- बाप परिस्थितीपुढे खचला पण वाकला नाही (सदर बातमी वाचता येत नाही परत वाचायला पाठविणे)
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2021 04:06 AM2021-06-20T04:06:31+5:302021-06-20T04:06:31+5:30
मनगटात ताकद होती, कुणापुढे पसरले नाही हात : कोरोनाच्या परिस्थितीत आणि महागाईत आठदहा हजारात कुटुंब पोसणारा बापही ग्रेट नागपूर ...
मनगटात ताकद होती, कुणापुढे पसरले नाही हात :
कोरोनाच्या परिस्थितीत आणि महागाईत आठदहा हजारात कुटुंब पोसणारा बापही ग्रेट
नागपूर : कोरोना आला अनेकांच्या हातचा रोजगार हिरावून घेवून गेला. कामे बंद पडली म्हणून मजुरांनी गावोगावी पलायन केले. पण या शहरात राहणारा मजूर येथेच थांबला. त्याच्यावरही उपासमारीची वेळ आली. त्याच्या मुलांचेही शिक्षण थांबले. स्वत:बरोबर कुटुंबाच्याही आरोग्याची चिंता त्याला भेडसावत होती. या भिषण परिस्थितीपुढे तो मजूर बापही खचला. पण, परिस्थितीशी झुंजला आपल्यावर अवलंबून असलेल्या बायको आणि लेकरांच्या पोटासाठी बाहेर पडला. मनगटात ताकद होती म्हणून वाटेल ते काम केले. मात केली या महागाईच्या काळात कोरोनाच्या परिस्थितीवर. आज फादर्स डे, कष्ट करून आठदहा हजाराच्या मिळकतीत, आपले कुटुंब पोसून मुलाबाळांचे भविष्य उज्वल घडविणारे असे अनेक बाप आहे. आणि हे सर्वच ग्रेटच आहेत. असाच एक ग्रेट बाप बेझनबागेतील लुंबीनीनगरात राहतो.
प्रदीप रामटेके असे त्याचे नाव. गेल्या १५ वर्षापासून तो पेंटींगचे काम करतो. सद्या त्याला दिवसाला ३५० रुपये रोज मिळतो. या मिळकतीवर तो दोन मुलं, पत्नी यांचे दोन वेळी पोट भरून मुलांचे शिक्षण पूर्ण करतो. सरकारी रेशन हे त्याच्या उत्पन्ना व्यतिरिक्त मिळालेला आधार. प्रदीपची मुलगी दहावीत आणि मुलगा सहावीत आहे. पेंटींगचे कामही रोज नसतेच. दोन कामे जास्त करून तो कुटुंब पोसत होता. पण गेल्यावर्षी कोरोना आला. सरकारने लॉकडाऊन लावले आणि मिळणारी कामे बंद झाली. सुरूवातीचे दोन महिने तर अख्खे सर्व घरातच. रेशनचे धान्य आणि जवळ असलेला तेलमीठासाठीचा पैसा यात गुजरान केली. बाहेर पडलो तर कोरोनाची भिती आणि घरात उपासमारीची. कोरोनापेक्षा उपासमारी जास्त वेदनादायक म्हणून प्रदीप घराबाहेर पडला. पेंटींगचे कामे नव्हती म्हणून हातठेला घेऊन भाजीपाला विकला. भाजीपाला विकुन कसेबसे कुटुंब जगविले. या दरम्यान सण सोहळे मागे सोडले. कुटुंबाचे आजारपणे, मुलांचे शिक्षण यात तडजोड केली नाही. आता दोन आठवड्यापुर्वी त्याला पुन्हा पेंटींगचे काम मिळाले आहे.
- महागाईने आजून जगणं असहाय्य केले
३०० ते ३५० रुपये रोजी. दररोज काम सुद्धा मिळत नाही. कसेबसे ६ ते ७ हजार रुपये घरात येतात. स्वत:चे घर आहे हा ऐवढाच आधार. पण घरखर्च वाढला आहे. सिलेंडरसाठी ९०० रुपये द्यावे लागलात. कितीही बचत केली तरी वीज बिल ८०० रुपयांच्या घरात येतेच. खाद्यतेल आज १७० रुपये झाले आहे. डाळी, साखर अशा सर्वच वस्तू वाढल्या आहे. आपले दुखणे आपण घरातच छोटेमोठे उपचार करून टाळतो. पण मुलांचे टाळता येत नाही. त्यांचे शिक्षण आहे. शाळेने मुलीची पूर्ण फी भरायला लावली. दहावीत गेल्यामुळे ट्युशनचा खर्च आहे. मुलगा सहावीत आहे. शाळा बंद असल्या तरी शिक्षणाचा छोटामोठा खर्च लागतोच. घरातल्या एका कमावत्या व्यक्तीला हे सर्व करणे म्हणजे तारेवरची कसरत आहे. पण जगायचे आणि जगवायचे आहे, बापाचे कर्तव्य पूर्ण करायचे आहे, असा प्रदीप बोलून जातो.