आनंद डेकाटे, नागपूरलोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : संविधानाचा प्रचार प्रसार करण्याच्या उद्देशाने बार्टीतर्फे यंदाही संविधान दींडी काढण्यात आली आहे. यासाठी बार्टीची संपूर्ण यंत्रणा कामाला आगली आहे. १९ जूनपासून सुरू झालेली ही दिंडी ५ जुलैपर्यंत चालणार आहे. संविधानाचा प्रचार प्रसार योग्यच आहे. परंतु त्या संविधानाच्या अंमलबजावणीचे काय? ज्या विद्यार्थ्यांसाठी बार्टी स्थापन झाली त्याचे काय. जेईई, नीट प्रशिक्षणाला अजुनही सुरूवात झालेली नाही. विदेशी विद्यापीठाच्या शिष्यवृत्तीची अजुनही विद्यार्थ्यांना प्रतीक्षाच आहे.
दहावीचा निकाल लागून महिना होत आला आहे. परंतु बार्टीतर्फे देण्यात येणाऱ्या जेईई व नीटच्या मोफत प्रशिक्षणाला अद्याप सुरुवात झालेली नाही. हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वर्षाशी संबंधित असल्याने ते वेळेत सुरू होणे अपेक्षित आहे. हजारो मागासवर्गीय विद्यार्थी या प्रशिक्षणाच्या प्रतीक्षेत असून त्याचा मुहूर्त कधी निघणार असा प्रश्न विचारला जात आहे.
दहावीच्या निकाल लागताच पालक व विद्यार्थी जेईई व नीटच्या तयारीला लागतात. त्यादृष्टीने इतर खासगी संस्थामध्ये प्रशिक्षणाला एप्रिल महिन्यातच सुरुवात झाली आहे. राज्यातील अनुसूचित जातीच्या शेकडो गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांच्या पालकांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असल्यामुळे ते खासगी प्रशिक्षण घेण्यास असमर्थ आहेत. त्यांच्यासाठी बार्टी मोठा आधार आहे व ते या प्रशिक्षणच्या आतुरतेने प्रतीक्षेत आहेत. प्रशिक्षण घेऊन हे गुणवंत विद्यार्थी देशातील नामांकित आयआयटी, एनआयटी आणि वैद्यकीय महाविद्यालय मध्ये प्रवेश प्राप्त करू शकतात. या वर्षीच्या प्रशिक्षणाला खूप जास्त विलंब होत असल्यामुळे शेकडो अनुसूचित जातीच्या विद्यार्थांचे भवितव्य धोक्यात येऊ शकते. वर्ग १० वी चा निकाल लागून बरेच दिवस झाल्यामुळे विद्यार्थी व पालकाकडून बार्टीच्या अधिकृत प्रशिक्षण संस्थांमध्ये यावर्षीचे प्रशिक्षणाबाबत सातत्याने विचारणा होत आहे.
फाॅरेन स्काॅलरशीप साठी विद्यार्थी ताटकळतफाॅरेन स्काॅलरशीपसाठी अनेक विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. विद्यार्थ्यांचे प्रवेश जवळ आले आहेत. परंतु स्काॅलरशीपचीयादी न लागल्याने विद्यार्थी प्रवेशासाठी ताकटळत बसले आहेत. याबाबत विद्यार्थी विचारणा करतात तेव्हा त्यांना विभागाकडून कुठलेही समाधानकारक उत्तर मिळत नसल्याचे सांगितले जाते.