आंबिया संत्र्याला गळती
By Admin | Updated: September 19, 2014 00:54 IST2014-09-19T00:54:34+5:302014-09-19T00:54:34+5:30
नापिकी, अवर्षण, कर्जबाजारीपणा व नैसर्गिक संकटाने शेतकरी हताश झाला आहे. त्यातच आता आंबिया बहारातील संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या

आंबिया संत्र्याला गळती
संत्रा धोक्यात : हेक्टरी ५० हजार रुपयांच्या अनुदानाची मागणी
आनंदराव गुरमुळे - नरखेड
नापिकी, अवर्षण, कर्जबाजारीपणा व नैसर्गिक संकटाने शेतकरी हताश झाला आहे. त्यातच आता आंबिया बहारातील संत्र्याला मोठ्या प्रमाणात गळती लागल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. मागील महिन्यात झालेल्या संततधार पावसामुळे संत्रा मोठ्या प्रमाणात खाली येत असल्याचे तालुक्यात चित्र आहे. त्यामुळे संत्रा बागयतदार धास्तावले आहेत.
नरखेड, काटोल, कळमेश्वर या तालुक्यात संत्र्याच्या मोठ्या प्रमाणात बागा आहेत. संत्र्याच्या झाडांवर देठ सुकीचा प्रादुर्भाव झाल्याचे बागायतदारांनी सांगितले. नरखेड तालुक्यात संत्रा, मोसंबीचे लागवड क्षेत्र ८१८२ हेक्टर, काटोलमध्ये ७०९५ हेक्टर व कळमेश्वरमध्ये ४०५६ हेक्टर आहे. मागील महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे आंबिया संत्र्यास मोठ्या प्रमाणात फटका बसला. यंदा लांबवणीवर पाऊस पडल्याने वातावरणात लक्षणीय बदल झाला आहे. संत्र्याच्या झाडातील सूक्ष्मद्रव्याचे संतुलन बिघडल्याची स्थिती आहे. देठ सुकीच्या रोगामुळे संत्रा झाडे ग्रासल्यामुळे फळे पिवळी होऊन गळत आहेत. जमिनीतील उष्णतेमुळे ही गळ होत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले. नुकसानग्रस्त बागायतदारांना शासनाने हेक्टरी ५० हजार रुपयांचे अनुदान देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.