आपत्ती आलीच तर सक्षम आहोत का?
By Admin | Updated: April 27, 2015 02:19 IST2015-04-27T02:19:59+5:302015-04-27T02:19:59+5:30
उपराजधानी भूकंपाच्या बाबतीत सुरक्षित असल्याचे मानले जाते. परंतु शनिवार व रविवारी नागपुरातही ...

आपत्ती आलीच तर सक्षम आहोत का?
नागपूर : उपराजधानी भूकंपाच्या बाबतीत सुरक्षित असल्याचे मानले जाते. परंतु शनिवार व रविवारी नागपुरातही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्याने नागरिकांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झाली आहे. दुर्दैवाने असे नैसर्गिक संकट आलेच तर त्याचा सामना करण्यासाठी कोणतीही सक्षम यंत्रणा नाही. म्हणायला महापालिकेचा अग्निशमन विभाग आहे. परंतु तोही अशा संकटापुढे हतबल ठरणार असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे सध्यातरी असे संकट आलेच तर परमेश्वराशिवाय दुसरा कोणीही आपला तारणहार नाही.
देशाच्या हृदयस्थानी असलेल्या नागपूर शहरात भूकंपाचे धक्के बसण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे भूकंपासारखी आपत्ती आल्यास त्याचा सामना करणारी सक्षम यंत्रणा नाही. नागपूर शहर व परिसरात पूर, आग व नदी-नाल्यात बुडण्याच्या घटना घडतात. अशा संकट प्रसंगी तातडीने मदत करता येईल अशी यंत्रणा अग्निशमन विभागाकडे आहे. परंतु भूकंपासारखी आपत्ती आल्यास सामना करणारी कोणतीही यंत्रणा नसल्याची जाणीव मनपा प्रशासनाला आहे. सत्तापक्षनेते दयाशंकर तिवारी यांनीही याला दुजोरा दिला आहे.
शनिवारी भूकंपाचे धक्के जाणवल्याने काही लोकांनी अग्निशमन विभागाला याची सूचना दिली. विभागाचे वाहन पोहचले. परंतु घराबाहेर पडण्याचा सल्ला देण्याशिवाय दुसरी कोणतेही उपाय त्यांच्याकडे नव्हते.
नागपुरात अग्निशमन विभागाचे राष्ट्रीय स्तरावरील कॉलेज आहे. देशभरातील प्रशिक्षणार्थी येथे प्रशिक्षणासाठी येतात. परंतु भूकंपासारखी आपत्ती आल्यास अशा संकटाचा सामना करता यावा, या दृष्टीने अग्निशमन विभागातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा अद्याप विचार झालेला नाही.
अशा संकटाचा सामना तर दूरच उंच इमारतीत आग लागल्यास ती आटोक्यात आण्यासाठी विभागातील कर्मचारी व अधिकाऱ्यांना चांगलीच कसरत करावी लागते. काही वर्षापूर्वी महालगाव येथील एका कोल्ड स्टोअरेजला आग लागली होती. ही आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन विभागाच्या जवानांना तीन दिवस प्रयत्न करावे लागले होते. गे्रट नागरोडवरील लोखंडे यांच्या इमारतीत लागलेली आग आटोक्यात आणताना विभागाचा एक कर्मचारी शहीद झाला होता. यातून विभागाच्या मर्यादा स्पष्ट झाल्या आहेत.
शहरात जुन्या इमारतींची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. पावसाळा आला की अशा इमारत मालकांना नोटीस बजावल्या जातात. परंतु पुढे कोणतीही कारवाई होत नाही. शहरात ठिक ठिकाणी पडलेली झाडे हटविण्याचे काम विभागाचे जवान करतात. (प्रतिनिधी)