जन्मत: व्यंगामुळे ७ टक्के बालमृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:11 IST2021-03-04T04:11:26+5:302021-03-04T04:11:26+5:30
नागपूर : जन्मदोष म्हणजेच जन्मापासूनच बालकांमध्ये आढळणारे रचनात्मक किंवा कार्यात्मक दोष. जागतिक आरोग्य संघटनेच्यामते जगभरात सहा टक्के बालकांना जन्मत:च ...

जन्मत: व्यंगामुळे ७ टक्के बालमृत्यू
नागपूर : जन्मदोष म्हणजेच जन्मापासूनच बालकांमध्ये आढळणारे रचनात्मक किंवा कार्यात्मक दोष. जागतिक आरोग्य संघटनेच्यामते जगभरात सहा टक्के बालकांना जन्मत:च दोष किंवा व्यंग असते. यापैकी ९४ टक्के घटना या विकसनशील देशांमध्ये घडतात. भारतात जन्मत: व्यंगामुळे ७ टक्के बालमृत्यू होतात. यामुळे जन्मदोषाची जनजागृती होणे गरजेचे आहे, अशी माहिती पेडियाट्रिक सर्जन डॉ. दिनेश सारडा यांनी दिली.
३ मार्च हा दिवस ‘वर्ल्ड बर्थ डिफेक्ट डे’ म्हणजे जागतिक जन्मत: दोष दिवस पाळला जातो. त्यानिमित्ताने ते ‘लोकमत’शी बालत होते. डॉ. सारडा म्हणाले, देशात दरवर्षी १७ लाखांच्या जवळपास बालके व्यंग घेऊन जन्माला येतात. वास्तविक आकडा याहूनही जास्त असू शकतो. या आजारावरील उपचारासाठी मातेच्या गर्भामधील व जन्मत: आढळणाऱ्या व्यंगाचा सखोल अभ्यास होणे, नोंदणी व वास्तविक आकड्यांचा सांख्यिकी अभ्यास होणे आवश्यक आहे.
-जन्मजात विकृती गर्भावस्थेच्या काळात विकसित होतात
डॉ. सारडा म्हणाले, जन्मजात व्यंग किंवा विकृतीमध्ये बाह्य किंवा अंतर्गत शारीरिक दोष, कार्यात्मक दोष समाविष्ट असतात. जे शरीरप्रणाली किंवा गुणसूत्रांच्या कार्यावर परिणाम करतात. निसर्गात संरचनात्मक असलेल्या जन्मदोषांना जन्मजात विकृती किंवा जन्मजात विसंगती असेही म्हणतात. या विकृती गर्भावस्थेच्या काळात विकसित होतात .
-हृदयरोग व न्यूरल ट्यूब दोष हे सामान्य जन्मदोष
जन्मजात हृदयरोग आणि न्यूरल ट्यूब दोष हे सर्वात सामान्य संरचनात्मक जन्मदोष आहेत. याशिवाय, जननमूत्रमार्ग विसंगती, रिक्त अंडकोष, मूत्रमार्गात अडथळा व किडनीला इजा, श्वास व अन्नमार्ग एकत्र होणे, आतड्यांचा अॅट्रेशिया, गुदद्वार बंद असणे, पोटाच्या भिंतीतील दोष, याशिवाय ‘डाऊन्स सिंड्रोम’, ‘हिमोग्लोबिनोपॅथी’, ‘मेटाबॉलिक’ असामान्यता आणि जन्मजात ‘हायपोथायरॉइडिझम्’ हे सामान्य ‘नॉनस्ट्रक्चरल’ (कार्यात्मक) जन्मदोष असल्याचे डॉ. सारडा म्हणाले.
-भारतीयांमध्ये जन्मदोषांचा धोका अधिक
विवाहाची सार्वत्रिकता, उच्च प्रजननक्षमता, मोठ्या संख्येने अनियोजित गर्भधारणा, मातांचे अपुरे पोषण आणि नातेवाईकांमध्येच विवाहाचे प्रमाण यामुळे भारतीय लोकांना जन्मदोषांचा धोका अधिक असल्याचे डॉ. सारडा म्हणाले.
-लवकर निदान व उपचार आवश्यक
जन्मत: व्यंगाचे लवकर निदान व उपचार आवश्यक आहेत. ज्यांपैकी बहुतेक व्यंग आता शस्त्रक्रियेने किंवा बिना शस्त्रक्रियेने दुरुस्त केले जातात. जन्माच्या दोषांमुळे बाळांवर परिणाम होऊ शकतो.
-जन्मजात विसंगती टाळणे शक्य
डॉ. सारडा म्हणाले, गरोदर मातांना सकस आहार पुरविणे, फॉलिक अॅसिड सप्लिमेंटेशन, तंबाखू आणि अल्कोहोलचे सेवन टाळणे हे बाळांमध्ये व्यंग टाळण्यासाठी अतिशय आवश्यक आहे. जन्मत: दोष असल्याचे निदान झाल्यानंतर गर्भ पाडणे, अनावश्यक, अनैतिक, बेकायदेशीर असे निर्घृण प्रकार होतात. ते टाळयला हवेत.