भाजपने स्वत:चे घर स्वच्छ ठेवावे
By Admin | Updated: June 5, 2016 02:45 IST2016-06-05T02:45:02+5:302016-06-05T02:45:02+5:30
भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला.

भाजपने स्वत:चे घर स्वच्छ ठेवावे
प्रफुल्ल पटेल : भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यानेच खडसे यांचा राजीनामा
नागपूर : भ्रष्टाचाराचे ठोस पुरावे असल्याने महसूल मंत्री एकनाथ खडसे यांना राजीनामा द्यावा लागला. खडसे ही तर सुरुवात आहे. राज्यातील चिक्की घोटाळा व शाळांना आग सुरक्षा यंत्र पुरवठ्यात याहूनही मोठा घोटाळा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारताचा नारा देत रस्त्यावरील कचरा साफ करण्यापूर्वी भाजपने स्वत: चे घर स्वच्छ ठेवावे, असा टोला राज्यसभेचे नवनिर्वाचित खासदार प्रफुल्ल पटेल यांनी शनिवारी लावला.
राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे हिस्लॉप कॉलेजच्या बाजूला असलेल्या चिटणवीस सेंटर येथे पटेल यांचा सत्कार सभारंभ आयोजित केला होता. या कार्यक्रमानंतर पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी माजी मंत्री अनिल देशमुख व रमेश बंग यांच्यासह पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. भ्रष्टाचाराचे पुरावे असल्यानेच खडसे यांनी राजीनामा दिला. कुणाच्या दबावात राजीनामा देण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. काचेच्या घरात राहणाऱ्यांनी दुसऱ्यांच्या घरावर दगड मारू नये, असा सल्लाही पटेल यांनी दिला.
काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या काळातही भ्रष्टाचाराचे आरोप झाले होते. त्यावेळीही राजीनामे घेतले होते. आमच्या पक्षातील काही नेते अग्निपरीक्षा देत आहेत. चौकशीतून सत्य पुढे येईल. कें द्र व राज्य सरकारकडून लोकांचा अपेक्षाभंग झाला आहे. शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही. कापूस, सोयाबीन व धानाचे भाव पडले आहेत.
दुसरीकडे सर्वशिक्षा अभियान, एनआरएचएम यासारख्या योजनांच्या निधीत मोठ्या प्रमाणात कपात केली आहे. एपीएल कार्डधारकांना देण्यात येणारे धान्य व केरोसीन बंद करण्यात आले आहे. शेतकरी, व्यापारी, उद्योजक व रोजगार या सोबतच कोणत्याही क्षेत्रातील व्यक्ती समाधानी नाहीत.
निवडणुकीत मोठमोठी आश्वासने देण्यात आली. केंद्रात व राज्यात मोठ्या पदावर विदर्भातील नेते आहेत. भाजप नेत्यांकडून गाजावाजा केला जात असलेले नागपुरातील मिहान, आयआयएम, मेट्रो रेल्वे, आयआयटी अशा संस्थांना आघाडी सरकारच्या काळात मंजुरी देण्यात आली होती. भाजप सरकारने नागपूरसह विदर्भासाठी नवीन काहीही आणलेले नाही. गेल्या दोन वर्षापूर्वी विदर्भ जेथे होता आजही तेथेच आहे. यात कोणताही बदल झालेला नाही. विदर्भात उद्योग येत नसल्याने रोजगाराच्या संधी उपलब्ध होत नाही. ही गंभीर बाब असल्याचे त्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
शहर राष्ट्रवादीतर्फे सत्कार
प्रफुल्ल पटेल यांची राज्यसभेवर बिनविरोध निवड झाल्यानिमित्त नागपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे संयोजक माजी मंत्री अनिल देशमुख, रमेश बंग व आमदार प्रकाश गजभिये यांनीही मार्गदर्शन केले. यावेळी विदर्भातील पक्षाचे नेते, पदाधिकारी उपस्थित होते. यात माजी मंत्री मनोहर नाईक, हर्षवर्धन देशमुख, चंद्रकांत ठाकरे, सुदर्शन निमकर,संतोष कोरपे, राजू तिमांडे, सुनील कोठारी, अनिल वऱ्हाडे, दीनानाथ पडोळे, शहर कार्याध्यक्ष प्रवीण कुंटे, ग्रामीणचे राजाभाऊ टाकसाळे, अनिल अहिरकर, वेदप्रकाश आर्य यांच्यासह विदर्भातील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते.
आघाडीचा निर्णय योग्य वेळी
काँग्रेससोबत आघाडी करून लढल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना फारशी संधी मिळालेली नाही. नागपूर शहरात विधानसभेची एकही जागा आमच्या पक्षाला मिळत नाही. पुढील वर्षात होत असलेल्या जिल्हा परिषदा व महापालिका निवडणुका डोळ्यापुुढे ठेवून पक्ष बळकट करण्यावर भर दिला जाईल. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीबाबतचा निर्णय योग्यवेळी घेतला जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
राष्ट्रवादीची बांधणी
विदर्भातील शेतकरी, उद्योजक, व्यापारी व बेरोजगार युवकांचे प्रश्न घेऊ न येत्या १५ दिवसात विदर्भातील सर्व जिल्ह्यात कार्यकर्त्यांचे मेळावे, सभा आयोजित करून विदर्भातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांना न्याय देण्याच्या प्रयत्नसोबतच पक्षाची नव्याने बांधणी करण्याचा संकल्प सत्कार समारंभात व्यक्त करण्यात आला.