लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राज्यात २०१२ पासून शिक्षक भरती घोटाळा सुरू असून, जिल्हास्तरापासून मंत्रालयस्तरापर्यंतचे शिक्षण विभागाचे अधिकारी घोटाळ्यात सहभागी आहेत, त्यामुळे या घोटाळ्याच्या तपासासाठी एसआयटी गठित करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य कार्याध्यक्ष माजी आमदार नागो गाणार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे.
शाळा संचालकांनी शिक्षण विभागाच्या सहकार्याने बेरोजगार शिक्षकांना प्रत्येकी ४० ते ५० लाख रुपयांनी लुटले आहे. त्यांच्या नियुक्त्या बँक डेटेड दाखवून शासनाच्या तिजोरीतून थकीत वेतनाची रक्कम लुटली आहे. या घोटाळ्यात बेरोजगारांना आणि शासनाला १५०० कोटी रुपयांनी लुबाडण्यात आले आहे. शिक्षक नियुक्ती घोटाळा राज्यस्तरावर सर्व जिल्ह्यात एकाच पद्धतीने करण्यात आला आहे. घोटाळ्यातून शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी अमाप संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे या घोटाळ्याची तपासणी एसआयटीमार्फत करावी, अशी मागणी करीत माजी आमदार नागो गाणार यांनी ३० जून रोजी आझाद मैदान मुंबई येथे आंदोलनाचा ईशारा दिला आहे.