काम न करणाऱ्यांना बदलणार
By Admin | Updated: August 20, 2016 02:20 IST2016-08-20T02:20:25+5:302016-08-20T02:20:25+5:30
काँग्रेसची शहर कार्यकारिणी गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केली.

काम न करणाऱ्यांना बदलणार
काँग्रेसच्या शहर कार्यकारिणीत अनेकांची संधी हुकली : नगरसेवकांचा समावेश नाही
नागपूर : काँग्रेसची शहर कार्यकारिणी गुरुवारी शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी जाहीर केली. मात्र, ही कार्यकारिणी कायम स्वरुपी नसेल. दर महिन्यांनी पदाधिकाऱ्यांच्या कामाचा आढावा घेतला जाणार आहे. जे काम करणार नाही, पक्षाच्या बैठकींना, आंदोलनांना उपस्थित राहणार नाही, अशा पदाधिकाऱ्यांना बदलले जाणार आहे. प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांनी तसे निर्देश शहर अध्यक्षांना दिले आहेत.
शहर कार्यकारिणीत विद्यमान नगरसेवकांना स्थान देण्यात आलेले नाही. यामुळे काही नगरसेवकांनी दबक्या आवाजात नाराजी व्यक्त केली आहे. गेल्या निवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर काही मतांनी पराभूत झालेल्या बऱ्याच उमेदवारांना पद देऊन आगामी निवडणुकीसाठी त्यांची ताकद वाढविण्याचा प्रयत्न केला आहे. कार्यकारिणीत आपल्याला संधी मिळेल, अशी अनेकांना अपेक्षा होती. मात्र, अनेकांची संधी हुकली. त्यांनी नेत्यांकडे आपली खंत व्यक्त केली. यापूर्वी कार्यकारिणीत असलेल्या काहींना डच्चूही देण्यात आला. त्यांनीही आपली नाराजी व्यक्त केली. मात्र, बहुतांश जुन्या पदाधिकाऱ्यांना कायम ठेवण्यात आले असून निष्क्रिय लोकांनाच बदलण्यात आले असल्याचे शहर काँग्रेसने स्पष्ट केले आहे.
याबाबत शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांना विचारले असता ते म्हणाले, एकाही नगरसेवकाने आपल्याकडे नाराजी व्यक्त केलेली नाही. विद्यमान नगरसेवकांना महापालिकेची आगामी निवडणूक लढायची आहे. त्यांना तिकीट मिळणार असल्याने पक्षाचे पद दुसऱ्या कार्यकर्त्यांना देऊन पक्षाची व नगरसेवकांचीच ताकद वाढविण्यात आली आहे,असे त्यांनी स्पष्ट केले आहे. पदे मर्यादित आहेत व कार्यकर्त्यांची फौज मोठी आहे. त्यामुले सर्वांनाच पद देणे शक्य झाले नाही. आता उरलेल्या सक्षम कार्यकर्त्यांना विविध सेल व आघाड्यांची जबाबदारी सोपविली जाईल. याशिवाय पक्षात पद देऊनही एखादा पदाधिकारी काम करण्यास इच्छुक नसेल, गटबाजीला खतपाणी घालण्याचा प्रयत्न करीत असेल तर अशा पदाधिकाऱ्याबाबत पुनर्विचार केला जाईल, त्यांच्या जागी दुसऱ्या इच्छुक कार्यकर्त्याला संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
‘त्या’ कार्यकर्त्याला का घेतले ?
गटबाजी बाजूला सारून कार्यकारिणी तयार करण्यात आल्याचा दावा ठाकरे यांनी केला आहे. मात्र, निवडणुकीत आपल्या विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला पदाधिकारी का बनविण्यात आले या मुद्यावर शहरातील काही ज्येष्ठ नेत्यांनी रान पेटविले आहे. इतिहास विसरून सर्वांना सोबत घेण्याची भू्मिका नेत्यांनी घेतली नाही तर नागपुरातील सहा- शून्य चा भाजपचा विक्रम भविष्यातही मोडता येणार नाही, हे विसरून चालणार नाही.