गुंतवणुकीच्या संधी शोधणार ब्रिटन
By Admin | Updated: November 21, 2015 03:10 IST2015-11-21T03:10:41+5:302015-11-21T03:10:41+5:30
विकासाच्या दिशेने झेपावत असलेल्या नागपुरात ब्रिटन गुंतवणुकीच्या संधी शोधणार आहे. यासाठी येत्या रविवारी ब्रिटिश उच्चायुक्तांची पाच सदस्यीय चमू मिहानचा दौरा करणार आहे, ......

गुंतवणुकीच्या संधी शोधणार ब्रिटन
ब्रिटिश उपउच्चायुक्त अय्यर : रविवारी करणार दौरा
नागपूर : विकासाच्या दिशेने झेपावत असलेल्या नागपुरात ब्रिटन गुंतवणुकीच्या संधी शोधणार आहे. यासाठी येत्या रविवारी ब्रिटिश उच्चायुक्तांची पाच सदस्यीय चमू मिहानचा दौरा करणार आहे, अशी माहिती मुंबईतील ब्रिटिश उपउच्चायुक्त कुमार अय्यर यांनी दिली.
वार्षिक ग्लोबल नागपूर समिट २०१५ मध्ये सहभागी होण्यासाठी अय्यर नागपुरात आले आहेत. शुक्रवारी एका पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी सांगितले की, मिहानमध्ये गुंतवणूक करण्यासंदर्भातील निर्णय एमएडीसीच्या अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर आणि व्यापक सर्वेक्षणानंतरच घेतला जाईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या युके दौऱ्यात ९ बिलियन पौंडच्या गुंतवणुकीची घोषणा करण्यात आली होती. या गुंतवणुकीपैकी ७५ टक्के गुंतवणूक भारतात आणि उर्वरित २५ टक्के गुंतवणूक ब्रिटनमध्ये होणार आहे. ब्रिटिश सरकारही भारताला स्मार्ट सिटी प्रोजेक्टसाठी फंडिंग व तंत्रज्ञानाच्या माध्यमातून सहकार्य करेल. स्मार्ट सिटीमध्ये नागपूर, अमरावती आणि इंदूरचाही समावेश आहे. ब्रिटिश सरकार या शहरांच्या विकासासाठी मास्टर प्लॅन बनविण्यास मदत करणार आहे. यात नागरिकांची सुरक्षा, वाहतूक समस्या, संचार आणि तंत्रज्ञानाचा समावेश राहील. एका प्रश्नाच्या उत्तरात त्यांनी सांगितले की, एज्युकेशन हब म्हणून विकसित होत असलेल्या नागपुरातील विविध महाविद्यालयांना ब्रिटनमधील प्रमुख शैक्षणिक संस्था नॉलेज ट्रान्सफर व कौशल्य विकासासाठी सहकार्य करेल. यासाठी ब्रिटिश उच्चायुक्त नागपुरात हॉटेल तुली इम्पेरियलमध्ये रविवारी एका एज्युकेशन एक्स्पोचे आयोजन करणार आहे. यात ब्रिटनमधील प्रतिष्ठित संस्था विविध अभ्यासक्रमांची माहिती देतील. नुकतेच ब्रिटिश शासनाने ब्रिटनमध्ये सुरू असलेल्या बोगस संस्था बंद केल्या आहेत. परिणामी ब्रिटनचा व्हिसा घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या रोडावली आहे. ब्रिटनने व्हिसा जारी करण्याचे नियमही कडक केले आहेत. कारण भारतातील पदवीधरांना त्यांच्या योग्यतेनुसार रोजगार मिळावा, असे ब्रिटन सरकारने मानणे आहे. भारतात ब्रिटनच्या गुंतवणुकीमुळे रोजगाराच्या हजारो संधी निर्माण होतील. ब्रिटन जी-२० देशांच्या तुलनेत भारतात अधिक गुंतवणूक करीत आहे. सध्याच्या घडीला दोन्ही देशांमध्ये चांगले संबंध प्रस्थापित झाले आहे. (प्रतिनिधी)
महाराष्ट्र माझ्या रक्तात
ब्रिटिश नागरिक असलेले अय्यर मूळचे भारतीय आहेत. त्यांनी सांगितले की, महाराष्ट्राशी माझे अतूट नाते आहे. माझ्या आईचा जन्म मुंबईत झाला तर वडिलांचा जन्म पुण्यात झाला. त्यामुळे महाराष्ट्र माझ्या रक्तात आहे.