तरुणाचा चौकात खून
By Admin | Updated: September 15, 2014 01:04 IST2014-09-15T01:04:28+5:302014-09-15T01:04:28+5:30
यशोधरानगर चौकात असामाजिक तत्त्वांनी एका तरुणाचा दिवसाढवळ्या खून केला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे यशोधरानगरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका आठवड्याच्या

तरुणाचा चौकात खून
यशोधरानगरातील घटना : पितापुत्रासह तीन अटकेत
नागपूर : यशोधरानगर चौकात असामाजिक तत्त्वांनी एका तरुणाचा दिवसाढवळ्या खून केला. रविवारी दुपारी घडलेल्या या घटनेमुळे यशोधरानगरात दहशतीचे वातावरण पसरले आहे. एका आठवड्याच्या आत यशोधरानगर परिसरातील खुनाची ही दुसरी घटना आहे.
इजहार ऊर्फ मोनु इरशाद मलीक (१९) रा. परवेजनगर असे मृत तरुणाचे नाव आहे. यशोधरानगर पोलिसांनी रात्री उशिरा या खुनाचा सूत्रधार काजू खाँ, त्याचे वडील नन्हे खाँ आणि भाऊ कल्लू खाँ याला अटक केली. प्राथमिक चौकशीत दारू पिण्याच्यासाठी पैसे न दिल्यामुळे झालेल्या वादातून हा खून झाल्याचे सांगितले जात आहे.
मृत मोनू हा स्कूल आॅटो चालवित होता. त्याच्या कुटुंबात वडील, मोठा भाऊ सोनू आणि लहान भाऊ असलान आहेत. वडील आणि भाऊ सोनूसुद्धा आॅटोचालक आहेत. आज रविवार असल्याने शाळेला सुटी होती. त्यामुळे मोनू सकाळपासूनच वस्तीत फिरत होता.
दुपारी ३ वाजता मोनूचा भाऊ सोनू याला आरोपी काजूने दारू पिण्यासाठी पैसे मागितले. परंतु सोनूने नकार दिल्याने काजूने त्याला थापड मारली. सोनू तक्रार दाखल करण्यासाठी यशोधरानगर पोलीस ठाण्यात पोहोचला. आरोपीला जेव्हा माहिती झाली तेव्हा आरोपी व त्याचे कुटुंबीय सोनूला शोधू लागले. मोनूचे घर यशोधरानगर चौकात आहे. दुपारी ३.३० वाजता मोनू घराकडे पायी जात असताना काजू व त्याचे कुटुंबीय त्याच्याजवळ पोहोचले आणि त्याला शिवीगाळ करू लागले. समजावण्याचा प्रयत्न केला असता ते त्याला मारहाण करू लागले. त्यानंतर काही वेळाने आरोपी शस्त्रासह पोहोचले आणि त्याच्यावर हल्ला केला.
मोनूने स्वत:ला वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु अपयशी ठरला. त्याला गंभीर जखमी करून आरोपींनी पोबारा केला. नातलगांनी गंभीर जखमी अवस्थेत मोनूला मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु तोपर्यंत वेळ निघून गेली होती. डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.
आरोपी गुन्हेगारी प्रवृत्तीचे आहेत. घटनेत सहभागी असलेल्या शेबूच्या विरुद्ध खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल आहे. आरोपी यशोधरानगर पोलीस ठाणे परिसरात आॅटोच्या नावावर गुन्हेगारी कृत्य चालवित असल्याची माहिती आहे. जमीन बळकावण्याच्या टोळीसोबतच त्यांचे तार जुळले आहेत. १ सप्टेंबर रोजी प्रॉपर्टी डीलर ३५ वर्षीय जमील खान दिलावर खान ऊर्फ पटेल यांचासुद्धा संपत्तीच्या वादातून खून करण्यात आला होता. जमीलचा ३२ वर्षीय भाऊ नईम खान जखमी झाला होता.
खून होण्यापूर्वी खान बंधू आपले मोठे भाऊ वकील यांच्यासोबत यशोधरानगर पोलीस ठाण्यात मदत मागण्यासाठी आले होते. खुनाचा आरोपी सगीर अन्सारी आणि त्याचा मुलगा सरफराज खान बंधूंची वांजरी येथील जमीन बळजबरीने बळकावण्याचा प्रयत्न करीत होता. पोलिसांनी त्यांना मदतीचे आश्वासन देऊन परत पाठविले. परंतु पोलिसांनी मदत न पाठविल्याने जमीलचा खून करण्यात आला. पोलिसांनी फरार आरोपीला अजूनही पकडलेले नाही. (प्रतिनिधी)