विद्यार्थ्यांनो ‘जॉब क्रिएटर’ व्हा!

By Admin | Updated: September 16, 2014 02:22 IST2014-09-16T02:22:50+5:302014-09-16T02:22:50+5:30

अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर कोणालाही अगदी

Become a 'Job Creator' for Students | विद्यार्थ्यांनो ‘जॉब क्रिएटर’ व्हा!

विद्यार्थ्यांनो ‘जॉब क्रिएटर’ व्हा!

बी.एल.दीक्षातुलू : ‘व्हीएनआयटी’चा बारावा दीक्षांत समारंभ उत्साहात पडला पार
नागपूर :
अभियांत्रिकीचे शिक्षण घेतल्यानंतर कोणालाही अगदी सहजपणे चांगली नोकरी मिळू शकते. बहुतांश विद्यार्थीदेखील त्याच दृष्टीने प्रयत्न करतात. परंतु देश व समाजाच्या प्रगतीसाठी विद्यार्थ्यांनी ‘जॉब क्रिएटर’ व्हावे. यासाठी अभियांत्रिकीच्या शिक्षणात काळाप्रमाणे बदल करणे आवश्यक आहे असे मत हैदराबाद येथील ‘नॅशनल रिमोट सेंसिंग एजन्सी’चे माजी संचालक पद्मश्री बी. एल. दीक्षातुलू यांनी व्यक्त केले. ते ‘व्हीएनआयटी’च्या (विश्वेश्वरय्या नॅशनल इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी) १२ व्या दीक्षांत समारंभात बोलत होते.
आज झालेल्या या समारंभात १०२८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. संस्थेच्या सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या या समारंभाला संचालक डॉ.नरेंद्र चौधरी व निरनिराळ््या शाखांचे अधिष्ठाता प्रामुख्याने उपस्थित होते.
आज तंत्रज्ञानाचे युग आहे. काळाप्रमाणे अभियांत्रिकीच्या शिक्षणप्रणालीतदेखील मोठ्या प्रमाणावर बदल होत आहेत. त्यामुळे अभियांत्रिकीचा अभ्यासक्रम हा एकांगी नको. त्यात निरनिराळ््या विषयांचे सखोल ज्ञान देणे आवश्यक आहे.
याशिवाय समाज व देशाला ज्या गोष्टींची आवश्यकता आहे असे मुद्दे त्यात असायला हवेत. परंतु दुर्दैवाने अभियांत्रिकी संशोधनाबद्दल अद्यापही गैरसमज आहेत. उद्योगजगत तसेच शासनाकडूनदेखील त्याला फारसे प्रोत्साहन दिले जात नाही. आपल्या देशातील बहुतांश विद्यापीठांत विसाव्या शतकाची मानसिकता असलेल्या महाविद्यालयांकडून २१ व्या शतकातील अभियंते घडविण्याचे प्रयत्न होत आहेत अशी खंत बी.एल.दीक्षातुलू यांनी व्यक्त केली.
अभियांत्रिकी संस्थांनी ‘प्रॅक्टिकल’ भूमिका ठेवून आकर्षक, समाजाच्या गरजा पूर्ण करणारा आणि विद्यार्थ्यांना अष्टपैलू बनविणारे अभ्यासक्रम तयार करायला हवेत. ऊर्जाक्षेत्राशी संबंधित संशोधनाला प्रोत्साहन दिले पाहिजे असा सल्लादेखील त्यांनी यावेळी दिला. अभियंता दिनाचे औचित्य संस्थेच्यावतीने दीक्षांत समारंभाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. नरेंद्र चौधरी यांनी पदवीदान करण्याअगोदर ‘डायरेक्टर्स रिपोर्ट’ सादर केला.
निराशेवर मात करून ‘विकास’
बी.टेक.च्या ‘मेकॅनिकल’ शाखेचा विद्यार्थी विकास मित्तल याचा सर विश्वेश्वरय्या पदकाने सन्मान करण्यात आला. बारावीत कमी गुण मिळाल्यानंतर विकास निराश झाला होता. परंतु त्यानंतर ‘व्हीएनआयटी’त आल्यावर निराशा झटकून तो अभ्यासाला लागला व त्याचे फळ त्याला मिळाले. वेळेच्या नियोजनातून मला हे यश साकारता आले. अभ्यासासोबतच इतरही खेळ, निरनिराळ््या स्पर्धा यासारख्या अवांतर बाबींमध्ये मला रस होता. परंतु याचा परिणाम अभ्यासावर होऊ दिला नाही. सध्या मी एका नामांकित कंपनीत नोकरी करत असलो तरी मला उच्च शिक्षणासाठी ‘युनायटेड किंगडम’ला जायचे आहे असे त्याने सांगितले. विकासला तीन सुवर्णपदकांसह नऊ पुरस्कार मिळाले.(प्रतिनिधी)
१०२८ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान
४दीक्षांत समारोहात एकूण १०२८ विद्यार्थ्यांना पदवीदान करण्यात आले. संस्थेचे संचालक डॉ. नरेंद्र चौधरी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करण्यात आल्या. यात ३३ आचार्य पदवी (पीएच.डी.), ३०६ एम. टेक, २ संशोधन, ३७ एमएस्सी व ६५० बी. टेक व बी. आर्चच्या विद्यार्थ्यांचा समावेश होता. बी. टेक अभ्यासक्रमाचे विद्यार्थी विकास मित्तल व अश्विनी भराडे यांना सर विश्वेश्वरय्या सुवर्ण पदकाने सन्मानित करण्यात आले. तसेच राज पारिख, विपुला जुनघरे, भावेश बिर्ला, स्नेहल राऊत, चंदन पांडे, अभिषेक भंसाळी व पृथा चिद्दरवार या विद्यार्थ्यांनी त्यांच्या शाखेत सर्वांधिक ‘सीजीपीए’ प्राप्त केल्याबद्दल त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आले. बी.टेक.च्या ‘सिव्हिल’ शाखेची विद्याथिनी विपुला जुनघरे हिला सर्वाधिक ‘सीजीपीए’ मिळाल्याबद्दल नऊ पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
‘पॅकेज’ नाही संशोधनाला प्राधान्य
अश्विनी भराडे या बी.टेक.मधील ‘इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅन्ड कम्युनिकेशन’ शाखेच्या विद्यार्थिनीचादेखील सर विश्वेश्वरय्या पदकाने सन्मान करण्यात आला. तिला चार सुवर्णपदकांसह एकूण आठ पुरस्कार मिळाले. माझ्यावर कधीही अभ्यासाचा दबाव नव्हता. एखादा विषय केवळ परीक्षेपुरता न शिकता त्याच्या ‘बेसिक’वर मी लक्ष दिले. त्यामुळे कुठलाही मुद्दा फारसा अडला नाही असे अश्विनीने सांगितले. अश्विनी सध्या ‘आयआयटी’ कानपूर येथून ‘एमटेक’ करत असून पुढे अभियांत्रिकी संशोधन क्षेत्रातच काम करायचे असल्याचे तिने सांगितले. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम हे माझे आदर्श असून मला ‘पॅकेज’पेक्षा संशोधनात जास्त रस आहे असे ती म्हणाली.

Web Title: Become a 'Job Creator' for Students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.