भाज्यांचा दणका; गृहिणींचे बजेट बिघडले
By Admin | Updated: June 17, 2014 00:53 IST2014-06-17T00:53:58+5:302014-06-17T00:53:58+5:30
विदर्भात मान्सूनपूर्व पावसाची धडक आणि भाज्यांची घटलेली आवक या दोन कारणांमुळे नागपूर शहरात भाज्यांचे भाव गगनाला टेकले आहेत. वारंवार होणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका भाज्यांनाही बसत आहे.

भाज्यांचा दणका; गृहिणींचे बजेट बिघडले
स्थानिक आवक कमी : ठोकमध्येही भाज्या महागच
नागपूर : विदर्भात मान्सूनपूर्व पावसाची धडक आणि भाज्यांची घटलेली आवक या दोन कारणांमुळे नागपूर शहरात भाज्यांचे भाव गगनाला टेकले आहेत. वारंवार होणाऱ्या डिझेलच्या दरवाढीचा फटका भाज्यांनाही बसत आहे. परंतु, गेल्या काही दिवसांमध्ये भाज्या विकत घेताना श्रीमंतांनाही खिशाकडे डोकावून पाहावे लागत आहे.
भाज्यांच्या महागाईची झळ बसू लागली आहे. भाज्यांचा दणक्याने गृहिणींचे दैनंदिन बजेट बिघडले आहेत. किरकोळच नव्हे तर ठोक बाजारातही भाज्या महाग आहेत. काही भाज्या तर दुर्मिळ झाल्या आहेत. त्यांची खरेदी सामान्यांना परवडणारी नाही. भाज्या महागल्याने हॉटेल, रेस्टॉरंट मालकांनीही दर वाढविले आहेत. सर्वसाधारण १५ ते २० रुपये किलोप्रमाणे विकली जाणारी फूलकोबी किरकोळ बाजारात २५ रुपये भावाने घ्यावी लागत आहे. सांबार ठोक बाजारातच २५ रुपये किलो झाला असून किरकोळ विक्रेते चक्क ५० रुपयात विकत आहेत. दहा दिवसांआधी किरकोळमध्ये १० रुपये किलो विकले जाणारे टमाटर ३० रुपयांवर गेल्याची माहिती महात्मा फुले भाजी बाजार अडतिया असोसिएशनचे सचिव राम महाजन यांनी लोकमतला दिली.
नागपुरात टमाटरची आवक संगमनेर आणि नाशिकहून आहे. लवकरच जयपूर येथून आवक सुरू होईल.
कॉटन मार्केट ठोक बाजारात गोंदिया आणि भंडाऱ्यातून भेंडी, फूलकोबी छिंदवाडा आणि औरंगाबाद, हिरव्या मिरच्या परतवाडा, जगदलपूर, रायपूर येथून येत आहेत. याशिवाय स्थानिक उत्पादकांकडून चवळी भाजी, पालक, भेंडी, कारले आदींची आवक आहे. आधी २०० ते २५० लहानमोठ्या गाड्यांची आवक आता १४० ते १५० गाड्यांवर आली आहे. शिवाय नागपुरातून माल अन्य ठिकाणी विक्रीस जातो. शहराला पुरेल एवढी आवक नसल्याने भाज्या महाग झाल्याचे महाजन यांनी सांगितले.
पत्ताकोबी, पालक, कोहळे आवाक्यात
बहुतांश भाज्यांचे भाव आकाशाला भिडले आहेत. गृहिणींसमोर पत्ता कोबी, पालक, वांगे आणि कोहळ्याचा पर्याय आहे. सध्या आवक कमी आहे. गेल्या आठवड्यापर्यंत भाव आटोक्यात होते. पावसाळ्यापूर्वी मशागतीसाठी शेत खाली करावे लागते. त्यामुळे शेतात केवळ १० ते २० टक्के भाज्या आहेत. आॅगस्टपासून ५० टक्के भाज्यांची आवक सुरू होईल. दसरा आणि दिवाळीपर्यंत आवक मोठ्या प्रमाणात असते. तोपर्यंत ग्राहकांना भाज्या महागच मिळतील. (प्रतिनिधी)