कावळ्यांच्या चोचीत बदल!
By Admin | Updated: September 23, 2014 01:08 IST2014-09-23T01:08:22+5:302014-09-23T01:08:22+5:30
पितृपक्षात पूर्वजांची पूजाअर्चा करून, त्यांना लावण्यात येणारा नैवेद्य कावळ्याला देण्याची परंपरा आहे. परंतु आज तो कावळाच दुर्मिळ होत चालला आहे. पक्षितज्ज्ञांच्या मते, कावळ्यांना पूर्वीप्रमाणे

कावळ्यांच्या चोचीत बदल!
संख्या घटली : पक्षिप्रेमी चिंतित
योगेंद्र शंभरकर - नागपूर
पितृपक्षात पूर्वजांची पूजाअर्चा करून, त्यांना लावण्यात येणारा नैवेद्य कावळ्याला देण्याची परंपरा आहे. परंतु आज तो कावळाच दुर्मिळ होत चालला आहे. पक्षितज्ज्ञांच्या मते, कावळ्यांना पूर्वीप्रमाणे मनुष्य सहवास व पर्याप्त खाद्य मिळत नसल्याने त्यांच्या चोचीच्या आकारात बदल होऊ लागला आहे.
यासंबंधी केवळ नागपुरातच नव्हे तर अनेक शहरात करण्यात आलेल्या अध्ययनातून ही बाब पुढे आली आहे. ज्येष्ठ पक्षिप्रेमी व माजी मानद वन्यजीव रक्षक गोपाल ठोसर यांच्या मते, कोवळा व चिमण्यांचा कित्येक वर्षांपासून मनुष्यासोबत सहवास राहिला आहे. त्यांना मनुष्यासोबत राहण्याची सवय झाली आहे. त्यामुळे ते मनुष्याच्या सहवासात राहण्याचा प्रयत्न करतात. परंतु मनुष्याने त्यांची साथ सोडली आहे. पूर्वी कुटुंबातील सर्व सदस्य घरातील व्हरांड्यात जेवणाला बसायचे. त्याचवेळी घरासमोरच्या झाडावरील घरट्यात राहणारा कावळा किंवा चिमणी अचानक तेथे पोहोचून भाकरीचा तुकडा घेऊन जात होते. यातून त्यांची भूक भागत होती. परंतु आज व्हरांड्यातील ते सामूहिक भोजन बंद झाले असून, कवेलूच्या घराऐवजी स्लॅबच्या मोठमोठ्या इमारती उभा झाल्या आहेत. शिवाय त्यासाठी मोठमोठी झाडे तोडली जात आहेत. यामुळे पक्ष्यांना राहण्यासाठी घरटे आणि पोट भरण्यासाठी खाद्य मिळणे कठीण झाले आहे. सध्या शहरात हिरवळ असलेल्या परिसरातच पक्षी दिसून येतात. यात खामला, गड्डीगोदाम, मेडिकल कॉलेज व सुरेंद्रनगर परिसरात ते प्रामुख्याने आढळतात. (प्रतिनिधी)