बँक कर्मचाऱ्यांनो तणावाला दूर ठेवा

By Admin | Updated: November 19, 2016 03:08 IST2016-11-19T03:08:22+5:302016-11-19T03:08:22+5:30

५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बँकांमधील काम प्रचंड वाढले आहे.

Bank employees keep the weights out of weedness | बँक कर्मचाऱ्यांनो तणावाला दूर ठेवा

बँक कर्मचाऱ्यांनो तणावाला दूर ठेवा

मानसोपचारतज्ज्ञाचा सल्ला : आनंदी राहून काम करा
नागपूर : ५०० आणि १००० च्या नोटा चलनातून बाद करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयानंतर बँकांमधील काम प्रचंड वाढले आहे. लोकांची गर्दी सांभाळत पैशांचा व्यवहार करण्याच्या या जोखमीच्या कामाला तोंड देताना बँकेचे कर्मचारी प्रचंड तणावाखाली आले आहेत. यातून अनेकांना आजार वाढले असून काही मृत्यूलाही सामोरे जात आहे, अशावेळी बँक अधिकाऱ्यांनो तणावाला दूर ठेवा, आनंदी राहून काम करा, असा सल्ला मानसोपचारतज्ज्ञांनी दिला आहे.
बँकेतील कर्मचारी नियमित वेळेच्या तासभर आधीपासून ते रात्री उशिरापर्यंत कामात व्यस्त आहेत. दिवसभर रांगांमध्ये लागणाऱ्या नागरिकांना नोटा बदलून द्यायच्या किंवा त्यांचे पैसे जमा करून घ्यायचे व सायंकाळी व्यवहार बंद झाल्यानंतर खर्चाचा ताळेबंद करणे असा दिनक्रम सुरू आहे. यातच अनेक बँकांमध्ये कर्मचाऱ्यांची कमतरता असल्याने कामाची जबाबदारी वाढली आहे. परिणामी, मनावर याचा तणाव निर्माण होणे अपरिहार्य आहे. परंतु तणावावर नियंत्रण आणण्याचे कौशल्य आपल्याला अवगत झाले पाहिजे तरच पुढील आयुष्य आनंदात घालवता येईल, असे मत केईएम हॉस्पिटलचे मानसोपचार तज्ज्ञ डॉ. सागर मुंधडा यांचे आहे. ते म्हणाले, कामाची चिंता करीत विविध रोगांना आमंत्रण देण्यापेक्षा त्याचे नियोजन करण्यासाठीचे प्रयत्न केले पाहिजे. सकारात्मक विचार मनात असला की तणाव निर्माण होण्याचा प्रश्न उद्भवत नाही. धावपळीच्या या युगात मनासारखे काम झाले नाही तर मानसिक ताण वाढतो. म्हणून तणावाचा निचरा होणे आवश्यक आहे. आपल्या क्षमतेनुसार काम करा. आकस्मिक घडणाऱ्या घटनांकडे शांत चित्ताने पहा. आधी काय साध्य करायचे ते ठरवा. त्यानुसार ताण न घेता ते साध्य करण्याचा प्रयत्न करा, असे आवाहनही त्यांनी केले.
प्रसिद्ध मानसोपचारतज्ज्ञ डॉ. अविनाश जोशी म्हणाले, तणाव दीर्घकाळ राहिल्यास चिंतेचे रूप धारण करतो. मानसिक एकाग्रता ढळते. डोकेदुखी सुरू होते. कामात अडचणी येतात. थकवा वाटू लागतो. मन व शरीरावर तणावाचे अनिष्ट परिणाम सुरू होतात. अनेकदा मानसिक संतुलनही बिघडते. चिडचिडेपणा येतो. संताप वाढतो. आरोग्य बिघडते. याशिवाय मानसिक आजारही घेरतात. बँक कर्मचाऱ्यांचे काम हे जोखमीचे असलेतरी त्यांनी वैयक्तिक घेऊ नये.
हे काम देशाचे आहे, सार्वजनिक हिताचे आहे असे समजून घेणे आवश्यक आहे. आनंदाने कामाला सामोर जा. सतत काम करणे टाळा. विश्रांतीही घ्या, असेही ते म्हणाले. (प्रतिनिधी)

Web Title: Bank employees keep the weights out of weedness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.