ब्रिटिश उच्चायोग भारतीयांना मदत करणार
By Admin | Updated: November 22, 2015 02:55 IST2015-11-22T02:55:46+5:302015-11-22T02:55:46+5:30
ब्रिटनमध्ये उद्योग सुरू करण्यास उत्सुक असलेल्या नागपुरातील उद्योजकांना मुंबईतील ब्रिटिश उच्चायोग मदत करण्यास तयार असून,...

ब्रिटिश उच्चायोग भारतीयांना मदत करणार
कुमार अय्यर : ‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’चे उद्घाटन
नागपूर : ब्रिटनमध्ये उद्योग सुरू करण्यास उत्सुक असलेल्या नागपुरातील उद्योजकांना मुंबईतील ब्रिटिश उच्चायोग मदत करण्यास तयार असून, त्यासाठी विशेष सेल स्थापन करण्यात येणार असल्याची घोषणा मुंबईतील ब्रिटिश उपउच्चायुक्त आणि ब्रिटिश व्यापार व गुंतवणूक संचालक कुमार अय्यर यांनी येथे केली.
‘नागपूर फर्स्ट’तर्फे सलग दुसऱ्या वर्षी आयोजित ‘ग्लोबल नागपूर समिट-२०१५’चे दोन दिवसीय आयोजन आयटी पार्क येथील पर्सिस्टंट सिस्टिम्स येथे करण्यात आले आहे. उद्घाटनप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून ते बोलत होते. या समारंभात आमदार प्रा. अनिल सोले, मुंबई येथील स्वीडनचे महावाणिज्य दूत फ्रेडेरिका ओमब्राडंट, आॅस्ट्रेलियाचे महावाणिज्य दूत मार्क पिअर्स, नागपूर फर्स्टचे अध्यक्ष दिनेश जैन आणि संजय अरोरा उपस्थित होते.
नागपूर गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम
प्रा. अनिल सोले म्हणाले, भारताच्या भौगोलिक परिस्थितीमध्ये नागपूर हे गुंतवणुकीसाठी सर्वोत्तम शहर आहे. नागपूर शहर भूकंप, पूर आणि दंगारहित आहे. याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे उद्योजकांना मदतीसाठी तत्पर आहेत. मिहान-सेझमध्ये गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी मुख्यमंत्री प्रयत्नरत आहेत. केवळ एक वर्षात आयआयएम, एआयआयएमएस या दोन व्यावसायिक संस्था नागपुरात सुरू होण्यासाठी सज्ज आहेत. नागपूर हे देशात सर्वाधिक वेगाने विकास होणारे शहर समजले जात आहे. ग्लोबल नागपूर समिटमध्ये नागपूर हे गुंतवणुकीचे सर्वोत्तम ठिकाण घोषित केले आहे. त्यानुसार २०२० पर्यंत ग्लोबल सिटी होईल, असा विश्वास आहे. यावेळी मार्क पिअर्स आणि फ्रेडेरिका ओमब्राडंट यांनी मार्गदर्शन केले. दिनेश जैन यांनी ‘नागपूर फर्स्ट’तर्फे गेल्या काही वर्षांत घेण्यात आलेल्या उपक्रमांची माहिती दिली. संस्थेतर्फे अमेरिकेतील मिनेसोटा येथील मिनिओप्लोसिससह सिस्टर सिटी भागीदारी करार केला आहे. याशिवाय स्मार्ट सिटीसाठी विविध संस्थांशी चर्चा केली आहे. संस्थेने नागपूरसाठी ३० सदस्यीय स्मार्ट सिटी कौन्सिलची स्थापना केली आहे. यातील १५ सदस्य नागपूरचे तर १५ जण विदेशातील तज्ज्ञ आहेत. संजय अरोरा यांनी संचालन केले व उपस्थितांचे आभार मानले.(प्रतिनिधी)
विशेष सेल स्थापन करणार
अय्यर म्हणाले, गेल्या १०० वर्षांपासून भारत आणि ब्रिटन पारंपरिक व्यावसायिक भागीदार असून, दोघांमध्ये अतिशय जिव्हाळ्याचे संबंध आहेत. ब्रिटन हा भारतातील जी-२० मध्ये सर्वात मोठा गुंतवणूकदार आहे, तर भारत हा ब्रिटनमध्ये तिसऱ्या क्रमांकाचा गुंतवणूकदार आहे. याशिवाय आवश्यकतेपैकी २० टक्के इंधन पुरवठा भारत करतो; तसेच २५ टक्के औषधी आणि ब्रिटनमध्ये ३० टक्के रोजगार भारतीय उद्योजक देतात. अय्यर म्हणाले, भारतातील विविध एसएमई कंपन्या आपले विस्तारित उद्योग ब्रिटनमध्ये उभारण्यास उत्सुक आहेत. अशा उद्योजकांसाठी मुंबई उच्चायोग येथे विशेष सेल स्थापन करण्यात येणार आहे. यासाठी भारतीय उद्योजकांनी ब्रिटन येथे कोणतेही शुल्क न घेता प्रस्ताव पाठवावा, असे अय्यर यांनी सांगितले.
अय्यर म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लंडनला भेट दिली तेव्हा भारत आणि ब्रिटनमधील कंपन्यांमध्ये ९ अब्ज पौंडचे करार झाले आहेत. झालेले करार पुढील काही वर्षांत प्रत्यक्षात उतरणार आहेत. मोदी यांनी लंडनमध्ये ‘नॅशनल इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड’ची स्थापना केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
विद्यापीठाची भूमिका महत्त्वाची
नागपूरसारख्या शहरात ‘स्मार्ट सिटी’ होण्यासोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर महत्त्वाचे शहर होण्याची कुवत आहे. विशेष म्हणजे येथील नागरिकांचा तंत्रज्ञानातील रस आणि नवीन गोष्टी आत्मसात करण्याची तयारी या सकारात्मक बाबी आहेत. आंतरराष्ट्रीय पातळीवर आंतरराष्ट्रीय शहरांमधील परस्पर संबंध वाढत आहेत. आंतरराष्ट्रीय संबंध दृढ करण्यात विद्यापीठांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे नागपूर विद्यापीठाने त्यादृष्टीने प्रयत्न करायला हवे, अशी सूचना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय तज्ज्ञांद्वारे यावेळी आयोजित चर्चासत्रांमध्ये करण्यात आली.