उष्माघातामुळे पक्ष्यांचा मृत्यू
By Admin | Updated: June 9, 2014 01:19 IST2014-06-09T01:19:31+5:302014-06-09T01:19:31+5:30
विदर्भाचे तापमान ४७ अंशांवर गेले आहे. सर्वच जण हैराण झालेले असतानाच पक्ष्यांनाही उन्हाचा फटका बसला आहे. चिमण्या, बुलबुल, भारद्वाज, लालबुड्या बुलबुल, चातक, कोकिळा, मैना या छोट्यापक्ष्यांसह

उष्माघातामुळे पक्ष्यांचा मृत्यू
नागपूर : विदर्भाचे तापमान ४७ अंशांवर गेले आहे. सर्वच जण हैराण झालेले असतानाच पक्ष्यांनाही उन्हाचा फटका बसला आहे. चिमण्या, बुलबुल, भारद्वाज, लालबुड्या बुलबुल, चातक, कोकिळा, मैना या छोट्यापक्ष्यांसह शिकारी पक्षी असलेले कापश्या, काळी घार आणि शिकारासारखे पक्षी उष्माघाताचे बळी पडत आहेत.
विदर्भातील वाढत्या तापमानाने सर्वसामान्यांचे हाल होत आहेत. याची झळ आता पक्ष्यांनाही बसत आहे. गेल्या काही दिवसांमध्ये पक्ष्यांच्या आजारपणामध्ये वाढ झाल्याचे चित्र आहे. विशेष म्हणजे पक्ष्यांची या आजारपणापासून सुटका व्हावी, यासाठी काही स्वयंसेवी संघटना धावून आल्या आहेत. परंतु तापमानाचा पारा गेल्या काही दिवसांपासुन ४५ अंश सेल्सिअसच्यावरच स्थिरावल्याने अनेकांचा नाईलाज झाला आहे. वाढत्या उकाड्य.ाने पक्ष्यांनाही त्याचा त्रास व्हायला लागला आहे.
वन्यजीव अभ्यासक यादव तरटे यांनी सांगितले, लहान आकाराच्या पक्ष्यांना आणि शिकारी पक्ष्यांना वाढत्या गरमीचा अधिक परिणाम सहन करावा लागत आहे. शहरात आढळून येणार्या शिकारा, कापश्या, काळी घार हे शिकारी पक्षी जमिनीपासून साधारण १00 ते २00 फूट उंचीवर उडतात. जमिनीवरील सरडा, उंदीर, साप यासारख्या भक्ष्यासाठी त्यांना उडावेच लागते. यामुळे ते सतत सूर्याच्या संपर्कात असतात.
पक्ष्यांना घामही येत नाही. शरीराचे तापमान वाढते आणि धाप लागून ते जमिनीवर कोसळतात. अमरावती, चंद्रपूर, नागपूर यासारख्या शहरात उष्माघाताने बळी पडलेले हे पक्षी दिसून येऊ लागले आहे. छोट्या पक्ष्यांनाही उन्हाचा फटका बसत आहे. चिमण्या, बुलबुल, भारद्वाज, लालबुड्या बुलबुल, चातक, कोकिळा, मैना यांची संख्या सर्वाधिक आहे.
पक्षी निरीक्षक खंडारे यांनी सागितले, वाढत्या उकाड्यामुळे पक्ष्यांनाही चक्कर येणे, जखमा होणे यासारख्या अनेक आजारपण सहन करावे लागतात. नागपुरात गेल्या काही दिवसांपासून चिमण्या आणि कबूतर यांच्या आजारी पडण्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
विशेषत: ४५ अंशांवर पारा गेल्यानंतर याचा सर्वाधिक परिणाम पडतो तो चिमण्यांसह सर्व लहान पक्ष्यांवर. चिमण्यांना तर दर १५ ते २0 मिनिटांनी पाणी हवे असते. ते वेळेवर न मिळाल्यास त्या उष्माघाताचे बळी पडण्याची दाट शक्यता असते. यामुळे प्रत्येकाने सावलीच्या ठिकाणी पक्ष्यांसाठी पाण्याची सोय करणे आवश्यक आहे. सद्यस्थितीत अनेक छोट्या पक्ष्यांनी नाल्याच्या कडेला असलेल्या झुडपात आश्रय घेतल्याचे दिसून येत आहे.(प्रतिनिधी)