नागपूर : या देशाला एकच संविधान अभिप्रेत आहे. देशाला एकसंध ठेवण्यासाठी एकच राज्यघटना असली पाहिजे, असे डाॅ. बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते. फक्त एका राज्याकरिता वेगळी राज्यघटना ही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला अभिप्रेत नव्हती. त्यामुळे संसदेने जेव्हा कलम ३७० रद्द करण्याचा निर्णय घेतला आणि सर्वोच्च न्यायालयात प्रकरण आले तेव्हा एकाच संविधानाने देश चालावा म्हणून सर्वोच्च न्यायालयाने संसदेने घेतलेला निर्णय एकमताने मान्य केला, असे प्रतिपादन देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांनी येथे केले.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर विधि महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्कचे लोकार्पण आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरणप्रसंगी सरन्यायाधीश गवई बोलत होते.
संविधान देशाला एकसंध ठेवण्यास समर्थ
सरन्यायाधीश गवई म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी देशासाठी असे संविधान तयार केले जे एकाच वेळी केंद्रीकृत आणि संघराज्यीय स्वरूपाचे आहे. युद्धाचा काळ असो वा शांततेचा, हे संविधान संपूर्ण देशाला एकसंध ठेवण्यास समर्थ आहे. संविधानाच्या ७५ वर्षांच्या प्रवासानंतर प्रत्येक संकटाच्या वेळी भारत एकसंघ राहू शकला. ही या संविधानाचीच किमया असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
उद्देशिका हाच संविधानाचा मुख्य गाभा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या समारंभात म्हणाले, की भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी जागतिक मूल्य आणि भारतीय शाश्वत मूल्यांची उत्तम सांगड घालत भारतीय संविधानाची निर्मिती केली आहे. उद्देशिका हाच संविधानाचा मुख्य गाभा आहे. उद्देशिकेतील मूल्यांचा अंगीकार देशातील नागरिकांनी करावा, त्यामुळे देशातील ९० टक्के प्रश्न कायमचे सुटतील. उद्देशिकेतील समाजवाद आणि धर्मनिरपेक्षता हे दोन शब्द हटविण्याच्या चर्चा सुरू असताना मुख्यमंत्र्यांनी केलेल्या या विधानाला महत्त्व आले आहे.
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, या विधी महाविद्यालयातून देशाचे माजी पंतप्रधान नरसिंहराव, माजी न्यायमूर्ती आणि राष्ट्रपती हिदायतुल्ला यासारखे गौरवशाली परंपरा लाभलेले विद्यार्थी होऊन गेले. यावेळी गडकरी यांनी विद्यापीठाच्या ई-ग्रंथालयासाठी एक कोटी रुपयांचा निधी देण्याची घोषणाही केली.