‘अवनी’च्या कुटुंबाचा अखेर झाला अंत !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:08 IST2021-03-15T04:08:26+5:302021-03-15T04:08:26+5:30

नागपूर : दोन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पाच व्यक्तींचा बळी घेणाऱ्या टी-१ म्हणजेच ‘अवनी’ या वाघिणीच्या हत्येनंतर तिची दोन पिले ...

Avni's family finally dies! | ‘अवनी’च्या कुटुंबाचा अखेर झाला अंत !

‘अवनी’च्या कुटुंबाचा अखेर झाला अंत !

नागपूर : दोन वर्षापूर्वी यवतमाळ जिल्ह्यात पाच व्यक्तींचा बळी घेणाऱ्या टी-१ म्हणजेच ‘अवनी’ या वाघिणीच्या हत्येनंतर तिची दोन पिले अनाथ झाली होती. त्यातील एकाचा पुढे पत्ता लागला नाही, तर दुसरी मादी बछडी दोन वर्षापासून पेंचमध्ये वन विभागाच्या देखरेखीखाली वाढत होती. मात्र आठवडाभरापूर्वी जंगलात सोडल्यावर तिच्यावर दुसऱ्या वाघाकडून हल्ला झाला. त्यात ती जखमी झाली. मात्र उपचारादरम्यान १२ मार्चला रात्री ती दगावली. देशभरात चर्चेत आलेल्या अवनीच्या कुटुंबातील एकमेव ज्ञात वारसदारही आता दगावल्याने तिच्या कुटुंबाचाच शेवट झाल्याची भावना व्यक्त होत आहे.

अवनीच्या हत्येनंतर तिची दोन पिले अनाथ झाली होती. जंगलात ती उपासाने दगावतील, अशी भीती वन विभागाला होती. या बछड्यांचा शोध सुरू असताना दोन पिले दिसलीही. मात्र त्यातील एकाचा पुढे पत्ताच लागला नाही. या घटनेनंतर सुमारे वर्षभराने दुसरी मादी बछडी वन विभागाने रेस्क्यू करून पेंचमध्ये आणली. पीटीआरएफ-८४ असे नाव देण्यात आले. २२ डिसेंबर २०१८ पासून तिला तेथील चार हेक्टर क्षेत्रफळाच्या ओपन एन्क्लोजरमध्ये ठेवून शिकार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. शिकारीसाठी ती सक्षम झाल्याचे लक्षात आल्याने जुलै २०१९ मध्ये तिला मूळ अधिवासात सोडण्यावर चर्चा झाली. मात्र एनटीएसीएच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार काही त्रुटी दाखविल्याने हे लांबले. पुढे वर्षभराने या प्रस्तावाला मंजुरी मिळून ७ जुलै २०२० च्या बैठकीत तिला सोडण्यावर एकमत झाले. नंतरच्या घडामोडीत एनटीसीएकडून परवानगी आली. त्यामुळे गेल्या आठवड्यात ५ मार्चला तिला निसर्गात सोडण्यात आले होते. मात्र ८ मार्चला जंगलातील अन्य वाघिणीशी तिची झुंज झाली होती. त्यात गंभीर जखमी झाल्याने तिच्यावर उपचार सुरू होते. ठणठणीत झाल्यावर तिला पुन्हा निसर्गात सोडले जाणार होते. मात्र नियतीने ही संधीच दिली नाही. शनिवारी १३ मार्चला रात्री ११ वाजता ती दगावली. यासोबतच तिच्या कुटुंबाचाही अंत झाला.

...

‘अवनी’ गाजली देशभरात !

२०१६ पासून अवनीची यवतमाळच्या जंगलात दहशत होती. २०१८ च्या काळात ७ जणांचा या वाघिणीच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. त्यामुळे या वाघिणीला नरभक्ष्यी ठरविण्यात आले होते. तिला ठार करण्याच्या मागणीसाठी वन विभागावर आणि प्रशासनावर प्रचंड दबाव वाढत होता. अखेर शुक्रवारी ३ नोव्हेंबर २०१८ रोजी रात्री उशिरा राळेगाव तालुक्यातील बोराटी गावाजवळच्या जंगलात तिला शार्प शूटरकडून ठार करण्यात आले.

या वाघिणीला ठार केल्यानंतर एकीकडे स्थानिकांमध्ये आनंद, तर दुसरीकडे वन्यजीवप्रेमींमध्ये संताप, असे चित्र निर्माण झाले होते. प्रशासनाने तिला पकडण्याचा प्रयत्नच केला नाही, थेट ठारच करण्यात आल्याचा आरोप आजही होत आहे. तर, ‘अवनी’ला गोळी मारण्यापूर्वी बेशुद्ध करण्याचा प्रयत्न झाला, असा वन विभागाचा दावा आहे. टीममधील सदस्य शेख यांनी वाघिणीला बेशुद्ध करण्यासाठी डार्ट मारला. तो डार्ट वाघिणीला लागला, पण मागे जात तिने पुन्हा हल्ला केला. हे कर्मचारी जिप्सीमध्ये होते. शेवटी स्वरक्षणासाठी शार्प शूटरने आठ ते दहा मीटर अंतरावरून गोळी झाडली. त्यात ही वाघीण जागेवरच मेली, असे वन विभागाचे म्हणणे आहे. मृत्यूनंतरही तिची कहाणी संपलेली नाही. हे प्रकरण न्यायालयात गेले आहे.

...

Web Title: Avni's family finally dies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.