बस पुलावर आदळली : ४० प्रवासी जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2019 08:52 PM2019-10-01T20:52:36+5:302019-10-01T23:34:58+5:30

काटोल-तिष्टी-सावनेर मार्गावरील खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाच्या संरक्षक भिंतीवर धडकली. त्यात बसमधील ४० प्रवासी जखमी झाले असून, त्यात लहान मुलांसह १५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे.

The bus hit the bridge: 40 passengers injured | बस पुलावर आदळली : ४० प्रवासी जखमी

बस पुलावर आदळली : ४० प्रवासी जखमी

Next
ठळक मुद्देनागपूर जिल्ह्यातील काटोल-तिष्टी-सावनेर मार्गावरील घटना

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर (काटोल) : काटोल-तिष्टी-सावनेर मार्गावरील खड्ड्यांमुळे चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस पुलाच्या संरक्षक भिंतीवर धडकली. त्यात बसमधील ४० प्रवासी जखमी झाले असून, त्यात लहान मुलांसह १५ विद्यार्थ्यांचाही समावेश आहे. ही घटना खैरी (नवघरे) शिवारात मंगळवारी दुपारी १.३० वाजताच्या सुमारास घडली.
जखमींमध्ये स्नेहा नरेंद्र मदनकर (१९), संकेश्वर जंगलू कावडकर (१८), नीलेश गणपत घाटोळे (२०), ललित धनराज दुधकवळे (१८), शुभांगी तुळशीराम कावडकर (१८), ममता मोहन गवळी (२०) सर्व रा. गोंडीमोहगाव, ता. काटोल, रामराव दसरुदेव लोणे (५५, रा. सिंजर, ता. नरखेड), चिंधाबाई नारायण रेंडके (६०), गौरव धनसिंग शिंपीकर (१२), दुर्गा धनसिंग शिंपीकर (४०) व डॉली धनसिंग शिंपीकर (१०) चौघेही रा. खरांगणा, जिल्हा वर्धा, हरिभजन दौलत कुंभरे (६५, रा. काटोल), कुसुम प्रकाश सरोदे (४०) व प्रकाश केशव सरोदे (४५) दोघेही रा. खैरगाव, ता. नरखेड, महेश बळीराम वाघदरे (२७, रा. करमाकडी ता. सौंसर, जिल्हा छिंदवाडा, मध्य प्रदेश), अविनाश विठ्ठलराव आष्टनकर (७४, रा. जानकीनगर, काटोल), रानाबाई किसना कामडे (६५, रा. विसापूर, ता. सावनेर), पूजा शंकर मसराम (२०, तेलगाव, ता. कळमेश्वर), चेतना बंडू पाटील (१९), निकिता नरेश्वर कचंडे (१९) दोघेही रा. तिष्टी बु. ता. कळमेश्वर, अंजली पुंजाराम सोनवाणे (१८, रा. बोरी ता. काटोल), द्रौपदी वासुदेव भोंडे (६०, रा. वाडेगाव ता. वरुड जि. अमरावती), अखिल भगवान चोरघडे (२७, रा. परसोडी, ता. कळमेश्वर), मोहित अर्जुन मडावी (५ ) जिजा जंगलू मडावी (६०) चैतन्य विष्णू परतेती (२), बेबी उकंडराव परतेती (६०) चौघेही रा. घुबडी, ता. काटोल, यशवंत तुकाराम वाघे (४७, द्वारकानगरी, काटोल), महादेव गेंदलाल मोरे (६५, रा. रेल्वे स्टेशन वॉर्ड, काटोल), मंजाबाई राजेराम हनवते (६५), चंद्रशेखर रमेश साठे (२३) (दोघेही रा. खैरी नवघरे ता. काटोल), शालिनी लीलाधर हेडाऊ (२१), मोनाली प्रभाकर सावंतकर (२१) दोघेही रा. सावनेर, पुंडलिक गोविंदराव वंजारी (७०, रा. किन्ही नेरी, ता. हिंगणा), विठ्ठल सहदेव कातलाम (५२, रा. हेटीकुंडी ता. कारंजा घाडगे, जिल्हा वर्धा), शकुंतला किसना डांगोरे (६०), किसना झापरु डांगोरे (६५) दोघेही रा. पारडसिंगा, ता. काटोल, जयवंती गोमाजी इवनाते (६०, रा. सबकुंड, ता. काटोल), प्रीती महेश वाघदरे, कारंजा (घाडगे), जिल्हा वर्धा, प्रतीक सुधाकर हिवसे (१९, तिष्टी, ता. कळमेश्वर) यांचा समावेश आहे.
या सर्वांसह इतर प्रवासी काटोल आगाराच्या एमएच-४०/एन-८६२५ क्रमांकाच्या काटोल - सावनेर बसने प्रवास करीत होते. ही बस खैरी (नवेगाव) शिवारात पोहोचताच रोडवरील खड्ड्यांमुळे चालकाचा ताबा सुटला आणि बस पुलाच्या संरक्षक भिंतीवर धडकली. त्यामुळे भिंतीचा काही भाग तुटला असून, बसचे इंजिन मागे सरकले. ही बस क्रेनच्या मदतीने बाहेर काढण्यात आली. यावरून धडकेची तीव्रता लक्षात येते. यात बसमधील ४० प्रवाशांना दुखापत झाली.
माहिती मिळताच काटोल पोलिसांसह एसटी महामंडळाचे कर्मचारी तसेच परिसरातील नागरिक घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी सर्व जखमींना तातडीने काटोल येथील ग्रामीण रुग्णालयात पाठविले. तिथे प्रथमोपचार केल्यानंतर सुटी देण्यात आली. यात शहरातील खासगी डॉक्टरांनीही शासकीय डॉक्टरांना उपचारादरम्यान मदत केली. काहींना खासगी हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आल्याचेही सांगण्यात आले.

