आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिकता हरवली
By Admin | Updated: June 29, 2014 00:48 IST2014-06-29T00:48:16+5:302014-06-29T00:48:16+5:30
आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वत:च्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले.

आंबेडकरी चळवळीतील प्रामाणिकता हरवली
ताराचंद्र खांडेकर : मार्गदाता मासिकाचे चर्चासत्र
नागपूर : आंबेडकर चळवळीतील प्रामाणिकता हरवली असून आजचे नेते स्वत:च्या राहुट्या उभ्या करण्यासाठी केवळ जनतेची दिशाभूल करीत आहेत, असे मत ज्येष्ठ आंबेडकरी साहित्यिक ताराचंद्र खांडेकर यांनी व्यक्त केले.
‘मार्गदाता’ मासिकातर्फे आज, शनिवारी हिंदी मोरभवनातील सभागृहात ‘आता आंबेडकरवाद्यांची यापुढची दिशा’ विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले. त्यावेळी प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. अन्य वक्त्यांमध्ये आंबेडकरी विचारवंत डॉ. विमल कीर्ती यांचा समावेश होता. ज्येष्ठ पत्रकार प्रा. रणजित मेश्राम अध्यक्षस्थानी होते. ‘मार्गदाता’चे संपादक दिलेश मेश्राम उपस्थित होते.
खांडेकर यांनी रा.सू. गवई, कांशीराम, प्रकाश आंबेडकर, रामदास आठवले, मायावती आदी आंबेडकरी नेत्यांचा नावासह उल्लेख करून त्यांच्या प्रामाणिकतेवर शंका उपस्थित केली. हे नेते आंबेडकर मानत असले तरी जगत नाहीत. आजच्या नेत्यांकडून आंबेडकरांच्या नावावर केवळ स्वत:चे घर भरले जात आहे. विविध गटांत विभागलेले आंबेडकरी नेते अपप्रवृत्ती असून ती कालसापेक्ष निर्माण होतच असते. आंबेडकरांचे तत्त्वज्ञान मान्य असणाऱ्यांनी नेतृत्वाच्या पैदासीचे नियोजन करणे आवश्यक आहे. सामाजिक शक्ती निर्माण करणे आपले उत्तरदायित्व आहे. आजच्या पिढीपुढे अनेक नेते उभे आहेत. परंतु, त्यांची प्रामाणिकता संशयास्पद आहे. रिपब्लिकन पक्षाची स्थापना झाल्यानंतर त्यावेळच्या नेत्यांनी निष्ठेने कार्य करून चळवळ मोठी केली. आजचे नेते दिशाभूल करतात. यामुळे लोकसभा निवडणुकीत नागरिकांना दिशा गवसली नाही, असे खांडेकर यांनी सांगितले.
विमल कीर्ती म्हणाले, रिपब्लिकन पक्षाचा राजकारणात असलेला दबदबा परत आणण्यासाठी विभागलेल्या नेत्यांनी एकत्र येण्याची गरज आहे. समाजाकरिता राजकीय क्षेत्र काबीज करणे आवश्यक आहे. राजकीयदृष्ट्या शक्तीशाली झाल्याशिवाय आंबेडकरी जनतेच्या समस्या सुटणार नाहीत. आंबेडकरी चळवळीला खऱ्या नेतृत्वाची गरज आहे. व्यक्तिवादी नेतृत्वामुळे चळवळीचा घात झाला आहे.
अनिल वासनिक, निरंजन वासनिक, के. जी. इंगळे, गुणवंत पाटील, विनायक ढोके, मधुकर बोरीकर आदींनी यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.(प्रतिनिधी)