बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र बनेल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:59 IST2021-02-05T04:59:21+5:302021-02-05T04:59:21+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : एकसंघ आणि सक्षम महाराष्ट्र घडविताना विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. महाविकास आघाडीचे ...

बाळासाहेब ठाकरे आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान आदिवासी समाजाचेही केंद्र बनेल
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : एकसंघ आणि सक्षम महाराष्ट्र घडविताना विदर्भाकडे दुर्लक्ष होऊ दिले जाणार नाही. महाविकास आघाडीचे प्रत्येक पाऊल हे विकासाचे असेल, असा शब्द देण्यासोबतच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यानात उभारले जाणारे गोंडवाना ‘थीम पार्क’ हे आदिवासींच्या संस्कृतीचे केंद्र ठरेल, अशी ग्वाही दिली.
स्व. बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान असे नामकरण आणि त्यातील इंडियन सफारीचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सोमवारी दुपारी पार पडले. अध्यक्षस्थानी वनमंत्री संजय राठोड होते. गृहमंत्री अनिल देशमुख, ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत, पशुसंवर्धन व दुग्ध विकास मंत्री सुनील केदार, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, वनविभागाचे प्रधान सचिव मिलिंद म्हैसकर, राज्याचे प्रधान मुख्य वनसंरक्षक (वनबल प्रमुख) एन. रामबाबू प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्यानाच्या नामकरणाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या विरोधाचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले, या नामकरणावरून कुणीही नाराज होण्याचे किंवा अस्वस्थ होण्याचे कारण नाही. आदिवासींची संस्कृती जोपासण्याचे काम या प्रकल्पामध्ये होईल. या प्रकल्पाच्या कामातील पुढील टप्प्यात गोंडवाना थीम पार्क उभारले जाईल.
मागील दहा वर्षांच्या नस्ती विरोधकांनी तपासाव्यात. त्यात कुठेही गोंडवाना असे नाव देण्याचा उल्लेख नाही, असे आवाहन संजय राठोड यांनी
केले. एफडीसीएमचे व्यवस्थापकीय संचालक एन. वासुदेवन यांनी प्रास्ताविक केले तर आभार ऋषिकेश रंजन यांनी मानले.
...
गोसेखुर्दच्या पाण्याने गैरसमज धुऊन काढायचाय
मुख्यमंत्री म्हणाले, आमच्या धमण्यात विदर्भाचे रक्त वाहत आहे. विदर्भाबाबतचे प्रेम आम्हाला कोणी शिकवू नये. या सरकारबाबत विकासासंदर्भातील गैरसमज जाणून-बुजून पसरवला जात आहे. आता गोसेखुर्दच्या पाण्यानेच तो धुऊन काढायचा आहे. नागपूर-शिर्डी समृद्धी महामार्गाचे लोकार्पण १ मे रोजी करण्याचा आणि सुरजागडचा प्रकल्प लवकरच मार्गी लावण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
...
मुख्यमंत्री प्रसार माध्यमांना घाबरले का?
कोरोनाचे कारण दर्शवून या उद्घाटन समारंभापासून प्रसार माध्यमांना दूर ठेवण्यात आले. निमंत्रिकाही नव्हत्या. त्यामुळे कुणीही पत्रकार उपस्थित नव्हते. मुख्यमंत्री सचिवालयातूनच असे आदेश असल्याचे सांगण्यात येत होते. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना पत्रकारांची ॲलर्जी आहे की काय, असा सूर उमटत होता. दोन दिवसांपूर्वीच शंभरांवर पत्रकारांना एकत्रित बोलावून वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी पत्रकार परिषद घेतली होती, तेव्हा कोरोना नव्हता का, असा प्रश्नही या निमित्ताने उपस्थित होत आहे.
...