‘अॅट्रॉसिटी कायदा’ रद्द होणार नाही
By Admin | Updated: October 13, 2016 03:12 IST2016-10-13T03:12:44+5:302016-10-13T03:12:44+5:30
राज्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले. यामुळे दलित समाजात थोडी अस्वस्थता दिसून आली.

‘अॅट्रॉसिटी कायदा’ रद्द होणार नाही
६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन
नागपूर : राज्यात मराठा समाजाचे मूक मोर्चे मोठ्या प्रमाणात निघाले. यामुळे दलित समाजात थोडी अस्वस्थता दिसून आली. परंतु दलित समाजाला अस्वस्थ होण्याची गरज नाही. कारण अॅट्रॉसिटीचा कायदा हा रद्द करता येत नाही आणि यासंदर्भात सरकारचा तसा कुठलाही मानस नाही, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येथे केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीतर्फे ६० वा धम्मचक्र प्रवर्तन दिन सोहळा मंगळवारी रात्री नागपुरातील दीक्षाभूमीवर पार पडला. त्याप्रसंगी मुख्य अतिथी म्हणून ते बोलत होते. समारंभाच्या अध्यक्षस्थानी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरेई ससाई होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी, बिहारचे राज्यपाल रामनाथ कोविंद, केंद्रीय सामाजिक न्याय व अधिकारिता राज्यमंत्री रामदास आठवले, राज्याचे ऊर्जा मंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले, आंध्र प्रदेशचे माजी मंत्री श्रीधर बाबू, महापौर प्रवीण दटके, कमलताई गवई, आमदार डॉ. मिलिंद माने, प्रकाश गजभिये, विभागीय आयुक्त अनुपकुमार, मनपा आयुक्त श्रावण हर्डीकर व डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीचे सचिव सदानंद फुलझेले आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री म्हणाले, अॅट्रॉसिटीचा कायदा हा अन्याय करणारा नसून अन्यायापासून संरक्षण करणारा आहे. या कायद्यामुळे दलितांना संरक्षण मिळाले आहे. कुणी तो रद्द करण्याची मागणी करीत असेल तर ते चुकीचे आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे खरे अनुयायी हे अॅट्रॉसिटी कायद्याचा दुरुपयोग करणार नाही. जर कुणी त्याचा दुरुपयोग करीत असेल तर शासन दुरुपयोग करू देणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे केवळ संविधानाचे निर्माते नव्हते तर ते खऱ्या अर्थाने राष्ट्रनिर्माते होते. अखंड राष्ट्राची व विकासाची संधी पाहायला मिळते ती केवळ बाबासाहेबांमुळे. संविधानाच्या माध्यमातून एकता व एकात्मतेच्या धाग्यामुळे राष्ट्र विकासाकडे जात आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे जागतिक नेते असल्याचे सांगताना मुख्यमंत्री म्हणाले की, युनोमध्ये जगातील सर्व राष्ट्रांनी त्यांची १२५ वी जयंती साजरी केली. इंदू मिल येथे बाबासाहेबांचे यथोचित स्मारक व्हावे व हे स्मारक वादातीत असू नये यासाठी सर्वांना एकत्र घेऊन आराखडा तयार करण्यात आला असून त्यांना साजेसे असे भव्य स्मारकाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
दीक्षाभूमीवरील धम्मचक्र प्रवर्तन दिन नगपूरच्या सांस्कृतिक जीवनातील महत्त्वाचा सोहळा असून दीक्षाभूमीमुळे जागतिक स्थळावरील पर्यटक व उपासक येथे येतात. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या या पवित्र स्मारक व परिसराला अत्यंत सुंदर करण्यासाठी एकात्मिक आराखड्याला मान्यता दिली असून निश्चित कालावधीत आराखड्यानुसार काम सुरू करण्यात येईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली.
दीक्षाभूमीमुळे नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर
नितीन गडकरी म्हणाले, देशाच्या कानाकोपऱ्यातून मोठ्या संख्येत आंबेडकरी अनुयायी नागपुरातील दीक्षाभूमीवर येतात. दीक्षाभूमीमुळे नागपूरचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहचले आहे. केंद्र सरकार व राज्य सरकारच्या विशेष प्रयत्नामुळे दीक्षाभूमीला पर्यटन स्थळ म्हणून ‘अ’ दर्जा प्राप्त झाला आहे. बुद्धिस्ट सर्किटच्या प्रस्तावासाठी १०० कोटींचा निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. दीक्षाभूमीलगत असलेली कृषी विभागाची जागा मिळवून देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दीक्षाभूमीवर येणाऱ्या प्रत्येकाने तथागत गौतम बुद्धांचा संदेश व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार पुढे न्यावे, त्यांना हीच खरी आदरांजली ठरेल.