गुजरात व आंध्रातील बोगस बियाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांनो सावधान !
By Admin | Updated: May 9, 2014 01:47 IST2014-05-09T00:18:46+5:302014-05-09T01:47:42+5:30
शेतीतील समस्यांचा फायदा घेऊन गुजरात आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बोगस बियाणे दाखल झालेले आहेत. नानाविध नावाने असलेली ही नकली बियाणे बाजारात नव्हे,

गुजरात व आंध्रातील बोगस बियाणे महाराष्ट्रात शेतकऱ्यांनो सावधान !
मानवी साखळीच्या मदतीने विक्री
राजेश भोजेकर - वर्धा
शेतीतील समस्यांचा फायदा घेऊन गुजरात आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात बोगस बियाणे दाखल झालेले आहेत. नानाविध नावाने असलेली ही नकली बियाणे बाजारात नव्हे, तर मनुष्य साखळीच्या माध्यमातून शेतकर्यांच्या माथी मारली जात असल्याची धक्कादायक माहिती आहे. शेतामध्ये मजूर आणि तणाचा गंभीर प्रश्न आवासून उभा आहे. मजूर मिळविणे म्हणजे गड जिंकल्यासारखे झाले आहे. मजुराला वेळोवेळी आमिष देऊन, वाढीव मजुरी देऊन शेतात आणावे लागते. तरीही वेळेवर मजूर मिळत नाही आणि पाहिजे तसे आणि तितके काम होत शेतात होत नाही. त्या शिवाय तणाचा प्रश्नही मोठा आहे.
तण हे मुख्य पिकाशी पाणी, खतद्रव्ये, प्रकाश आणि जागा या बाबतीत स्पर्धा करते. त्यामुळे पिकाचे ५०-७० टक्केपर्यंत नुकसान करते. परिणामी उत्पन्नामध्ये घट येते. याचाच फायदा घेत गुजरात आणि आंध्र प्रदेशातून महाराष्ट्रात नानाविध नावाने खोटे, बेकायदेशीर, बोगस, नकली, नपुंसक बियाणे महाराष्ट्राच्या बाजारात दाखल झाल्याची भीती कृषी विभागाने वर्तविली आहे. हे बियाणे गावागावात दलालामार्फत विकले जात आहे. एकदा वापर करुन बघा, या तत्त्वावर शेतकर्यांना घेण्यास बाध्य करीत असल्याचेही कृषी विभागाचे म्हणणे आहे. वर्धेत हे बियाणे आढळल्याचे कृषी विभागाने मान्य केले आहे. हे बियाणे हे कुठल्या तंत्रज्ञानाने बनले आहे ते माहिती नाही. तसेच मान्यताप्राप्त कंपन्यांची बियाणे वगळता इतर कुठल्याही प्रकारचे बियाणे शेतकर्यांनी वापरु नये.
या बियाण्यांमुळे शेतावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता दाट आहे. असे बियाणे कुठलीही चाचणी पास केलेले नसते, त्यामुळे ते कितपत खरे आह,े याची काहीही खात्री नाही. कोणतीही व्यक्ती अशा प्रकारचे बियाणे विकत असताना किंवा लागवड करुन असताना आढळल्यास त्यांच्यावर बियाणे नियंत्रण आदेश १९८३ अंतर्गत कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे कृषी विभागातर्फे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा बियाण्यांबाबत तक्रार नोंदविण्यासाठी राज्यभरासाठी १८००२३३४०००, वर्धा जिल्ह्यासाठी ०७१५२-२५५००९९ हे टोल फ्री क्रमांक उपलब्ध करुन देण्यात आले आहे.