एप्रिलचा विक्रम मोडला
By Admin | Updated: April 22, 2016 04:43 IST2016-04-22T04:43:00+5:302016-04-22T04:43:00+5:30
वाढत्या तापमानातील उष्ण लाटांमुळे उपराजधानीतील संपूर्ण जनजीवन होरपळून निघाले आहे. त्यातच गुरुवारी

एप्रिलचा विक्रम मोडला
नागपूर : वाढत्या तापमानातील उष्ण लाटांमुळे उपराजधानीतील संपूर्ण जनजीवन होरपळून निघाले आहे. त्यातच गुरुवारी नागपुरातील तापमानाने मागील पाच वर्षांतील एप्रिल महिन्यामधील सर्वोच्च तापमानाचा विक्रम मोडीत काढून ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा गाठला आहे. यामुळे माणसांसह पशु-पक्ष्यांच्या जीवाची लाही-लाही होऊ लागली आहे. शिवाय संपूर्ण जनजीवन विस्कळीत झाले आहे.
गुरुवारचा दिवस हा नागपूरकरांसाठी यंदाच्या उन्हाळ्यातील सर्वांत ‘हॉट’ राहिला आहे. हवामान खात्याच्या आकडेवारीनुसार यापूर्वी गत ३० एप्रिल २००९ रोजी नागपुरातील तापमान ४७.१ अंशावर पोहोचले होते. त्यानंतर दुसऱ्या वर्षी म्हणजे, १७ एप्रिल २०१० रोजी सर्वोच्च तापमान ४५.२ अंश सेल्सिअस राहिले होते. मात्र यानंतर मागील पाच वर्षांत एप्रिल महिन्यातील तापमान कधीच ४५ अंशावर गेले नाही. परंतु गुरुवारी तब्बल पाच वर्षानंतर पुन्हा नागपुरातील तापमान ४५ अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे. विशेष म्हणजे, गुरुवारी सकाळपासूनच सूर्य आग ओकत होता. पाहता-पाहता दुपारी १२ वाजता रखरखत्या उन्हाचे चटके बसू लागले. यामुळे शहरातील सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते. जिकडे-तिकडे शुकशुकाट दिसून येत होता. हा सर्व परिणाम ४५ अंश सेल्सिअसचा होता. यामुळे दिवसभर संपूर्ण शहरात उन्हाचीच चर्चा होती. प्रत्येक जण आजचे कमाल तापमान किती ते जाणून घेण्यासाठी उत्सुक दिसून येत होता. त्यामागील कारणही तसेच होते, तापमानाने पाच वर्षांचा विक्रम मोडला होता.
हे करा....
भर उन्हात उघड्या डोळ्यांनी जाऊ नका, टोपी घालून किंवा ‘अॅण्टी रिप्लेक्शन कोटींग’ असलेले गॉगल्स वापरा.
तीनवेळा डोळे थंड पाण्याने धुवा.
भरपूर मात्रेत पाणी प्या.
सकाळी व्यायाम करा.
‘व्हिटॅमिन ए’असलेले पदार्थ जसे दूध, गाजर, पपई, आंबा, अंडे, मासे याचे सेवन करा.
‘कोल्ड्रिंक’पेक्षा निंबू पाणी प्या, यामुळे ‘व्हिटॅमिन सी’ मिळेल.