सॉफ्टवेअर इंजिनीअरसह चाैघांनी लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:49 IST2021-02-05T04:49:40+5:302021-02-05T04:49:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : हुडकेश्वरमधील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरसह चाैघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक कोंडीमुळे इंजिनीअरने हा आत्मघाती ...

सॉफ्टवेअर इंजिनीअरसह चाैघांनी लावला गळफास
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : हुडकेश्वरमधील एका सॉफ्टवेअर इंजिनीअरसह चाैघांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. आर्थिक कोंडीमुळे इंजिनीअरने हा आत्मघाती निर्णय घेतल्याचे उघड झाले आहे. अविश नारायण शेंडे (वय ४२) असे मृत इंजिनीअरचे नाव आहे.
सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार, हुडकेश्वरमधील सच्चिदानंदनगरात राहणारे अविश शेंडे (वय ४२) यांना २०१७ मध्ये एनआयटीमधून रस्त्याच्या कडेला झाडे लावण्याचे कंत्राट मिळणार होते. त्या आशेमुळे अविशने बँकेतून १ कोटी, ७० लाखाचे कर्ज घेतले होते. अविशच्या भावाने पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, त्यातील बरीचशी रक्कम त्याने एनआयटीत मध्यस्थाकडे दिली. मात्र, तीन वर्षे होऊनही अविशला कंत्राट मिळाले नाही. दुसरीकडे बँकेच्या व्याजामुळे अविश शेंडेवर कर्जाचा डोंगर उभा राहिला होता. कर्जासाठी अविशने आपले घरही गहाण ठेवले होते. ते लिलाव करण्याची धमकी बँक अधिकाऱ्यांनी त्याला दिली होती. एनआयटीत अडकलेली रक्कम परत मिळण्याचे चिन्ह दिसत नसल्याने अविशची तीव्र आर्थिक कोंडी झाली होती. त्यामुळे ते कमालीचे अस्वस्थ झाले होते. या अस्वस्थतेतून त्यांनी रविवारी पहाटे ५ च्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली.
----
दोन महिन्याच्या मुलाला निरोप
अविश यांना आईवडील, भाऊ, पत्नी आणि एक नऊ वर्षांचा तर दुसरा दोन महिन्याचा मुलगा आहे. या सर्वांचा निरोप घेत अविशने आत्मघात केला. आशिष नारायण शेंडे (वय ३८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पोलीस उपिनरीक्षक लहाने पुढील तपास करीत आहेत.
---
आणखी तिघांनी लावला गळफास
अजनीतील नाईकनगरात राहणाऱ्या स्नेहा विराज मते (वय ४०) यांनी सोमवारी दुपारी २ च्या सुमारास गळफास लावून आत्महत्या केली. मिळालेल्या सूचनेवरून अजनी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
लकडगंजमधील डॉ. राम मनोहर लोहिया शाळेच्या वॉल कम्पाऊंडला लागून असलेल्या ग्रीलला स्कार्फ बांधून गळफास लावलेल्या अवस्थेत एका अनोळखी तरुणाचा मृतदेह रविवारी रात्री ७.५० च्या सुमारास पोलिसांना आढळला. तो कोण, कुठला आणि त्याने कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, त्याचा पोलीस तपास करीत आहेत.
कपिलनगरातील उप्पलवाडी टायर कंपनीसमोर घडली. चहाटपरीच्या लाकडी बल्लीला प्लास्टिक पॅकिंगच्या पट्टीने अनिल कवडूजी क्षीरसागर (वय ५६) यांनी गळफास घेतला. विश्वजित विलास मेश्राम यांनी दिलेल्या माहितीवरून कपिलनगर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----
विहिरीत पडून महिलेचा मृत्यू
नागपूर : पाय घसरून विहिरीत पडल्याने शोभा योगेशप्रसाद वाजपेयी (वय ५५) यांचा करुण अंत झाला. रविवारी सायंकाळी ६.३० च्या सुमारास नरसाळा भागात ही घटना घडली. योगेशप्रसाद ओमकारप्रसाद वाजपेयी (वय ७०) यांनी दिलेल्या सूचनेवरून हुडकेश्वर पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.
----