मुलांच्या पार्थिवाचे जड झाले ओझे
By Admin | Updated: August 9, 2014 02:26 IST2014-08-09T02:26:44+5:302014-08-09T02:26:44+5:30
घरातले बाळ रडले तरी अस्वस्थ होणारी माणसे आपण. बाजारात गेल्यानंतर कुठे हरवू नये म्हणून त्याचे बोट घट्ट धरून ठेवणारे आपण.

मुलांच्या पार्थिवाचे जड झाले ओझे
गजानन जानभोर
घरातले बाळ रडले तरी अस्वस्थ होणारी माणसे आपण. बाजारात गेल्यानंतर कुठे हरवू नये म्हणून त्याचे बोट घट्ट धरून ठेवणारे आपण. शाळेतून येण्यास पाच मिनिटेही उशीर झाला तरी दाराकडे डोळे लावून बसणारे आपण. पण हेच मूल मोठे झाल्यानंतर त्याच्या वर्तनाकडे, संगतीकडे दुर्लक्ष करणारेही आपणच. अनुराग खापर्डे, इशिता मायल या विद्यार्थ्यांच्या अपघाती मृत्यूने निर्माण केलेले हे प्रश्न आहेत. वाढदिवसाची पार्टी करून रात्री उशिरा घराकडे सुसाट निघालेल्या या तरुणांच्या वाहनाला भीषण अपघात झाला आणि त्यात त्यांना प्राण गमवावे लागले. कायद्याच्या भाषेत हा अपघात असला तरी तो ‘आत्मघात’ आहे, असेच दु:खाने म्हणावे लागेल. वाढदिवसाची मौज आणि वेगाने वाहन चालविण्याची हौस त्यांच्या जीवावर बेतली. अनुराग आणि इशिताच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर कोसळलेले दु:ख कधीही भरून निघणारे नाही. पण यातून आपण काही बोध घेणार की नाही?
आपली मुले रात्री उशिरापर्यंत कुठे असतात? कोणासोबत असतात? काय करतात? त्यांच्या पार्ट्यांचे स्वरूप काय आहे? या प्रश्नांची उत्तरे पालक म्हणून आपण कधी जाणून घेणार आहोत की नाही? या मुलांच्या आई-वडिलांनी या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न केला असता तर कदाचित ही दुर्दैवी घटना घडली नसती, असे खेदाने म्हणावेसे वाटते. इथे या मुलांच्या आई-वडिलांना दोष द्यायचा नाही. पण आपण वेळीच सावरलो नाही तर उद्या आणखी एखाद्या अनुरागला किंवा इशिताला आपले प्राण गमवावे लागू शकतात.
या मुलांच्या मृत्यूला केवळ कारचा सुसाटपणा कारणीभूत आहे का? मुळात मुलांमध्ये या वेगाचे हे वेड आले कुठून? अनुराग अवघ्या २३ वर्षांचा. पार्टीला जात असलेल्या मुलाच्या हातात होंडा सिटीच्या चाब्या देण्यापूर्वी वडिलांनी विचार करायला नको? मृत इशिता आणि सध्या रुग्णालयात उपचार घेत असलेली श्रेया होस्टेलमध्ये राहायच्या. रात्री उशिरापर्यंत बाहेर फिरण्याची परवानगी होस्टेलचालकांनी त्यांना कशी काय दिली?
आपण आधुनिक विचारांचे आहोत, हे सिद्ध करण्यासाठी अनेक आई-वडील मुलांना त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून द्यायला कचरतात. हे चित्र घरा-घरांत पाहायला मिळते. मुलाच्या आवडीचा ‘ब्रॅन्ड’ वाढदिवसाला गिफ्ट देणारे आई-वडील आपल्या अवतीभवतीच असतात.
‘जनरेशन गॅप’च्या नावाखाली पालक मुलांच्या भावनिक अपेक्षापूर्तीपेक्षा भौतिक स्वातंत्र्याला जास्त महत्त्व देतात. मुलांनी केवळ तोंडातून एखादी गोष्ट काढली की लागलीच ती त्यांच्या पुढ्यात हजर. मग ती मिळविण्यासाठी किती संघर्ष करावा लागतो याची कदर या मुलांना कशी राहणार? आपली मुले रात्री कुठे जातात, काय करतात, त्यांचे मित्र-मैत्रिणी कोण याची माहिती खरोखरच पालकांना असते का? रात्री ११ वाजता आयटी पार्कजवळ अंधाराच्या आडोशाला तोंडाला फडके बांधून आपली मुलगी मित्रासोबत खरंच अभ्यासाच्या गोष्टी करीत असते का? असा विचार सुज्ञ पालकांच्या मनात कधी का येत नाही? मित्राकडून अभ्यासाच्या ‘टीप्स’ दिवसा घेत चल! असे म्हणण्याचे धाडस किती माय-बापांमध्ये आहे?
होस्टेलमध्ये राहणाऱ्या मुलांवर तेथील प्रशासनाचा काही प्रमाणात वचक तरी असतो, परंतु खासगी फ्लॅटवर ‘कॉट’ पद्धतीनुसार राहणाऱ्या बाहेरगावच्या मुलांचे काय? त्यांच्यावर लक्ष कोण ठेवणार? त्यांच्या कुटुंबीयांनादेखील शेकडो किलोमीटर अंतरावरून त्यांच्यावर नजर ठेवणे शक्य नाही. परंतु त्यांच्यात जाणीव निर्माण करण्याची जबाबदारी तरी कुटुंबीयांनी पार पाडायला हवी. या महिन्याचा पॉकेटमनी कसा खर्च केला? एवढा साधा प्रश्न आपण मुलांना कधी विचारला आहे का? मुलाचे पाय वाकडे पडायला इथेच सुरुवात होते. रात्री उशिरा घरी आल्यानंतर दार आईच उघडते. मुलाच्या तोंडाचा वाफारा तिलाच येतो. पण वात्सल्याचा अतिरेक आड येतो आणि इथेच त्याचा तोल ढळायला सुरुवात होते. परवाच्या भीषण अपघाताच्या घटनेची बीजे आपण नकळत अशी रुजवत असतो. अनुराग, इशिताने जाताना साऱ्याच माय-बापांना अंतर्मुख व्हायला भाग पाडले आहे. आपल्या अंगाखांद्यावर खेळवलेली मुले अशी खांद्यावर घेऊन जाताना होणाऱ्या यातना या मुलांना काय ठाऊक?