाखविलेल्या संवेदनशिलतेमुळे अनेक अल्पवयीन बालकांचे भविष्य सुरक्षित राहिले आणि गुन्हेगारांवर कडक कारवाईदेखिल होऊ शकली.
रेल्वेला आर्थिक फटका देणाऱ्या बेशिस्त प्रवाशांवर कारवाई करण्याची मुख्य जबाबदारी रेल्वेच्या तिकिट तपासणीसांवर (टीसींवर) असते. मात्र, हे करतानाच त्यांनी सतर्कता आणि संवेदना बाळगल्यास अनेकांना दिलासा मिळू शकतो. दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या तिकिट तपासणीसांनी अशीच सतर्कता दाखविल्यामुळे घर सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात असलेल्या किंवा फूस लावून पळवून नेल्या जात असलेल्या अल्पवयीन मुला-मुलींना ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यांना त्यांच्या आईवडीलांच्या ताब्यात देण्यात आले. एका राज्यातून दुसऱ्या राज्यात गांजा, दारूसह अंमली पदार्थांची तस्करी करणारांनाही पकडण्यात यश आले. एवढेच नव्हे तर वेगवेगळ्या मार्गावर धावणाऱ्या ट्रेनमध्ये शिरून दर्जाहिन खाद्यपदार्थ तसेच पाण्याच्या बाटलीसह विविध शितपेय विकणाऱ्या अनधिकृत वेंडर्सवरही सतर्क टीसींमुळेच कारवाई करण्यात यश मिळाले.
अशा प्रकारे कर्तव्य बजावतानाच सामाजिक दायित्व पार पाडणाऱ्या दपूम रेल्वेच्या २८ तिकिट तपासणीसांच्या कार्याची दखल घेऊन दपूम रेल्वेचे व्यवस्थापक दीपककुमार गुप्ता यांनी सत्कार केला. दपूम रेल्वेच्या स्थानिक सभागृहात शुक्रवारी हा कार्यक्रम पार पडला. यावेळी वरिष्ठ वाणिज्य व्यवस्थापक दिलीप सिंग यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
यांचा झाला सत्कारआय. आलम, ए. आर. राहटे, संजय गौरव, अजय राहटे, सतीश घोरपडे, मिथिलेश कुमार, संतोष बावनथडे, शिखा यादव, रश्मी सार, जी. किशोर, सुरेश कुमार साहु, श्री राजकुमार, राजेश पी. रामटेके, नरसिंह नारायण दास, जी. एम. झा, एस. बी. दुपारे, बी. कुमार, डी.आर.पांडे , एस. डी. सोलोमन, प्रभू चौरसिया, सागर थुल, नितिन इंदुरकर, शैलेन्द्र प्रसाद, तुषार सहारे, आर. के. ठाकुर, मुकुल. पी. कुजुर, एम. के. अग्रवाल, नीरज यादव, सुधीर कुमार.