ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस सुसाट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:17 IST2021-09-02T04:17:41+5:302021-09-02T04:17:41+5:30
नागपूर : एसटी बसेसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रवासी मोठ्या संख्येने एसटी बसने ...

ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेस सुसाट
नागपूर : एसटी बसेसची वाहतूक पूर्ण क्षमतेने सुरू झाली आहे. कोरोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर प्रवासी मोठ्या संख्येने एसटी बसने प्रवास करीत आहेत. परंतु, पूर्वीसारख्या ग्रामीण भागात मुक्कामाला जाणाऱ्या बहुतांश बसेस बंद असल्यामुळे ग्रामीण भागातील नागरिकांची गैरसोय होत आहे.
शहरी भागात जाणाऱ्या बसेस फुल्ल
- सध्या नागपुरातील गणेशपेठ बसस्थानकावरून शहरी भागात जाणाऱ्या बसेसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. शहरी भागात गणेशपेठ बसस्थानकावरून १२ हजारांपेक्षा अधिक प्रवासी प्रवास करीत असल्याची माहिती एसटीच्या अधिकाऱ्यांनी दिली.
ग्रामीण भागातील बसेसमध्ये जागा मिळेना
-गणेशपेठ बसस्थानकावरून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसमध्ये कमालीची गर्दी होत आहे. अनेकदा प्रवाशांना जागाही मिळत नसल्याची स्थिती आहे. गणेशपेठ बसस्थानकावरून ग्रामीण भागात जाणाऱ्या बसेसमध्ये दररोज १८ हजार प्रवासी प्रवास करीत असल्याचे एसटीच्या आगार व्यवस्थापकांनी सांगितले.
मुक्कामी जाणाऱ्या गाड्यांचे काय ?
- सध्या नागपुरातील गणेशपेठ आगारातून रात्री मुक्कामी जाणाऱ्या बहुतांश बसेस बंद आहेत. यात गुमगाव, टाकळघाट, लोधीखेडा, मोहगाव, छिंदवाडा, सिवनी, आंभोरा, मांढळ, बेला, लोहगड येथे रात्री मुक्कामी जाणाऱ्या बसेस बंद आहेत. त्यामुळे या बसेस कधी सुरू होणार याची विचारणा प्रवासी करीत आहेत.
सकाळीच बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची गैरसोय
‘मागील अनेक वर्षांपासून बेला गावात एसटी बस मुक्कामी येत होती. परंतु, मागील दीड वर्षांपासून ही बस बंद झाली आहे. सकाळीच गावातील अनेक नागरिकांना कामानिमित्त बाहेरगावी जावे लागते. परंतु, बसच मुक्कामी येत नसल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होत आहे.’
- नरेश सोमकुवर, प्रवासी बेला
खासगी वाहनाने जावे लागते
‘मुक्कामी बस येत नसल्यामुळे सकाळीच नागपुरात येण्यासाठी खासगी वाहनाचा आधार घ्यावा लागतो. त्यामुळे प्रवाशांच्या सोयीसाठी गावात मुक्कामी बस थांबणे आवश्यक आहे.’
- प्रशांत राठोड, प्रवासी आंभोरा
शाळा सुरू झाल्यानंतर मुक्कामी बसेस सुरू करू
‘सध्या विद्यार्थी फेऱ्या बंद आहेत. शाळा, महाविद्यालये पूर्णपणे सुरू झालेले नाहीत. ते सुरू होताच नाईट आऊट बसेस सुरू करण्यात येतील.
- अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार
............