२०० एकरातील कोबीवर ‘काळे ढग’
By Admin | Updated: November 18, 2016 03:12 IST2016-11-18T03:12:18+5:302016-11-18T03:12:18+5:30
उमरेड महामार्गालगत असलेल्या पाचगाव येथील शेकडो एकर फुलकोबी, भाजीपाला आणि अन्य पिकांवर सध्या ‘केमिकल लोचा’चे संकट घोंगावत आहे.

२०० एकरातील कोबीवर ‘काळे ढग’
पाचगावातील शेतकरी संकटात : कंपनीतील केमिकलचा साचतो थर
अभय लांजेवार उमरेड
नागपूर - उमरेड महामार्गालगत असलेल्या पाचगाव येथील शेकडो एकर फुलकोबी, भाजीपाला आणि अन्य पिकांवर सध्या ‘केमिकल लोचा’चे संकट घोंगावत आहे. यामुळे असंख्य शेतकरी हतबल झाले असून तातडीने कडक पाऊल उचलण्याची मागणी शेतकरी करीत आहेत. याप्रकरणी ४२ शेतकऱ्यांनी तक्रार केली असून पाचगाव, वडेगाव, आजनी, पिपरी परिसरातील सुमारे २०० एकर शेतीचा पट्टा एका कंपनीतून निघणाऱ्या घातक रसायनामुळे प्रभावित झाला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दत्तक घेतलेल्या पाचगावातील ही वस्तुस्थिती असून शेतकऱ्यांवरच आता संकट ओढवल्याने सर्वत्र असंतोष व्यक्त होत आहे.
पाचगाव येथून केवळ एक किमी अंतरावर कुही तालुक्यातील वडेगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत एक मॅगनीज कारखाना आहे. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर घातक रसायन धुराच्या माध्यमातून बाहेर पडत आहे. कारखान्याच्या चिमणीतून निघणारा धूर थेट शेतकऱ्यांच्या शेतातील पिकांवर द्रवरूपात पडत आहे.
या केमिकलमुळे पिके उद्ध्वस्त होत असून आतापर्यंत सुमारे ५० हेक्टर क्षेत्रातील फुलकोबीवर काळपट रंगाच्या रसायनाचा थर जमा झाला आहे. काळवंडलेल्या फुलकोबीवर पाण्याचा मारा केल्यानंतरही त्याच्यातील काळपटपणा निघत नसल्याने लाखो रुपयांचा फटका शेतकऱ्यांना बसला आहे. काळवंडलेली फुलकोबी व्यापारी बाजारपेठेत ठेवायला तयार नाहीत. यामुळे शेतकऱ्यांमध्ये नैराश्य निर्माण झाले आहे.
याशिवाय अनेकांच्या शेतात भाजीपाला, कापूस आदी पिकेही प्रभावित झाली असून मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याप्रकरणी शेतकऱ्यांनी पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, उपविभागीय अधिकारी डॉ. दीप्ती सूर्यवंशी, कुहीचे तहसीलदार मल्लिक वीरानी, कृषी अधिकारी आदींकडे निवेदन देत समस्या मांडली. दत्तक योजनेसाठी ‘खास’ गाव ठरलेल्या पाचगावात सुमारे ५० वर्षापासून फुलकोबीला अधिक पसंती आहे.
अन्यथा आंदोलन!
सदर मॅगनीज कारखान्याची चिमणी नियमानुसार बसविण्यात आली नाही. यामुळे शेतकऱ्यांवर संकट ओढवले आहे. कंपनीने तातडीने नुकसासभरपाई द्यावी, योग्य त्या उपाययोजना तातडीने कराव्यात अन्यथा आंदोलन करू, असा इशारा सरपंच पुण्यशीला मेश्राम, उपसरपंच रामाजी हटवार तसेच शेतकरी दिगांबर हटवार, शांताराम हटवार, रवींद्र हटवार, संदीप हटवार, राजेश हटवार, बळीराम माटे, बालू गाडेकर, चक्रधर गाडेकर आदींनी दिला आहे.