अटलबहादूर सिंग खरे ‘किंगमेकर’
By Admin | Updated: March 3, 2017 02:43 IST2017-03-03T02:43:32+5:302017-03-03T02:43:32+5:30
राजकारणात असूनदेखील सरदार अटलबहादूर सिंग यांनी आयुष्यभर मतभिन्नता बाजूला ठेवून सदैव माणसे जोडण्याचे काम केले.

अटलबहादूर सिंग खरे ‘किंगमेकर’
नितीन गडकरी : अमृतमहोत्सवानिमित्त भव्य सत्कार
नागपूर : राजकारणात असूनदेखील सरदार अटलबहादूर सिंग यांनी आयुष्यभर मतभिन्नता बाजूला ठेवून सदैव माणसे जोडण्याचे काम केले. त्यांनी संवेदनशीलता जपत नागपुरात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली. अनेक वर्ष तर ते म्हणतील, त्या दिशेने नागपूरचे राजकारण चालले. खऱ्या अर्थाने ते ‘किंगमेकर’ ठरले, या शब्दांत केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक व जहाजबांधणीमंत्री नितीन गडकरी यांनी गौरवोद्गार काढले. शहरातील सांस्कृतिक, राजकीय, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्राच्या विकासात महत्त्वाची भूमिका वठविणारे नागपूरचे माजी महापौर अटलबहादूर सिंग यांचा अमृतमहोत्सव सोहळा गुरुवारी आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.
साई सभागृह येथे झालेल्या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ‘लोकमत’ एडिटोरियल बोर्डचे चेअरमन व माजी खासदार विजय दर्डा हे होते. यावेळी मंचावर ज्येष्ठ संघ विचारक मा.गो.वैद्य, आ.अनिल सोले, आ.जोगेंद्र कवाडे, माजी मंत्री सतीश चतुर्वेदी, नितीन राऊत, अनिस अहमद, महापौर प्रवीण दटके, माजी महापौर कुंदाताई विजयकर, गिरीश गांधी, मोहब्बतसिंग तुली उपस्थित होते. अटलबहादूर सिंग यांनी राजकारणासोबतच शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात स्वत:ची छाप सोडली. प्रत्येकाला ते आपले वाटतात. वेगवेगळ्या पक्षात असूनदेखील सामाजिक मंचांवर एकत्र येण्याची परंपरा त्यांनी वेगाने समोर नेली. त्यांचे नागपूर नगरीवर मोठे ऋणच आहे, असे नितीन गडकरी म्हणाले.
अटलबहादूर सिंग यांचा रिपब्लिकन चळवळीशीदेखील जवळचा संबंध राहिला आहे. राजकारणी कसा असावा याचे त्यांनी उदाहरणच मांडले, असे प्रतिपादन जोगेंद्र कवाडे यांनी केले.
यावेळी नागपूर महानगरपालिकेतर्फेदेखील अटलबहादूर सिंग यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भावी महापौर नंदा जिचकार यादेखील यावेळी उपस्थित होत्या. कार्यक्रमाला हरिभाऊ केदार, उमेश चौबे, भाऊ लोखंडे, मधुकर वासनिक, रोमिला महाजन हेदेखील उपस्थित होते. डॉ. सतीश चतुर्वेदी यांनी अटलबहादूर सिंग यांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला. गिरीश गांधी यांनी प्रास्ताविक केले. नितीन राऊत यांनी संचालन केले तर कुंदाताई विजयकर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विजय दर्डा यांनी यावेळी अटलबहादूर सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाचे विविध पैलू मांडले. अटलबहादूर सिंग हे एक ‘जिंदादिल’ व्यक्ती आहेत. त्यांच्या स्वभावगुणांमुळे ते अलौकिक कर्तृत्वाचे धनी झाले. त्यांचा अनेकांशी वैचारिक संघर्ष राहिला. मात्र कुणाशीही मनभेद झाले नाहीत. खऱ्या अर्थाने त्यांचे व्यक्तिमत्त्व हे विराट राहिले, अशा भावना दर्डा यांनी बोलून दाखविल्या. ‘लोकमत’ वृत्तपत्र समूहाचे संस्थापक संपादक व ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा यांचादेखील अटलबहादूर सिंग यांच्यावर विशेष जिव्हाळा होता, ही आठवणदेखील दर्डा यांनी सांगितली. १९९४ साली सकल जैन समाजातर्फे नागपुरात जैन साध्वी प्रीतीसुधाजी महाराज यांच्या चातुर्मासाचे आयोजन करण्यात आले होते. तत्कालीन पंतप्रधान पी.व्ही. नरसिंहराव हेदेखील त्या कार्यक्रमात आले होते. प्रीतीसुधाजींना नागपुरात येण्याची विनंती करण्यासाठी अटलबहादूर सिंग स्वत: गेले होते. अटलबहादूर सिंग यांनी कधीही जातपात मानली नाही व सर्व धर्म-पंथ त्यांच्यासाठी समान आहेत, असे दर्डा म्हणाले.(प्रतिनिधी)
दिलेला शब्द पाळण्याचा प्रयत्न
यावेळी अटलबहादूर सिंग यांनी आपल्या भावना व्यक्त केला. मी आयुष्यात अनेक जोडले. मैत्री व जिव्हाळा माझ्यासाठी खूप काही आहे. म्हणूनच मी दिलेला शब्द पाळण्याचाच प्रयत्न करतो. डोक्यावरील पगडी व दिलेला शब्द हे माझ्यासाठी सर्वात महत्त्वाचे आहेत. नागपूर नगरीने मला घडविले.माझ्यावर संस्कार केले. आज नागपुरात माझ्या जवळचा एकही नातेवाईक नाही. मला सगळे पंजाबमध्ये बोलवतात. मात्र मी कधीच नागपूरला सोडणार नाही, असे भावनिक उद्गार त्यांनी काढले.