भाजप पत्ते उघडेना!
By Admin | Updated: November 22, 2015 02:59 IST2015-11-22T02:59:52+5:302015-11-22T02:59:52+5:30
विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आहे. काँग्रेसने बऱ्यापैकी तयारी सुरू केली आहे.

भाजप पत्ते उघडेना!
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक : ‘वेट अॅण्ड वॉच’ ची भूमिका
नागपूर : विधान परिषदेच्या नागपूर स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक तोंडावर आहे. काँग्रेसने बऱ्यापैकी तयारी सुरू केली आहे. मात्र, दुसरीकडे भाजपने अद्याप आपले पत्ते उघडलेले नाहीत. पक्षात इच्छुक उमेदवारांची मोठी रांग आहे. उमेदवार निश्चित करताना अनेकांच्या राजकीय पुनर्वसनाचा प्रश्न विचारात घ्यावा लागणार आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या गृहजिल्ह्यातील ही निवडणूक आहे. त्यामुळे भाजपकडून प्रत्येक पाऊल सावधपणे टाकले जात आहे.
नागपूरची ही जागा सध्या काँग्रेसचे आमदार राजेंद्र मुळक यांच्या ताब्यात आहे. ही जागा जिंकून भाजपला आपला दबदबा सिद्ध करायचा आहे. ही जागा भाजपच्या हातून गेली तर त्याची राज्यात चर्चा होईल व विरोधकांना अधिकच बळ मिळेल, याची जाणीव भाजप नेत्यांना आहे. त्यामुळे जवळचा, दूरचा असे सर्व भेदाभेद बाजूला सारून निवडून येण्याची शक्यता असलेल्या व पक्षाशी एकनिष्ठ राहिलेल्या उमेदवारालाच संधी द्यायची, असा विचार भाजपमध्ये सुरू आहे. गेल्या निवडणुकीत चार मतांनी पराभव पत्करावा लागलेले माजी आ. अशोक मानकर, महापौर प्रवीण दटके, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष संदीप जोशी, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रमेश मानकर, भाजपचे प्रदेश प्रवक्ते गिरीश व्यास आदींची नावे चर्चेत आहे. प्रत्येकाचा दावा एकमेकांपेक्षा तगडा आहे. कुणी पक्ष अडचणीत असताना भार उचलला, तर कुणी पक्षाने विधानसभेची उमेदवारी नाकारल्यानंतरही पक्षाचा झेंडा सोडला नाही. त्यामुळे कुणाची पक्षनिष्ठा अधिक हे ठरविणे नेत्यांसाठी देखील कठीण झाले आहे.
कोणतीही निवडणूक म्हटली की भाजपची धामधूम वेळेआधीच सुरू होते. या निवडणुकीत मात्र सारेच कमालीचे शांत आहेत. इच्छुक उमेदवार उघडपणे दावेदारी करण्यास मागेपुढे पाहत आहेत तर स्थानिक नेतेही सध्या काहीच ठरले नाही, असे सांगून ‘वेट अॅण्ड वॉच’ ची भूमिका घेत आहेत.
विशेष म्हणजे विधान परिषदेच्या या निवडणुकीसाठी भाजपतर्फे अद्याप एकही अधिकृत बैठक घेण्यात आलेली नाही. निरीक्षक नेमण्यात आलेले नाहीत. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनंतरच अशी बैठक होईल. वरून सर्व शांत दिसत असले तरी पडद्यामागून मात्र नियोजन सुरू आहे, इच्छुक उमेदवारांच्या नावांची मतदारांमध्ये चाचपणीही केली जात आहे, असे स्थानिक नेत्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)