मातीमिश्रित मुरुमामुळे रोडवर चिखल
सावनेर-घुबडमेट-झिल्पा-सावनेर-पारशिवनी या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या कामाचे कंत्राट पाटणसावंगी रोडवेज प्रा. लि. नामक कंपनीला दिले आहे. सदर कंपनीने या मार्गालगत मोठ्या प्रमाणात मुरुमाचे ढीग टाकले असून, हाच मुरूम रोडवर टाण्यात आला आहे. तो मातीमिश्रित असल्याने पावसामुळे संपूर्ण रोड चिखलमय झाला आहे. त्यातच हा रोड उंचसखल असून, काही ठिकाणी खड्डेही पडले आहेत. या बाबी अपघातास कारणीभूत ठरणाऱ्या असल्याने यात सुधारणा करण्याच्या मागणीसाठी समीर उमप यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला निवेदन दिले होते. त्यांच्या अनुपस्थितीत सहायक अभियंता सी. एम. भैसारे यांनी निवेदन स्वीकारले होते. प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने हा अपघात घडल्याचा आरोपही नागरिकांनी केला आहे.

१५ जखमींवर मेडिकलध्ये उपचार : चौघांची प्रकृती गंभीर 

काटोल-तिष्टी-सावनेर मार्गावर मंगळवारी झालेल्या अपघातातील १५ जखमींना मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. यातील आठ जणाची प्रकृती गंभीर असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. जखमींमध्ये आठ महिला तर सात पुरुषाचा समावेश आहे.
   काटोल आगाराच्या एमएच-४०/एन-८६२५ क्रमांकाच्या काटोल - सावनेर बसने प्रवास करीत होते. ही बस खैरी (नवेगाव) शिवारात पोहोचताच  रोडवरील खड्ड्यांमुळे चालकाचा ताबा सुटला आणि बस पुलाच्या संरक्षक भिंतीवर धडकून मोठा अपघात झाला. बसमध्ये ४० प्रवासी होते. यातील १५ गंभीर जखमींना सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास मेडिकलच्या ट्रॉमा केअर सेंटरमध्ये १०८ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेतून आणण्यात आले. गौरव  शिंपीकर (१२), बेबी शिंपीकर (१०), दुर्गा शिंपीकर (३०),  चिंदाबाई रेंडके (४०), देवका डोंगरे (६०), श्यामराव लोढे (३०), पांडुरंग, चैतन्य परतेती (२०), पुंडलिक रंगारी (७०), महेश वाघधरे (२७), प्रीती बाघुधरे (२३), मंजाबाई हनवते (६५), जयवंती इवनाते (६०), रानीबाई (६२) व हरीभजन  कुंभरे (६५) अशी जखमींची नावे आहेत. यातील बहुसंख्य जखमींना डोक्यावर, छातीवर व चेहऱ्यावर जबर मार बसला आहे. ‘ट्रॉमा’च्या कॅज्युल्टीमध्ये रात्री उशिरापर्यंत या सर्व जखमींवर उपचार सुरू होते. यातील आठ रुग्णांची गंभीर प्रकृती पाहता त्यांना अतिदक्षता विभागात हलविण्यात आले. ट्रॉमाचे प्रमुख डॉ. मोहम्मद फैजल व डॉक्टरांची चमू या सर्वांवर लक्ष ठेवून आहेत. 

Web Title: The bus hit the bridge: 40 passengers injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.